Skip to main content

2 June 2014

फेब्रुवारी १९३३ मध्ये सिटी हायस्कूल सांगलीच्या गॅदरिंगनिमित्त 
विलिंग्डन कॉलेजचे तत्कालीन प्रिन्सिपल रॅग्लर ग.स.महाजनी यांचे भाषण झाले, 
त्याचा संक्षिप्त भाग. आजही ते विचार लागू पडतील.
......जुन्या-नव्याचा मेळ हवा!......
जगात अनेक विषयांसंबंधी वाद सुरू असले तरी दोन गोष्टी निर्विवाद आहेत. आपण जन्माला आलो आहोत ही पहिली आणि आपण या जगात कायम राहणार नाही ही दुसरी. अशा मधल्या स्थितीत जगावयाचे कसे? अनेकांशी आपला संबंध येतो, त्यांच्याशी वागावे कसे? भेटणाऱ्या लोकांना कोपरखळया मारावयाच्या की सर्वांशी सलोख्याने वागावयाचे?
आपल्या शास्त्रकारांनी एक वचन लिहिले आहे, `अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थंच साधयेत्' विद्या आणि धन मिळविताना आपणाला म्हातारपण अगर मृत्यू नाही अशी श्रद्धा पाहिजे. समाजाच्या सुखासाठी पाश्चात्यांनी अनेक सोयी केल्या पण त्यापासून सुख लागत नाही, हे महायुद्धापासून तेथील लोकांना कळून चुकले आहे. इंग्लंडात स्वराज्य असले तरी बेकारीचा प्रश्न सुटत नाही. अमेरिका त्याहून श्रीमंत, पण तेथेही तो प्रश्न आहे. लोकमतानुवर्ती राज्यपद्धती चांगली असे म्हणावे तर मेक्सिकोसारख्या देशात दर तीन महिन्यात एका अध्यक्षाचा खून असे प्रमाण पडते. याला कारण म्हणजे आपल्या शास्त्रकारांनी घालून दिलेल्या आज्ञेचा उत्तरार्ध अनुसरला जात नाही. तो उत्तरार्ध म्हणजे `गृहीतप्रियं केशेषु मृत्युना धर्ममाचरेत' पूर्वीच्या व या ओळींत परस्पर विरोध दिसेल. या दोन्ही भागांत सांगितलेल्या तत्त्वांचे मिश्रण करून ते आचरणात उतरविले पाहिजे. दुसऱ्या ओळीत सांगितलेला नैतिक व धार्मिक विचार पाश्चात्यांनी बिलकूल मनात आणला नाही, उलटपक्षी आपले लोक परोपकार व परमार्थ यांचे मागे लागल्यामुळे आमची आधिभौतिक प्रगती खंटली. या दोन्ही बाबींचे आचरण घडले तर सर्व प्रश्न आपोआप मिटतील.
सुखासाठी तयार झालेल्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग दु:खासाठी करता येतो. दुष्काळग्रस्त मुलुखात रेल्वेने धान्य नेता येते त्याप्रमाणेच लढाईत मनुष्य-संहारासाठी लष्कर व दारूगोळा रेल्वेनेच वाहून नेता येतो. दोन्हीही तत्त्वे आचरणात उतरल्याशिवाय सुख लाभणार नाही. म्हणूनच पाश्चात्य व पौरस्त्य संस्कृतीचा मिलाफ करण्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांवर असलेला आपणाकडील जुन्या शिक्षकांचा पगडा उडत चालला आहे. त्यामुळे त्यांची अमर्यादपणाची वागणूक होते, असा आरोप करण्यात येतो. विद्यार्थी कर्तव्यभ्रष्ट होत चालला आहे