अभिरुची घडवावी लागते पन्नासच्या दशकात मी कुमारवयात होतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम माझ्या विचारांवर होण्याचे ते वय! समाजातील प्रश्न जरी आताइतके जटिल वाटत नसले तरी प्रत्येक घटनेवर माझ्या कुवतीनुसार `हे असे का व्हावे?' इतपत विचार होत होता. महात्मा गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलींनी मनात एक भीती व संशय येऊन अस्थिरतेची भावना मूळ धरू लागल्याचे स्मरते. ग्रामीण भागात झाले तितके भयप्रद वातावरण शहरात नव्हते पण सर्व काही सुरक्षित आहे या समजुतीला धक्का बसला. नंतरच्या वर्षात समाजातील दुही, तेढ आणि क्रौर्य आपल्या आसपासच नाही तर, सर्व जगभर वाढत गेले व वाढत आहे. कायद्याच्या कवचाचे संरक्षण किती तकलुपी असते याचे प्रत्यंतर येत गेले व येतच राहिले. संवेदनक्षम मन हळूहळू निगरगट्ट बनत गेले आणि आज अनेक गोष्टींबाबत पूर्वीची संवेदनक्षमता तितकी राहिली नाही. त्या कुमारवयातील वाचनाची गोडी मात्र अजून टिकून असल्याने, व तीही चांगले संस्कार घडवणाऱ्या वाचण्याने, वर्तमानपत्रे अथवा प्रसारमाध्यमांमधून `ओतल्या' जाणाऱ्या घटना व त्यातील संभाव्य अतिशयोक्ती ओळखायला येऊ लागली आहे. ज्या दोन पुस्तकांनी माझ्य