Skip to main content

Lekh on IPL Matches

फसवणूकीची साखळी
- विवेक ढापरे, कराड  (मोबा. ७५८८२२११४४)
पूर्वी  आपल्याकडे राजे-महाराजे स्वत:च्या करमणुकीसाठी बैलांना, कोंबड्यांना विकत घेऊन त्यांच्या झुंजी लावून, पैसे उधळून, आपली करमणूक करून घ्यायचे. आय पी एल हा त्याचाच नवा  सुधारित अवतार वाटतो. इथे चित्रपट, व उद्योग क्षेत्रातील बडी धेंडे खेळाडूंचा लिलाव पुकारतात. खेळाडूंवर कोट्यावधींच्या बोली लावून त्यांना विकत घ्यायचे व मालकांच्या संघांनी एकमेकात सामने खेळायचे. लोकांना खुळे करून टाकतात, क्रिकेटवेडा भारतीय माणूस या तमाशाचा उत्सव करू पाहतो. दुनिया झुकतेच, हे झुकानेवाले आहेत!
मला क्रिकेट पाहण्याची फारशी आवड कधीच नव्हती. पोटापुरती भाजीभाकरी मिळवून प्रपंच करणारी आपण सामान्य माणसं, हल्ली त्या बड्या दुनियेत रमू लागलो. दोष आपलाच की! माझ्या पगारदार नवश्रीमंत भाच्याने तिकीटे काढली होती, त्यामुळे अनवधानाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, मला आयपीएल चा सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी(?) मिळाली.
१५ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रात्रौ ८ वाजता मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होता. आम्ही संध्याकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास वानखेडे स्टेडियमच्या बाहेरील बाजूस पोहोचलो. प्रवेश मिळविण्यासाठी चटक मटक तारुण्याची झुंबड उडाली होती. मुंबई इंडियन्सचे टी-शर्ट स्वत:च्या पैशाने बाजारातून खरेदी करून, सर्वजण मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्यासाठीच निघाले होते. तोंडावर चित्रविचित्र रंगवून घेण्यासाठी जवळच्या रस्त्यावर ५० रुपये घेतले जात होते, तिथेही गर्दी झाली होती.
जिन्यावरून स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी रीघ लागली होती. धातूशोधक यंत्राजवळ सर्वांची तपासणी होती. खिशातली चिल्लरसुद्धा काढून घेतली, मॅच संपल्यावर ती परत देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. खाद्यपदार्थ, पाणी, स्त्रियांना तर पर्ससुद्धा आत न्यायला मनाई होती. सर्वांनी मोकळया अंगाने, मोकळेपणाने सामन्याचा आनंद लुटावा, अशी आयोजकांची मनापासून इच्छा असावी. आणि `बर' म्हणण्याशिवाय इलाज नव्हता. एवढे सगळे सव्यापसव्य करून सात वाजण्याच्या सुमारास आम्ही स्टेडियममध्ये पोहोचलो.
सुनील गावसकर स्टॅन्डमध्ये आमची बसायची जागा होती. प्रत्येक सीटवर मुंबई इंडियन्सचे निळे झेंडे ठेवले होते. म्हणजे तुमच्या मनात असो-नसो, तुम्ही मुंबई इंडियन्सलाच प्रोत्साहन द्यायचे, असा सारा मामला. स्टेडियममधील झगमगाट आणि उत्सवी वातावरण पाहून, आपण नक्की अटीतटीचा सामना बघायला आलोय की जत्रा बघायला आलोय, याविषयीच संभ्रम निर्माण झाला. कर्णकर्कश संगीत लावलेले होते, कदाचित ध्वनी प्रदूषणाचा नियम इथे लागू नसावा. त्यावर उभय संघांच्या चिअरगर्ल्स आणि उत्साही प्रेक्षक (यामध्ये स्त्रियांचा भरणा अधिक होता) नाच करत होते. असे नाचणाऱ्यांत `महिला' होत्या असे आपले आपण म्हणायचे, कारण आपण सभ्य असावे. अन्यथा त्या फटाकड्या पोरी, बाया किंवा तत्सम नारीविश्व आपल्यासारख्यांच्या घरातले नसावे. परंतु हाही माझा भाबडा समज. हल्ली साधारण घरांतूनही ते विश्व संचारू लागले म्हणतात.
