झाशीची लक्ष्मी
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव भारतीय इतिहासात कोरले गेले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंगरात त्यांना वीरगती मिळाली, हा स्फुलींग सर्वज्ञात आहे. परंतु त्याआधीचा त्यांच्या राज्यकारभाराचा दरारा कसा होता हे लक्षात आणून देणारे हे वर्णन.
वरसई (जि.रायगड) येथील विष्णुभट गोडसे यांनी त्या कालखंडात उत्तर भारतात केलेल्या प्रवासाचा वृत्तांत `माझा प्रवास' या पुस्तकाने प्रसिद्धी पावला. झाशीतील त्यांच्या वास्तव्यातून `हुजुरां'ची दिनचर्या समजते, ती वेधक वाटेल -
बाईसाहेबांचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यांस शरीराचा षोक लहानपणापासून होता तो त्यांनी स्वतंत्रता मिळाल्यावर पूर्ण केला. पहाटेस उठून कसरतशाळेत जाऊन जोर, जोडी, मलखांब करावा. नंतर घोड्यावर बसून फिरावयास जावे व घोडा मंडळावर धरावा, कुंपणावरून उडवावा, खंदकाचे पार घालवावा, एकदम खाली बसवावा इत्यादी नाना प्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्यात. कधी कधी हत्तीवरही बसत. याप्रमाणे सात आठ वाजेपर्यंत मेहनत झाल्यावर नेहमी खुराक खात असत. नंतर तासभर कधी निजत असत. कधी तशाच स्नानास जात.
स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र परिधान करून आसनारूढ होऊन भस्म धारण करीत. प्रथम पतिमरणानंतर केस राखण्याबद्दल तीन कृच्छ्न्े प्रायश्चित्त आहे, त्याचे उदक सोडून नंतर रुप्याचे तुळशीवृंदावनात तुळशीची पूजा करीत असत, नंतर श्रीपार्थिवलिंग-पूजेस आरंभ होत असे. त्या समयी सरकारी गवई गात असत, पुराणिकांचे पुराणही त्यात सुरू असे व सरदार व आश्रित लोकांचे मुजरे होत असत. परंतु बाईसाहेबांचे लक्ष चोहोकडे सारखे असे. जर एखादे दिवशी दीडशे मुजरे करणारांपैकी कोणी आला नाही तर दुसरे दिवशी `काल आपण का आला नाही' ही चौकशी होत असे.
तीन वाजण्याचे सुमारास कचेरीत जात असत. त्यावेळेस कधी पुरुषवेष धारण करीत. पायात पायजमा, अंगात जांभळे आंबव्याची बंडी, डोकीस टोपी घालून वर पागोट्यासारखी बांधलेली बत्ती, कमरेस काच्या किंवा जरीचा दुपेटा व त्यास लटकवलेली तलवार, या प्रकारच्या पोषाखाने ती गौरवर्ण, उंची मूर्ती गौरीप्रमाणे दिसत असे. कधी बायकांचा पेहराव असे; परंतु पतिमरणानंतर नथ वगैरे अलंकार त्यांनी बिलकुल घातले नाहीत. फक्त हातात सोन्याच्या बांगड्या व गोठ, गळयात एक मोत्याचे पेंडें व अनामिकेत एक हिऱ्याची अंगठी याशिवाय दुसरे अलंकार आम्ही बाईसाहेबांचे अंगावर कधीच पाहिले नाहीत. केसांचा नेहमी बुचडा बांधलेला असे व नेसावयास पांढरा शालू व अंगात स्वच्छ पांढरी चोळी असे. याप्रमाणे कधी पुरुषवेषाने तर कधी स्त्रीवेषाने दरबारात येऊन, एक खोलीसारखी पडतपोशीची जागा होती व त्याच्या दरवाजास बाहेरून सोनेरी मेहरब होती. त्या दरवाजाचे आत गादी घालून सरपोस घातलेल्या जाग्यावर लोडाशी टेकून बसावे. दरवाजाचे बाहेर दोन मालदार रुप्याची काठी घेऊन हजर असत. समोर राजेश्री लक्ष्मणराव दिवाणजी कंबर बांधून हातात कागदांचे पुडके घेऊन उभा असे व पलीकडे हुजूरचे सात आठ कारकून बसलेले असत.
कचेरीत सर्व दिवाणी, फौजदारी, मुलकी कामे होत असत. बाईसाहेब बुद्धीच्या फार चपळ असल्यामुळे हकीकत ताबडतोब समजून भराभर हुकूम सांगत असत. कधी स्वत: लिहिता वाचता येत असल्यामुळे मजकूर जुळवून आपण हुकूम लिहीत असत. बाईसाहेब न्यायाचे कामात फार दक्ष व कडक होत्या. अपराध्यास कधी कधी स्वत: छडी घेऊन शिक्षा करीत. दर शुक्रवारी व मंगळवारी सर्व स्वारी तयार करवून मुलास बरोबर घेऊन संध्याकाळी महालक्ष्मीचे दर्शनास जाण्याचा नियम होता.