अशी ओरड सुरू आहे. विद्यार्थ्यांवरील ही टीका  अप्रस्तुत आहे. विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे आपली कर्तव्ये आहेत त्याप्रमाणे हक्कही आहेत. त्याच्या कर्तव्याची आठवण आपणास होते. पण त्याच्या हक्काची जाणीवही असत नाही. जीवितयुद्धात जी त्यांचे ठिकाणी पात्रता असावी लागते तिची पूर्वतयारी पालकांनी करून दिलेली असत नाही. उत्तम गृहशिक्षणाची आवश्यकता आहे. शाळेत संस्कृतीचे वातावरण नसते. मुलाला शाळेत घातले म्हणजे आपले काम झाले असे कोणीही समजता कामा नये.
बाप पाय धुतल्याशिवाय पाटावर बसत नाही असे दिसले तर मुलांचे आचरण तसे राहील. पूर्वी वृद्ध माणसाकडून हे धडे मुलांना आपोआप मिळत असत. शाळेत घालण्यापूर्वी मुलांची बौध्दिक व नैतिक पूर्वतयारी (मेंटल अॅन्ड मॉरल मेक अप) झाली पाहिजे. असे होईल तर अलीकडील विद्यार्थ्यांच्या मनाला स्थैर्य नाही, त्यांचे ठिकाणी कोणाबद्दलही आदर नाही अशी कुरकूर करण्याचे कारण उरणार नाही. वडिलांनी उदाहरणाने घालून दिलेेले शिक्षण दूरगामी असते. युनिव्हर्सिटीकडून मिळणार नाही असे ते शिक्षण असते. लष्करातही प्रथम वैयक्तिक शिक्षण एखाद्या एन.सी.ओ.च्या हाताखाली होते व नंतर त्या मनुष्याचा सामुदायिक कवायतीत प्रवेश होतो. दगडाला पाथरवटाकडून प्रथम आकार देण्यात येऊन नंतरच त्याचा भिंतीचे कामी उपयोग होतो.
हल्ली विद्यार्थ्यांच्या कर्तव्याबद्दल अनेक मतभेद दिसून येतात. कोणी म्हणतात की विद्यार्थ्याला आपल्या सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे वागू द्यावे. कित्येकांच्या मते पालक व शिक्षक यांच्या मनाप्रमाणेच त्यांनी वागले पाहिजे. माझे म्हणणे असे आहे की, `मन:पूतं समाचरेत्' अशी वागणूक ठेवण्यापूर्वी मनाचा जेवढा विकास व्हावा लागतो तेवढा होण्याची तरी वाट पाहणे जरूर आहे. यासाठी आपल्या वर्तणुकीला काहीतरी बंधने घालून द्या अशी माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे. विद्यार्थीदशेत गुरु अगर पालक सांगतील त्याच्या बाहेर जायचे नाही असा निश्चय करणे जरूर आहे. बुद्धिप्रामाण्यवादी मंडळी माझ्या या उपदेशाला नावे ठेवतील हे खरे! परंतु विद्यार्थ्यांच्या मनाची तितकी तयारी होण्यापूर्वी अशी बंधने घालणे जरूर आहे हेही तितकेच खरे. शारीरिक शिक्षणासाठी आपण काही बंधने पाळतो. झोप घ्यावी अशी इच्छा असतानाही पहाटे उठून व्यायामास लागतो, थंडी वाजत असतानाही गार पाण्यात उडी घेतो. सुधारणेसाठी अशा रितीने काही बंधने घेण्यास हरकत नाही. विचारांच्या स्वातंत्र्यासाठी आचारांवर बंधने घालणे अगदी सयुक्तिक आहे.
***