एका बाजूला मुंबई इंडियन्सचे खेळाडू बॅटने चेंडू उंच उडवून झेल पकडण्याचा `सराव' करीत होते. मैदानातील एकूण वातावरणानुसार या सरावामध्येही गांभीर्याचा अभावच होता. शाळेतल्या पोरांचे पाहून हा सराव करतात म्हणे. अशा सर्व गदारोळातच रोहित शर्मा व राहुल द्रविड हे उभय संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले. रवि शास्त्रीबरोबर त्यांचा झालेला संवाद मैदानातील स्क्रीनवर पाहायला मिळाला. मैदानातील जत्रा हळूहळू पांगायला लागली. बरोबर आठ वाजता सामन्यास सुरुवात झाली. आम्ही बसलेल्या स्टॅन्डच्या बाजूलाच एक मंच होता. तेथे माईक हातात घेऊन एक व्यक्ती जोरजोराने ओरडून `थ्री चिअर्स फॉर मुंबई इंडियन्स' असे म्हणत प्रेक्षकांना उठवून त्यांना झेंडे हातात घेऊन नाचायला लावत होती. आणि खुळावलेले प्रेक्षक प्रतिसाद देत होते. सामन्यापेक्षा आमचे लक्ष तिकडेच वळत होते. या मंचावर अधूनमधून भुसनळेही फुटत होते. खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकारावर उभय संघाच्या तोकड्या कपड्यातील चिअर गर्ल्स नाच करून खेळाडूंचा हुरूप आणि आमची अस्वस्थता वाढवत होत्या.
सामन्यासाठी आत येताना बरोबर काही नेऊ का दिले नाही याचा उलगडा थोड्याच वेळात झाला. स्टॅन्डमध्ये फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडील पदार्थांचे दर पाहून एरवी मला धक्काच बसला असता. पाण्याची बाटली ५०/-रुपये, सामोसे ५०/- रुपये, वेफर्स ३०/- रुपये, पिझ्झा १७०/-रुपये, कोक ६०/-रुपये, साधे पॉपकॉर्न ५०/-रुपये इतके भयानक दर असूनही पदार्थांना प्रचंड मागणी होती व फेरीवाल्यांकडील पदार्थ लगोलग संपत होते. छापील किंमत वगैरे बंधन नव्हते. त्यांना कोण हटकणार? स्टेडियमवर चारही बाजूंनी सोडलेले प्रखर विद्युत झोत, सामन्यापूर्वी भरपूर पाणी मारून हिरवेगार केलेले मैदान आणि इतक्या अवाजवी दरातील खाद्यपदार्थांना असलेली मागणी पाहता, रोज पाहात असलेल्या दुष्काळाच्या बातम्या खोट्या तर नाहीत ना; असे वाटायला लागले.
अशा सगळया वातावरणात रात्रौ ११.३० च्या सुमारास, अपेक्षेप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे मुंबई इंडियन्सनेच सामना जिंकला. मग मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सचिन तेंडुलकरसह मैदानाभोवती फेरी मारली आणि उपस्थित क्रिकेटप्रेमी धन्य झाले. आम्हीही धन्यधन्य झालो. त्यांनी फेकलेल्या टोप्या उचलायला क्रिकेटप्रेमींची झुंबड उडाली होती. आपल्याला सगळयांनी टोप्या घातल्याचे विसरून सर्वजण त्या टोप्या मिळवण्यासाठी आतुर झाले होते. सामना संपवून बाहेर आलो तर चिल्लर परत देतो म्हणणारे चिल्लरसह गायब होते. ७५० रुपयांचे तिकीट काढून पाहिलेल्या या सामन्यामध्ये सुरुवातीला खुर्चीवर ठेवलेले झेंडे, हीच काय ती फुकट मिळालेली एकमेव गोष्ट!
दुसऱ्या दिवशीचा पेपर बघतो तो आयपीएल मधील फिक्सिंगच्या बातम्या! एवढे पैसे खर्च करून, स्वत:चा वेळ घालवून बहुधा आधीच फिक्स केलेला सामना आपण बघितला याचा पश्चात्ताप वाटू लागला. लहानपणी शाळेत असताना आम्ही मुले एका जत्रेला गेलो होतो. तिथं असले बरेच खेळ - गंडवागंडवीचे - होते. नको नको म्हणत असताना आमच्यातला एक मोरू तिथं गेला, आणि त्यावेळी वडिलांनी दिलेले पाच रुपये घालवून आला. त्याचा केविलवाणा चेहरा आज मला आठवतो आहे.
हद्दीबाहेर गेलेल्या क्रिकेटवेडाचा फायदा घेत करोडो रुपयांचा मलिदा मिळवायचा हे सगळे थांबवायला हवे असेल तर कोण थांबवेल? आता प्रेक्षकांनीच नशेतून स्वत:ला बाहेर काढून, सारासार विचार करायला हवा की, कुठंपर्यत आपण या व्यसनापायी स्वत:ची फसवणूक करून घ्यायची आणि आपल्याला मूर्ख बनवणाऱ्या लोकांची धन करून द्यायची? या प्रश्नाच्या उत्तरातच सारे काही दडलेले आहे.
आम्ही आमच्या (भाच्याच्या) खिशातले प्रत्येकी हजारभर रुपये तिथं दौलतजादा करून आलो, आता हे सांगावं तरी कसं? पण त्या वाटेला जाणाऱ्यांना सावध करावं इतकंच!
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...