कृषीची अपेक्षा
- अभय भंडारी, विटे
आपल्या प्रगतीशील महाराष्ट्नत लक्षावधी एकर जमिनी सध्या, शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे पडीक आहेत. या जमिनीवर आपण `ऑक्सिजन पार्क' अर्थात प्राणवायू उद्याने उभी करू शकतो. सांगली जिल्ह्यात विट्याजवळ गार्डी येथे या प्रकारचा एक छोटासा पथदर्शी प्रकल्प साडेतीन एकरात २३०० झाडे लावून (८० ते ९० प्रकारची) निर्माण केला आहे. त्यास २००३ च्या दुष्काळात प्रारंभ करताना त्या शेकडो एकर पसरलेल्या माळरानावर जिवंतपणाचे कसलेच लक्षण नव्हते. आम्ही सुरुवातीला अर्धा एकर क्षेत्रात कडुनिंब, चिंच, शेवगा, सीताफळ, गुळभेंडी या प्रजातींची रोपे लावली. त्या ४५० रोपांना रोज अवघे ५० लि. पाणी नेऊन सलाईनच्या बाटल्या बांबूवर टांगून त्यातून थेंबाथेंबाने दिले. रोज अवघे ५० लिटर पाणी त्या माळरानावर २००३ च्या भयंकर दुष्काळातही ४५० रोपांना पुरले. सारी रोपे हिरवीगार असायची. आता २०१० पर्यंत क्षेत्र वाढवून साडेतीन एकर क्षेत्रामध्ये २३०० झाडे आहेत. यासाठी ५ हजार लिटर पाणी टँकरने घेऊन ते साठविता येईल अशा सिमेंटच्या टाक्या जमिनीवरील उंचवट्यावर ठेवल्या. पाईपने सर्वत्र पाणी उताराने फिरवून नैसर्गिक दाबाने डि्न्पद्वारे रोपांना देण्याची व्यवस्था केली. पहिल्या अर्ध्या एकर क्षेत्रात आता जवळपास जंगल तयार झाले आहे. अजून दोन-तीन वर्षात या क्षेत्रात जमिनीवर सूर्यप्रकाश पडणार नाही. या संपूर्ण क्षेत्रात येत्या पाच वर्षात अक्षरश: जंगल तयार होईल.
या साऱ्या झाडांसाठी २००३ पासून आजअखेर टँकरने विकत घेतलेले एकूण पाणी केवळ ९.४५ लाख लिटर्स आहे. विट्यात नगरपालिकेच्या नळाच्या केवळ तीन कनेक्शनला (ज्याला रोज पाऊण तास पाणी येते) एका वर्षात जेवढे पाणी येते, तेवढे पाणी आम्हाला सात वर्षे पुरले. त्यातून शंभर वर्षे किंवा त्यापुढे कितीही वर्षे पावसाच्या पाण्यावर आपोआप चालेल, प्रतिवर्षी वृद्धिंगत होईल, अशी ही या प्रगत जगातली एकमेव स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे.
साधारण दहा वर्षाचे बाभळीचे झाड त्याला कधीही कुणी थेंबभरही पाणी न घालता प्रकृतीने स्वत: वाढवलेले, सध्या सरपण म्हणून किमान १२०० ते १५०० रुपये देते. याचा साधा सरळ अर्थ असा की, भारतात असलेल्या वनसंपदेतील कुठलेही झाड प्रतिवर्षी १०० रु.पेक्षा जास्त उत्पन्न देते. एक एकर क्षेत्रात अत्यल्प पाण्याचा वापर करून (रोज फक्त २०० लिटर आणि तेही केवळ जानेवारी ते मे पर्यंत) ४३५ झाडे लावून दहा वर्षात जंगल तयार करता येईल. या झाडांना पहिली तीन वर्षेच पाणी घालावे लागेल, नंतर कधीही नाही. दहा वर्षांनी यातले प्रत्येक झाड प्रतिवर्षी केवळ १०० रु. उत्पन्न देईल, तरीही वर्षाकाठी ४३५०० रु. मिळतील. यापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न देणारी झाडे लावणे सहज शक्य आहे.