कोकणातील दुर्गम भागातील गोशाळा
कोकणाच्या एका दुर्गम भागातील खेडेगावी गोशाळेत जाऊन आलो. गोशाळेला देणगी तर द्यायची होतीच, पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायचे होते. माझ्या आई-वडिलांना गो सेवेचे फार महत्त्व वाटत असे. त्यांनी त्यांच्या परीने शक्य तेवढी गो सेवा केली आहे. त्या काळी घरी गोठ्यात गाय असेच.
एका ध्येयवेड्या माणसाने शिरसाडी व सातेरे गावांत गोशाळा चालू केल्याचे वृत्तपत्रात वाचले. त्या गृहस्थाना पत्र पाठवून गोशाळा पाहण्यास येत असल्याचे कळवले, लगेच ते मला नेण्यासाठी आले. ज्यांनी गोशाळा सुरू केली ते एक अगदी सामान्य आर्थिक स्थिती असलेले गृहस्थ. पूर्वी ते नोकरीनिमित्त मुंबईला काही वर्षे होते. नंतर गावी आले. शेजारच्या गावातून मधून मधून गाई वासरे ट्न्कमध्ये भरून खाटीकखान्यात नेत असत. ही गोहत्त्या थांबायला पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. एक प्रसंग असा आला की, शेजारच्या गावातील काही गाई कापण्यासाठी नेत आहेत, त्यात एक गाभण गायही आहे अशी त्यांना कुणकुण लागली. त्वरित त्यांनी आपले सवंगडी जमवले आणि `धाड टाकली.' संघर्ष उडाला. त्यात हे गृहस्थ जायबंदी झाले. मार पडला पण जी गाय गाभण होती, ती यांचेकडे आल्यावर विहाली, तिने एका बछड्याला जन्म दिला. ज्याने ही गोशाळा चालू केली त्या गृहस्थाचे नाव श्री.अनंत वाजे, ते गवळी समाजातील आहेत.
गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पण आज ७० गाई त्यांच्या गोशाळेत आहेत. त्यांना व त्यांचे मित्र श्री.प्रल्हाद यादव यांना आर्थिक पाठबळ कुणाचेही नाही. एक धर्मकार्य, पुण्यकार्य म्हणून हे काम त्यांनी अंगिकारले आहे. आमदारांपासून अनेक लोकांनी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले, पण..! तरीही वाजे यांनी हे काम जिद्दीने, नेटाने चालू ठेवले आहे. अनंत वाजे आणि त्यांचे मित्र प्रल्हाद यादव यांनी जवळपासच्या सर्व नगरपंचायती आणि म्युनिसिपालटी व वृत्तपत्रात जाहीर केले आहे की, कोणत्याही अवस्थेतील गाय आम्ही पाळू; ती भाकड, वृद्ध... कशीही असो! सध्या त्यांना गाईसाठी शेड व चारा पाण्याची विवंचना आहे. श्री.अनंत वाजे म्हणाले, ``आम्ही हे कार्य सुरू केले आहे. भगवान गोपाळकृष्ण, पांडुरंग आमची परीक्षा पाहतो आहे. अडचणीतून पांडुरंग- कृपेने बाहेर पडू, भविष्यात गोशाळा नावारूपास येईल, गोवंश वाचेल.''
शिरसाडी व सातेरे या गावांतील बहुसंख्य लोक वारकरी आहेत. पंढरपूरची वारी चुकवीत नाहीत. गावात एकही दारूभट्टी नाहीच, परंतु दारू पिणाराही कोणी नाही असे सांगण्यात आले.
- वा. मो. बर्वे, दापोली
फोन:(०२३५८)२८३०५२, ९९७५०९६४१६

