Skip to main content

Sampadkiya in 3June2013

नवी दिशा समजून घ्यावी

नव्या युगाच्या चाहुलीतून टपालखाते आता ताजेतवाने होऊ पाहात आहे. पोस्टाची आजची सेवा इंग्रजांच्या काळात सुरू झाली, त्यास दीडशे वर्षे उलटून गेली. त्यापूर्वी टपाल-वहन होतच असे. कोणी दूत पाठवीत, कुणी खलिता पाठवीत, कुणी सांडणीस्वार पाठवीत. कबुतराच्या चोचीत पत्र-चिठी देऊन पाठविण्याची कविकल्पना कदाचित प्रत्यक्षातही असू शकेल. हे संदेशवहनाचे प्रकार इतिहासजमा झाले, आणि इंग्रजांची डाक-सेवा आजपर्यंत अथक चालू आहे.

इलेक्ट्नॅनिक्स-ई मेल व सेलफोनच्या जमान्यात पत्रलेखन कमी झाले ही तर वस्तुस्थिती आहे. हल्ली पोस्टाच्या पेटीत पत्रे फारशी पडत नाहीत, त्यावरून `पोस्ट खाते बंदच होईल' असे बरळणारे काही महाभाग पाच-दहा वर्षांपूर्वी होते. परंतु आता त्यांची गणना वेड्यातच करावी लागेल. कारण पोस्टात येणारी पत्रे कमी झाली तरी इतर असंख्य प्रकारचे टपाल इतके वाढले की, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना दररोज कामाचा डोंगर उपसावा लागतो. फोनबिले, अहवाल, नोटीसा, विमा, वगैरेंचे प्रमाण महाप्रचंड वाढले आहे.

त्याशिवाय पोस्टाच्या नव्यानव्या योजना, आवर्ती ठेव, पोस्टल विमा, ईएमओ वगैरेंनी प्रत्यक्ष पत्रसेवेची कसर भरून काढली आहे. अर्थात पोस्टसेवेतील माणसांचे व त्या यंत्रणेचे काम वाढले हा खूप आनंदाचा भाग असला पाहिजे. काम जास्तीचे करावे लागेल, हा आनंदाचा विचार म्हणून करायला व आचरायला शिकणे हीच प्रारंभी नमूद केलेली नव्या युगाची चाहूल आहे. त्या नव्या युगाला साजेल अशी वृत्ती प्रवृत्ती निर्माण करणे - जोपासणे - वाढवत ठेवणे फार गरजेचे आहे. नव्या जागतिक आर्थिक युगाला खूप वेग आहे, गती आहे. ती गती प्रत्येकानेच आत्मसात करून स्वत: सहभागी व्हायलाच हवे. तशी गती आपण घेतली नाही तर काय होईल?

`ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असू द्यावे, समाधान' - असे तुकाराम महाराज सांगून गेले. ती शिकवण आध्यात्मिक दृष्टीने अगदी योग्यच आहे. पण सारे जग जर आर्थिक मोठेपणाच्या, समृद्धीच्या व व्यवसायिक स्पर्धेच्या वातावरणात धावत असेल तर केवळ आपण `तैसेची राहावे' म्हणून निवांत राहणे योग्य ठरेल काय? आपण `आपलं आहे ते पुरे, आहे ते बराय!' असं म्हणून बाजूला पडलो तर इतरांच्या वेगवान स्पर्धेत तुडवलेसुद्धा जाऊ. आर्थिक स्पर्धेतून मोठे होत जाणारे बाकीचे जग आपल्यासाठी थांबणार नाही, आपल्यास मदतीचा हात देणार नाही. त्यामुळे
कायदा पाळा गतीचा
काळ मागे लागला
झोपला तो संपला ।
हेच आजच्या युगाचे सूत्र आहे. पोस्टखात्याने ते ध्यानात घेऊन `डाक सेवा' आणि `डाक व्यवसाय' यांचा मेळ घालण्याचे ठरविलेले दिसते. केवळ सेवाभावाने आजवर चालणारे पोस्टाचे कामकाज अलीकडच्या काळात लोकांच्या चेष्टेचाही विषय झाला हे संबंधितांनी ध्यानात घ्यायला हवे.

पोस्ट, एस.टी.बस, वीजमंडळ इत्यादी शासकीय सेवा आजपर्यंत एकमेव-अद्वितीय-मक्तेदारी स्वरूपाच्या होत्या. लोकांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. जगाबरोबरच आपण `मुक्त' धोरण स्वीकारले त्यानंतर कुरियर-व्यवसाय वाढला, मोबाईल कंपन्या वाढल्या. ज्याप्रमाणे खाजगी जीप व बसगाड्या वाढल्या त्याचा राज्य परिवहन सेवेवर थोडासा परिणाम होतोच. त्याचप्रमाणे कुरियर कंपन्यांनी पोस्टाचा व्यवसाय काही थोड्या प्रमाणात नेला, ही वस्तुस्थिती आहे. पण ते कारण सांगून चालणार नाही. पोस्टाची सेवा टाळून लोक कुरियर सेवेकडे अथवा तत्सम खाजगी व्यवसायांकडे का वळतात, याचा विचार केलाच पाहिजे.

लोकांना आजच्या काळात उत्तम सेवा पाहिजे, त्यासाठी चार पैसे जास्त देण्याची त्यांची तयारी आहे. पोस्टखात्याची देशव्यापी यंत्रणा एवढी प्रचंड आहे की, व्यवसाय म्हणून ती वापरली तर निश्चितच प्रभावी, कार्यक्षम व लाभदायक ठरू शकेल. पोस्टाचा लखोटा जो पाच रुपयात कोठेही जातो, त्यास खाजगी सेवा वीस-पंचवीस रुपये घेते. तरीही ग्राहक खाजगी सेवेकडे का जातो, ते तपासून योग्य बदल करणे हीच काळाची गरज आहे. तसे बदल, तशी कृती केवळ उच्च-वरिष्ठ पातळीवर होऊन कसे चालेल? पोस्टाशी संबंधित अशा प्रत्येक घटकाने मनावर घेतले तर, आणि तरच ही विकासाची ईर्षा सार्थ ठरेल.

ही नवी दिशा समजून घेऊन तशी वाटचाल आनंददायक घडावी यासाठी एकमेकांशी संपर्क असणे फार आवश्यक असते. परस्परांना साद घालत, मार्ग चालत राहिल्यास सर्वांना समाधान मिळते आणि शीण जाणवत नाही. सांगली विभाग गेल्या आर्थिक वर्षात बरेच पुरस्कार मिळवून सन्मानित झाला ही एक उत्तम सुरुवात आहे. यापुढे सर्व पोस्ट घटकांनी यापेक्षा जास्त प्रयत्न जारी ठेवावेत यासाठी हे संपर्कपत्र उपयुक्त ठरेल. त्या माध्यमातून कुटुंबासह क्षेम-कुशल कळावे, मार्गदर्शक विचार समजावेत, नवी माहिती मिळावी, थोडेसे मनोरंजन व्हावे, आणि सूचना-संदेशही लाभावेत यासाठी  सहकार्याचे सर्वांना आवाहन.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...