गणकचक्र चुडामणी भास्कराचार्य प्रा. मोहन आपटे. भारतात अतिप्राचीन काळापासून अनेकविध शास्त्रांमध्ये विद्वानांच्या परंपरा निर्माण झाल्या. गणित व खगोलशास्त्र हे भारतीयांचे खास विषय होते. दशमान पद्धती आणि शून्य ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, बल्लाचार्य, पद्मनाभ, श्रीधर, महावीराचार्य, नारायण पंडित अशी गणितज्ज्ञ आणि खगोलविदांची एक महान परंपरा भारतात निर्माण झाली. द्वितीय भास्कराचार्य हे त्या ज्ञानमंदिराचे शिखर आहे. म्हणूनच त्यांना गणकचक्र चुडामणी या पदवीने गौरविण्यात येते. विद्वानांचा वंशवृक्ष असे भास्कराचार्यांच्या पूर्वजांचे वर्णन करता येईल. कवी चक्रवर्ती त्रिविक्रम, विद्यापती भास्करभट्ट, सर्वज्ञ गोविंद, सूर्यसमान प्रभाकर, सज्जनांचे मनोरथ पूर्ण करणारे मनोरथ, कवीश्वर महेश्वराचार्य असे एकापेक्षा एक विद्वान निपजलेल्या कुळात भास्कराचार्यांचा जन्म झाला. महेश्वराचार्यांचे पुत्र भास्कराचार्य हे त्या पिढीचे सातवे सुपुत्र होते. भास्कराचार्यांच्या लक्ष्मीधर या पुत्रालाही देवगिरीच्या जैत्रपाल राजाने `विद्यापती' अशी पदवी देऊन आपल्या दरबारात पाचारण केल