अनंत वाजे यांचा पत्ता -
मु. शिरसाडी, पो. सातेरी
ता.दापोली, जि.रत्नागिरी ४१५७१२
फोन : (०२३५८) ६९२५२९
मोबा : ९२२५४४४४५०

विशेष दर्जा पुरे
श्री.नरेंद्र मोदी यांचे मंत्रीमंडळ कामाला लागल्यानंतर काश्मीरविषयक ३७० वे कलम रद्द करण्याचा विषय, चर्चेत - म्हणण्यापेक्षा वादात आला आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरघोस मतदान करून निवडून दिले आहे, त्यामुळे रेटून धोरणात्मक निर्णय घेण्यास ते सरसावणार हे निश्चितच आहे आणि त्यात गैर काहीच नाही. निवडणुकीआधी प्रसिद्ध केेलेल्या, त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख आहे.

मंत्रीमंडळात प्रथमच यावेळी डॉ.जितेंद्र सिंग या काश्मिरी पंडिताचा समावेश झाला आहे. पंडित नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण पंडितच होते पण स्वप्नाळू बंधुभाव आणि आपली समभाव-प्रतिभा यांच्या अतिरेकापोटी त्यांचे शेख अब्दुल्लाशी जास्त गूळपीठ होते. काश्मिर संस्थानचा राजा हरिसिंग यांच्या आडमुठेपणामुळे तो प्रदेश स्वतंत्र भारतात विलीन होण्यास विलंब झाला, तोवर पाकिस्तानी घूसखोरांनी निम्मे काश्मिर बळकावले; मग हे हरिसिंग धावत आले त्यावेळी विलीनीकरणासाठी हरिसिंग व नेहरूंचे लाडके कूळ अब्दुल्ला, यांची समजूत काढण्यासाठी काश्मिरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम घटनेत घालावे लागले. काश्मिर स्वायत्त ठेवून शेख अब्दुल्लास `पंतप्रधान' म्हणावे अशी त्याची मागणी होती. डॉ.आंबेडकर यांचा असल्या `वेगळेपणा'स स्पष्ट विरोध होता. पुढे `हरिसिंगाचे सुपुत्र' एवढ्याच पात्रतेवर करणसिंह हे बराच काळ काँग्रेसी पदांवर वावरले, पण ते एक सुसंस्कृत तालेवार होते एवढीच (मोठी) जमेची बाजू.

अलीकडे काश्मीर हे मुख्यत: अतिरेकी चळवळ आणि पाकिस्तानी उचापती यामुळे ग्रस्त बनले. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते मागास राहिले. उद्योगधंदे, दळणवळण, बाजारपेठ, शिक्षण, शेती या सगळया बाजू अधू राहिल्या. पर्यटन हा त्या नंदनवनातील प्रमुख व्यवसाय असून तो खूप मोठा होऊ शकतो. परंतु आजच्या युगातील सुखसोयी तिथे करायला हव्यात. मोठी हॉटेल्स, रस्ते होण्यासाठी बाहेरचे भांडवलदार व नोकरचाकर तिथे जायला हवेत. पण ३७० कलम असे की, बाहेरच्या कुणाला काश्मिरात कायमचे राहता येत नाही; तिथे घरजमीन घेता येत नाही. काश्मिरबाहेरून थेट तिथल्या ग्राहकाशी व्यापार-व्यवहार होत नाही.

थोडक्यात असे की, इथली जनता गरीब आणि स्वाधीन राहावी यासाठी आणि त्यांच्यावर आपली वजीरी सुखाने चालावी यासाठी शेख घराणे किंवा त्यांच्या सरदार-जमीनदारांना, `विशेष दर्जा' देणारे ३७०वे कलम हवे आहे. ते रद्द झाले तर त्या वतनदारांचा रुबाब संपेल हे त्यांचे खरे दु:ख आहे. त्यांचा `धर्मनिरपेक्ष' आधार काँग्रेसला आजवर मिळत असल्यामुळे त्यांनाही हा ३७० चा पुळका आहे.

एक प्रश्न असा की, काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तर तिथे जाऊन वास्तव्य करण्यास भारतीयांना बंदी कशासाठी? मग मुंबईत बाहेरच्यांनी लोंढे आणून ओतले म्हणून विरोध करणारे राज ठाकरे काँग्रेसवाल्यांस गैर का वाटतात? सर्वांना समान न्यायाची मिजास मारणारे हे लोक स्वत:पुरते वेगळेपण जपण्यात पटाईत आहेत. पण हा स्वार्थी अमंगळ भेद अलीकडच्या विज्ञान साधनांमुळे लोकांना कळू लागला आहे, हे कालच्या निवडणूक निकालांतून तरी शिकायला हवे.

१९९१ सालापासून खुली अर्थव्यवस्था आणणारा डंकेल प्रस्ताव स्वीकारू नये म्हणून पुष्कळांनी त्यास विरोध केला, त्यात भाजपाच्या गोटातील बरीच मंडळी होती. त्यापूर्वी संगणकक्रांती राजीव गांधींनी आणली, त्यासही डाव्यांनी विरोध केला. जैतापूरच्या अणुप्रकल्पास अजूनही मुहूर्त होत नाही. पाकिस्तानवर अणुबॉम्बचाच वापर करावा असेही शिवसेनेने नुकतेच म्हणून झाले; पण तीच शिवसेना जैतापूरला विरोध करते. अणुभट्टी होऊ दिलीच नाही तर, त्यांना वापरायचे ते अणुबॉम्ब चुरमुऱ्यांच्या भट्टीवर बनवायचे का? पण अशा प्रकल्पांचा व समस्यांचा अभ्यास तेथील विकासाच्या व जनतेच्या दृष्टीने न करता आपल्या राजकारणापुरते पाहणारी ही उटपटांग नेतेगिरी आहे.