***
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव भारतीय इतिहासात कोरले गेले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंगरात त्यांना वीरगती मिळाली, हा स्फुलींग सर्वज्ञात आहे. परंतु त्याआधीचा त्यांच्या राज्यकारभाराचा दरारा कसा होता हे लक्षात आणून देणारे हे वर्णन.
वरसई (जि.रायगड) येथील विष्णुभट गोडसे यांनी त्या कालखंडात उत्तर भारतात केलेल्या प्रवासाचा वृत्तांत `माझा प्रवास' या पुस्तकाने प्रसिद्धी पावला. झाशीतील त्यांच्या वास्तव्यातून `हुजुरां'ची दिनचर्या समजते, ती वेधक वाटेल -
बाईसाहेबांचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यांस शरीराचा षोक लहानपणापासून होता तो त्यांनी स्वतंत्रता मिळाल्यावर पूर्ण केला. पहाटेस उठून कसरतशाळेत जाऊन जोर, जोडी, मलखांब करावा. नंतर घोड्यावर बसून फिरावयास जावे व घोडा मंडळावर धरावा, कुंपणावरून उडवावा, खंदकाचे पार घालवावा, एकदम खाली बसवावा इत्यादी नाना प्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्यात. कधी कधी हत्तीवरही बसत. याप्रमाणे सात आठ वाजेपर्यंत मेहनत झाल्यावर नेहमी खुराक खात असत. नंतर तासभर कधी निजत असत. कधी तशाच स्नानास जात.
स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र परिधान करून आसनारूढ होऊन भस्म धारण करीत. प्रथम पतिमरणानंतर केस राखण्याबद्दल तीन कृच्छ्न्े प्रायश्चित्त आहे, त्याचे उदक सोडून नंतर रुप्याचे तुळशीवृंदावनात तुळशीची पूजा करीत असत, नंतर श्रीपार्थिवलिंग-पूजेस आरंभ होत असे. त्या समयी सरकारी गवई गात असत, पुराणिकांचे पुराणही त्यात सुरू असे व सरदार व आश्रित लोकांचे मुजरे होत असत. परंतु बाईसाहेबांचे लक्ष चोहोकडे सारखे असे. जर एखादे दिवशी दीडशे मुजरे करणारांपैकी कोणी आला नाही तर दुसरे दिवशी `काल आपण का आला नाही' ही चौकशी होत असे.
तीन वाजण्याचे सुमारास कचेरीत जात असत. त्यावेळेस कधी पुरुषवेष धारण करीत. पायात पायजमा, अंगात जांभळे आंबव्याची बंडी, डोकीस टोपी घालून वर पागोट्यासारखी बांधलेली बत्ती, कमरेस काच्या किंवा जरीचा दुपेटा व त्यास लटकवलेली तलवार, या प्रकारच्या पोषाखाने ती गौरवर्ण, उंची मूर्ती गौरीप्रमाणे दिसत असे. कधी बायकांचा पेहराव असे; परंतु पतिमरणानंतर नथ वगैरे अलंकार त्यांनी बिलकुल घातले नाहीत. फक्त हातात सोन्याच्या बांगड्या व गोठ, गळयात एक मोत्याचे पेंडें व अनामिकेत एक हिऱ्याची अंगठी याशिवाय दुसरे अलंकार आम्ही बाईसाहेबांचे अंगावर कधीच पाहिले नाहीत. केसांचा नेहमी बुचडा बांधलेला असे व नेसावयास पांढरा शालू व अंगात स्वच्छ पांढरी चोळी असे. याप्रमाणे कधी पुरुषवेषाने तर कधी स्त्रीवेषाने दरबारात येऊन, एक खोलीसारखी पडतपोशीची जागा होती व त्याच्या दरवाजास बाहेरून सोनेरी मेहरब होती. त्या दरवाजाचे आत गादी घालून सरपोस घातलेल्या जाग्यावर लोडाशी टेकून बसावे. दरवाजाचे बाहेर दोन मालदार रुप्याची काठी घेऊन हजर असत. समोर राजेश्री लक्ष्मणराव दिवाणजी कंबर बांधून हातात कागदांचे पुडके घेऊन उभा असे व पलीकडे हुजूरचे सात आठ कारकून बसलेले असत.
कचेरीत सर्व दिवाणी, फौजदारी, मुलकी कामे होत असत. बाईसाहेब बुद्धीच्या फार चपळ असल्यामुळे हकीकत ताबडतोब समजून भराभर हुकूम सांगत असत. कधी स्वत: लिहिता वाचता येत असल्यामुळे मजकूर जुळवून आपण हुकूम लिहीत असत. बाईसाहेब न्यायाचे कामात फार दक्ष व कडक होत्या. अपराध्यास कधी कधी स्वत: छडी घेऊन शिक्षा करीत. दर शुक्रवारी व मंगळवारी सर्व स्वारी तयार करवून मुलास बरोबर घेऊन संध्याकाळी महालक्ष्मीचे दर्शनास जाण्याचा नियम होता.
***
Comments
Post a Comment