भूदान पदयात्रेतील मंतरलेले दिवस ! डिसेंबर १९५६. मी आठवीत होतो. गुहागर येथील श्री गोपाळकृष्ण विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री.गो.श्री.सोमण यांच्या आग्रहावरून आम्ही पाच-सात विद्यार्थी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रेत सामील होण्यासाठी दाभोळमार्गे दापोली येथे पोचलो. दापोलीला केळुसकर हॉटेलजवळ एक चर्च होते, त्याच्या शेजारी आमची व्यवस्था केली होती. अतिशय भाग्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्यांना कोकणचे गांधी म्हटले जायचे, ते पूज्य अप्पासाहेब पटवर्धन, तसेच अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, दादा धर्माधिकारी, एस.एम.जोशी इत्यादी महान नेत्यांची भाषणे ऐकायला मिळाली. त्यांचा अल्पसा का होईना सहवास लाभला, त्यांच्याशी बोलायला मिळाले. हे सुवर्णाचे क्षण म्हणता येतील. त्यांचे विचार समजून घ्यायचे ते वय नव्हते, परंतु एक वेगळा अनुभव निश्चित मिळाला. पूज्य अप्पासाहेब पटवर्धन हे बोलताना सतत टकळीवर सूत कातत असत. ही सर्व माणसे नि:स्पृह, निगर्वी आणि निष्ठावान समाजसेवक. भूदानविषयक शिबीरात आमचे जीवन जरा खडतरच होते. सकाळी ४ वाजता उठवीत. प्रभात फेरी असायची. गोपुरी पद्धतीचे संडास मी तेथे प्रथ