मद्रासी आम्मा किंवा बंगाली दीदी याही बायांचे तसेच राजकारण सकलसंपूर्ण देशाचा न विचार करता आत्मसंतुष्टतेचे राहिले आहे. श्रीलंकेचा राष्ट्न्प्रमुख मोदींच्या कार्यक्रमात येणार म्हणून या आम्मा आल्या नाहीत. श्रीलंकेतल्या तामिळींवर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे. ते खरे-खोटे हा वेगळा विषय आहे. तिथे अन्याय होत असेल तर त्या सरकारशी कसे भांडायचे ते तिथले नागरिक ठरवतील. गोव्यात किंवा ताजमहालजवळ विदेशी महिलांवर अत्याचार झाले. नायजेरियाच्या काही नागरिकांनी गोव्यात धटिंगणपणा केला. असल्या कारणांनी उभय देशांच्या परस्पर संबंधात इतके टोकाला कोणी जात असते काय? पण तामीळनाडने असल्या फुटीरतेच्या मागण्या एके काळी केल्याच. पंजाबात खलिस्तान, तिकडे नागालँड, असल्यांची राजकारणे झाली. त्यांना या स्वार्थी राजकारण्यांचे खतपाणी होते. बिहारला विशेष राज्याचा दर्जा हवा. का? - तर ते मागास म्हणून. ते मागासच राहावे असा प्रयत्न करायचा, आणि मग विशेष दर्जा राखू पाहायचा. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द वापरायचा, तर ही दळभद्री लक्षणे आहेत.

हे सगळे असले तरी ३७० कलम रद्द करण्याची घाई होऊ नये. ती सध्या तरी कुणी केली नाही. `या विषयावर चर्चा व्हायला हवी'  एवढेच डॉ.जितेंद्रसिंग यांचे विधान आहे. तेवढ्यावरून ती चर्चा सुरू न होता वाद झडू लागले आहेत. परंतु त्यात खचलेल्या काँग्रेसचे मुखंड आणि निव्वळ `मोदी वा संघविरोध' एवढाच असाध्य केतकरी आजार असलेले माध्यमसम्राट आघाडीवर आहेत. मूळ काश्मिरी सामान्यजनता किंवा देशातील उद्योजक व राज्यशास्त्रज्ञ यांचे विचार वेगळे असू शकतात. मुख्य म्हणजे देशप्रेमी, उत्साही, कल्पक असा तरुण वर्ग काय म्हणतो यावरती पुष्कळ अवलंबून आहे. त्यांची नस या मुखंडांपेक्षा, व `सर्वज्ञ' भावनेच्या चॅनेली मनोरुग्णाइतांपेक्षा मोदींना जास्त सापडलेली आहे, एवढे तूर्त तरी मानायला हवे. त्यामुळे सर्व सहमतीने व घटनात्मक चौकटीतच, ३७० कलम असो की सर्वसमान कायदा असो, पुरोगामी धोरण राबविले जाण्याची शक्यता अधिक वाटते. `विशेष दर्जा' आणि `समानता' ही तत्त्वे परस्परविरोधी आहेत हे पुष्कळशा राजकारण्यांना कळत असेल, पण वळत नाही.
***

