समानीव आकूति: । समाना हृदयानि व: । समानमस्तु वो मनो । यथावस्सुसहासति ।। संकटातील धर्म ग्रीष्माच्या झळा सर्वस्पर्शी पोळत आहेत. तळपत्या सूर्यामुळे मनातला झाकोळ गडद होत आहे. पुष्कळशा भागात पाणी दुर्मीळ झाले आहे. वीजटंचाई ही तर आता अंगवळणी पडली आहे. एखाद्याच्या पायाला बरे न होणारे इसब घेऊन त्याला हिंडा फिरावे लागते, तशी स्थिती वीजप्रश्नाची आहे. त्याविषयी विव्हळले तरी आजार अटळ आहे याची सर्वांना कल्पना येऊन चुकली आहे. जलसंपदा हे भारदस्त नावाचे खाते खातेरे बनले असल्याचे जाणवते. चित्रपट महोत्सव आणि आयपीएल् ची झगमगती दुनिया दुष्काळ नावाच्या अस्वस्थतेशी संबंधित नाही, ते अपेक्षितही नाही. पण भाजीभाकरी आणि रोजची आंघोळ ज्यांना शक्य आहे तो तथाकथित बुद्धिजीवी मध्यमवर्ग सध्या त्या भीषणतेकडे डोळेझाक करून झगमगाशी नाते जोडू पाहात आहे याचे आश्चर्य मानावे, की समाधान मानावे, की कालगत न्याय म्हणावे? बंगालमधल्या महाभयंकर दुष्काळात टिळकांनी मोठा निधी उभारला, त्यास शतक उलटले. १९७२ ला महाराष्ट्नत मोठा दुष्काळ पडला तेव्हा महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था, संकटनिवारणासाठी पुढे आल्या होत्या. विविध राजकीय व