नवी दिशा समजून घ्यावी नव्या युगाच्या चाहुलीतून टपालखाते आता ताजेतवाने होऊ पाहात आहे. पोस्टाची आजची सेवा इंग्रजांच्या काळात सुरू झाली, त्यास दीडशे वर्षे उलटून गेली. त्यापूर्वी टपाल-वहन होतच असे. कोणी दूत पाठवीत, कुणी खलिता पाठवीत, कुणी सांडणीस्वार पाठवीत. कबुतराच्या चोचीत पत्र-चिठी देऊन पाठविण्याची कविकल्पना कदाचित प्रत्यक्षातही असू शकेल. हे संदेशवहनाचे प्रकार इतिहासजमा झाले, आणि इंग्रजांची डाक-सेवा आजपर्यंत अथक चालू आहे. इलेक्ट्नॅनिक्स-ई मेल व सेलफोनच्या जमान्यात पत्रलेखन कमी झाले ही तर वस्तुस्थिती आहे. हल्ली पोस्टाच्या पेटीत पत्रे फारशी पडत नाहीत, त्यावरून `पोस्ट खाते बंदच होईल' असे बरळणारे काही महाभाग पाच-दहा वर्षांपूर्वी होते. परंतु आता त्यांची गणना वेड्यातच करावी लागेल. कारण पोस्टात येणारी पत्रे कमी झाली तरी इतर असंख्य प्रकारचे टपाल इतके वाढले की, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना दररोज कामाचा डोंगर उपसावा लागतो. फोनबिले, अहवाल, नोटीसा, विमा, वगैरेंचे प्रमाण महाप्रचंड वाढले आहे. त्याशिवाय पोस्टाच्या नव्यानव्या योजना, आवर्ती ठेव, पोस्टल विमा, ईएमओ वगैरेंनी प्रत्यक्ष पत्रसेवेची कसर