आम्ही सातारचेच. आमचे पूर्वज ४०० वर्षांपूर्वी कोकणातून सातारला आले. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात पराक्रम गाजविला. आम्हाला सातारजवळील जकातवाडी येथील मोकासा (वतन) मिळाले. माझ्या मोठ्या दोन्ही चुलत्यांनी १९४०च्या दशकात ब्राह्मणाला लांबचा वाटणारा पॅसेंजर मोटार सर्व्हिसचा व्यवसाय नेकीने केला. माझा चुलतभाऊ मधुकाका यानेही ट्न्क ट्नन्सपोर्टमध्ये नावलौकिक जपला. वडील रा.ना. तथा बन्याबापू गोडबोले यांचा अनेक संस्थांशी संबंध होता.
दै.ऐक्यमध्ये `स्मरणयात्रा' हे साप्ताहिक सदर मी लिहिले. त्यातील निवडक लेखांचे संकलन करून `सातारा स्मरणयात्रा' पुस्तक केले. त्यातील एक रंजक प्रकरण...
टांगे आणि टांगेवाले
माझ्या लहानपणी साताऱ्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे स्वत:ची मोटार होती. सातारा शहर अजिंक्यताऱ्याच्या उतारावर वसलेले! त्यामुळे चढ-उताराशिवायचा एकमेव रस्ता म्हणजे पॅलेस स्ट्नीट. बाकी सगळीकडे चढ तरी किंवा उतार तरी. पण तरीही सातारकर काटक असल्यामुळे त्या चढावर सायकलवरून लीलया जात. चालायचाही कंटाळा नसे. परंतु कुटुंब घेऊन जायचे किंवा सामानसुमान असेल तर टांग्याला पर्याय नव्हता.
साताऱ्यात तेव्हा ३०-३५ टांगेवाले वेगवेगळया पेठांतून विखुरलेले होते आणि त्या त्या पेठेतील लोकांशी त्यांचे संबंध जवळचे असत. मुलाबाळांना आणि लेकीसुनांना त्यांच्या टांग्यातून पाठवताना निर्धास्त वाटत असे. रात्री अपरात्री पेठेतील महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या तर हे टांगेवाले उठून येऊन काळजीने त्यांना आर्यांग्ल किंवा कस्तुरबा रुग्णालयात घेऊन जात.
टांगेवाल्यांचा तेव्हाचा ड्न्ेस धोतर शर्ट त्यावर खाकी कोट आणि डोक्याला बहुधा गांधी टोपी असा असे. तरुण टांगेवाले देवआनंदप्रमाणे केसांचा कोंबडा करून भांग पाडत. टांग्याची रचना स्टँडर्ड होती. पुढे घोडा जुंपायला दोन दांड्या, त्यामागे हौदा.  टांगेवाला पुढे उजव्या बाजूला, त्याच्या शेजारी एक पॅसेंजर व त्यांच्या पाठीमागील हौद्यात दोन पॅसेंजर बसू शकत. तेव्हा डांबरी रस्ते नव्हते. त्यामुळे टांगा चालवताना येणारा खडखड आवाज आणि घोड्याच्या टापांवरून टांगा आल्याची वर्दी होई. पेठेत ते समजले की, कोण आले हे पाहायला मंडळी दारात येत. टांग्याच्या मागील फळीला धरून त्यापाठीमागे पळत जाणे हा आम्हा लहान मुलांचा आवडीचा खेळ असे. अर्थात आम्ही धडपडू या काळजीने टांगेवाला हाकलत असे. पण पोरे त्याला दाद देत नसत. रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी दोन्ही बाजूला कंदीलसारखे चौकोनी दिवे असत आणि शेजारी चाबूकसुद्धा.
टांग्यांना हॉर्न नसत व टांगेवालेच तोंडाने हँ चॅक चॅक, बाजू हटो, ओ मावशी, ओ पाव्हणे चला' असे पादचाऱ्यांवर ओरडत. चाबकाची काठी पळत्या चाकाशी धरून कडकडकड वाजवत.पुढे हौशी टांगेवाल्यांनी एसटीसारख्या घंटा बसवल्या. तर काहींनी त्यापुढे मजल मारून मोटारीप्रमाणे रबरी फुग्याचे हॉर्न बसवले. तरीही मुख्य भर तोंडावरच असे. जाडजूड पॅसेंजर्स मागे बसले तर टांगा मागे कलून घोड्याला ताण बसे. टांगा उरळ झाला म्हणून मग पॅसेंजर्स, सामान मागेपुढे करून तो समतल केला जाई. मोटार बस आली की टांगेवाल्यांत गिऱ्हाईक ओढण्याची स्पर्धा चाले. `साहेब इकडे या', `मावशी कुठं, शनिवार ना' असे हाकारे घातले जात. नेहमी जाणाऱ्या-येणाऱ्यांचे टांगेवाले ठरलेले असत. ते नेमके त्यांच्याच टांग्याकडे जात. नेहमीची सवारी असली की टांगेवाल्याच्या गप्पा सुरू होत. त्यामधून गावातली ताजी खबर समजत असे.
