फराळाचा शिल्लक चुरा दसरा किंवा पाडव्याला श्रीखंड करायची रीत होती, तशी पंचमी-होळीला पुरणपोळी असायची. आताही ती असते परंतु दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करावी लागत नाही. दूध साठवून ते तीनतीनदा तापवायचं, विरजून दही लावायचं, पातळ फडक्यात ते ओतून त्याचं चुमडं बांधून खुंटीला चार-सहा तास टांगायचं, पाणी पूर्ण निथळलं की तो मऊशार चक्का फेसून घेत साखर मुरवायची.... इतकं काही आता करावं लागत नाही. परवा आमचा एक मित्र जेवायला आला. पंगत सुरू झाल्यावर श्रीखंड चाखत म्हणाला, ``वा! श्रीखंड मस्तच झालंय...!! कसं किलो मिळालं?'' कुठलाही पदार्थ कुणाही घरी आयता तयार विकत आणलेला असणार हे आता लपविण्याइतकं नवीन राहिलं नाही. पुरणपोळी, कुरड्या-पापड, लोणची-मसाले, पिठं-भाजण्या-पिठी-रवा-मेतकूट.... वाट्टेल ते. घरी कुठं करता! आता तर हे जिन्नस विकत आणून घरी पाहुणचार करणं हेसुद्धा जिकीरीचं आहे. कुणी घरी यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी आवरासावर करावी लागते. फुलदाणीतले गेंद प्लॅस्टिकचेच असले तरी ते स्वच्छ करावे लागतात. पलंगपोस बदलावे लागतात, बेसीन धुवावे लागते. शिवाय नंतर खरकट्या भांड्यांचा ढीग पडतो, अन्न उरून बसतं!