गार्डी येथील प्रकल्पात कित्येक प्रकारची झाडे आहेत. कोरफडीचे ४००/५०० कंद आहेत. तुळस वगैरे अनेक वनौषधी आहेतच. वरील प्रत्येक प्रजातीच्या झाडाचे अर्थशास्त्र आम्ही कधीच का मांडले नाही? ताणतणावांनी प्रगत समाजाला देणगी म्हणून दिलेला `मधुमेह' जांभळाच्या सरबताने किंवा बेलाच्या त्रिदलाने नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यवस्था उभी केली, तर जांभळाचे/बेलाचे (बेलफळापासून ७० व्याधींवर उपचार करण्यासाठी औषधे तयार करता येतात) अर्थशास्त्र आम्ही आजवर का मांडले नाही? जांभूळ ४० रु.किलो, एक रामफळ २५/३० रु., अंजिर ४० रु.किलो, आवळा २५ रु.किलो यासारखे फळांचे दर असताना आम्ही आमच्या प्रचंड पडीक भूमीवर या वृक्षांची लागवड करण्याचा राष्ट्नीय कार्यक्रम का हाती घेतला नाही? गार्डीच्या वनात ३ ते ४ फूट उंच गवत उगवते. माळरानावर गवताची उंची जास्तीत जास्त ६ ते ९ इंच असते. एवढा फरक जलसंधारण व वृक्ष लागवडीमुळे पडतो. या रसरशीत गवताच्या पेंढ्या बांधून जनावरांना (विशेषत: गोधन) चारल्या तर त्यावर किती पशुधन सांभाळता येईल? त्यापासून मिळणारे शेणखत, गोमूत्र, त्यापासून व कडुनिंबापासून करता येणारी कीटकनाशके, त्यामुळे शेतीतला किती खर्च कमी होईल? पशुधनापासून मिळणारे दूध, त्यापासून दही, ताक, लोणी, तूप हे सारे (भारतात मल्टी नॅशनल्स पेप्सी/कोलासारखी कार्बोेनेटेड सॉफ्ट डिं्न्क्स विकून हजारो कोटी रुपयांची उलाढाल करीत असताना) या श्रीकृष्णाच्या देशात अमृतासारखे आरोग्यदायक ताक, फळांचे रस आम्हाला का विकता येऊ नयेत?
विकासाच्या नावाखाली मानवी समाजाने नवीन समस्या जन्माला घातल्या आहेत. वाढते तापमान, पाण्याची भूगर्भात खोल गेलेली पातळी, कमी होणारी वनसंपदा, त्यामुळे जलसंधारण न होणे, जमिनीवरची माती पावसाळयात वाहून जाणे, ती जलाशयात साठल्याने पाणी साठ्याची क्षमता कमी होणे, पावसाळयात महापूर आणि डिसेंबर-जानेवारीनंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य, पशूधनासाठी चारा नसल्याने ते कमी होणे, सेंद्रिय खते कमी झाल्याने रासायनिक खतांवर वाढलेले अवलंबन, त्यांच्या आयातीसाठी डॉलर्समध्ये मोजावे लागणारे हजारो कोटी रुपये, गोमूत्र व कडूनिंबाचा व अशाच अनेक प्रजातींचा कीटकनाशक म्हणून वापर न केल्याने हजारो कोटी रुपयांची विषारी कीटकनाशकांची इथे तयार झालेली बाजारपेठ, या भयंकर विषारी कीटकनाशकांनी प्रदूषित केलेला शेतीमाल, त्या विषारी भाज्या, फळे खाण्याने होणाऱ्या व्याधी, खालावलेली प्रतिकार शक्ती, अॅलोपॅथीच्या औषधांची इथे वाढलेली ११ लाख कोटी रुपयांची प्रचंड बाजारपेठ, या औषधांच्या गोळीबाराने व त्यांच्या साईड इफेक्टस्नी त्रस्त झालेला जर्जर समाज, वाढती बेरोजगारी, अनियंत्रित शहरीकरणाने आलेला बकालपणा, गुन्हेगारी, ताणतणाव, गमावलेले मन:स्वास्थ्य..... अशी ही समस्यांची यादी कितीही वाढवता येईल.
या साऱ्या समस्यांवर शेतीस वनीकरणाची जोड देऊनच मार्ग काढता येईल, आजही या देशात किंवा जगात कुठल्याही व्यवसायात/प्रगत तंत्रज्ञानाने जेवढा रोजगार निर्माण करता येईल, त्याच्या कितीतरी पट जास्त रोजगार शेती व वनांवर आधारित व्यवस्थेतून निर्माण होईल.
अभयजी आपला संपर्क नं असल्यास कृपया मिळावा
ReplyDelete