संपादकीय आलीया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालू नये । तोची कृपासिंधू निवारी साकडे । येर ते बापुडे काय रंक ।-तुकाराम सामान्य जनांनी किती रडावे! सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तीरथ सिंह ठाकूर एका जाहीर आणि प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात भावनावश झाले आणि त्यांचे डोळे पाणावल्याचे वृत्त एव्हाना सगळीकडे चर्चेत आलेले आहे. त्या व्यासपीठावर देशाचा सर्वोच्च प्रशासक असणारा प्रधानमंत्री होता. त्या कार्यक्रमाला काही भावनिक कारण किंवा सांस्कृतिक महत्व होते असे नव्हे. शपथविधी, सत्कार, निरोप, श्रध्दांजली, पदग्रहण, विरह असे काही हृदयस्पर्शी प्रसंग असतात की ज्यावेळी कोणीही माणूस त्याच्या माणूसपणात शिरतो. त्याचे भारावलेपण भावुकपणात जाते आणि ते व्यक्त होण्यासाठी आतून वाट शेाधत त्याचे अश्रू बाहेर येतात. अशा काही हृदयस्पर्शाचा तो प्रसंग नव्हता, तर नेहमीचा शासकीय कामकाजापैकी होता. त्या व्यासपीठावर देशाचा सर्वोच्च न्यायाधीश भावनावश होणे हे अनाकलनीय आहे. जे कारण त्यांच्या भावुकतेसाठी प्रसिध्द झाले आहे, तेही आजच नव्याने प्रगट झाले अशातला भाग नाही. देशाच्या संचालनाची जी तीन अंगे आहेत, त्यात कायदेमं