व्हिक्टोरियाला तगडे घोडे जुंपावे लागत पण टांग्याचे तसे नव्हते. भीमथडी तट्टापासून उंच घोडेही त्याला चालत आणि आर्थिक ऐपतीप्रमाणे टांगेवाले ते घेत. चढावर जाताना काही वेळा बोज्यामुळे घोडे थांबत असत. अशा वेळी पोक्त टांगेवाले खाली उतरून त्याचा लगाम धरून चुचकारत त्याला चालवून `नैया पार लावत.' पण तरुण टांगेवाला चाबकाचे फटके मारत त्याला हैराण करीत. एखादे वेळी मग घोडाही बिथरून पुढचे दोन्ही पाय उचलत असे आणि मागे बसलेल्या पॅसेंजरची `पडलो रे' अशी अवस्था होत असे. मराठा, मुसलमान वगैरे सर्व जातीचे टांगेवाले मिळून एकच `टांगावाला' ही समव्यवस्था बने. साठे, नाफड, देशपांडे असे काही ब्राह्मणही त्यातच समाविष्ट होऊन जातीअंताची ती आदर्श व्यवस्था होई. जंगुभाई, अकबरभाई, आमच्या शेजारचा बाबू कोठावळे, तरुण हाशमभाई ही नावे अनेकांना त्यांच्या चांगुलपणामुळे आजही आठवत असतील.
सातारच्या महाराजांची राम-लक्ष्मण ही उमद्या घोड्यांची देखणी जोडी प्रसिद्ध होती. बापूसाहेब आपटे यांनीही हौसेने टांगा आणि उत्तम घोडा आणला होता. अकबर हा गोंधळी गल्लीतील टांगेवालाही उत्तमोत्तम घोडा आणून त्यांची निगा राखत असे. काहीसा अबोल, गांधी टोपीधारी अकबर, आम्ही मुले घोडा पाहायला गेलो की आनंदित होई. किरकोळ शरीरयष्टीचा बाबू म्हणजे शनिवार पेठेतील अनेक कुटुंबांना घरचाच वाटे.
तेव्हा घोड्यांच्या किंमती ३०० ते १००० पर्यंत असत. एकदा एक छोटी सर्कस आली होती. आर्थिक डबघाईला आलेल्या सर्कसला सातारचा मुक्कामही तोट्यात गेला. जवळजवळ दिवाळे निघाले. त्यातील घोडे विकायला निघाल्यावर बाबू कोठावळेने एक मूळ उमदा पण तेव्हा अगदी मरायला टेकलेला घोडा तीस रुपयांना विकत घेतला. त्याला उभेही राहवत नव्हते म्हणून तो बैलगाडीत घालून सातारला आणला. लोकांनी बाबूला वेड्यातच काढले. पण हे घोडे तयार होईल असा बाबूला विश्वास होता. महिनाभर औषधे व खुराक घातल्यावर ते घोडे उभे राहून चार पावले चालायला लागले. पुढे महिनाभर बाबू त्याला धरून लहान मुलाप्रमाणे आज २० पावले उद्या ३० पावले असे चालवत होता. लोकांची चेष्टा मुकाटपणे ऐकत होता. पण चार महिन्यात बाबूच्या परिश्रमाला फळ आले. मूळचा तो सुरेख शिकवलेला अश्व पुन्हा पूर्वपदाला येऊन नजरेत भरू लागला आणि नंतर बरीच वर्षे बाबूची आणि सातारकरांची देखणेपणाने सेवा करीत राहिला.
टांग्यांचे पासिंग वर्षातून एकदा बहुधा पोलीस खात्याकडून करून घ्यावे लागे. एक पासून प्रत्येक टांग्याला नंबर मिळत असे. आपल्या टांग्याला पहिला नंबर मिळावा म्हणून टांगेवाल्यांत चुरस असे. त्यासाठी टांग्यांची देखणी सजावट जो तो करी शिवाय घोड्याची निगाही. उष्टारखाना (आताचे तालीम संघ मैदान) किंवा हजेरी माळ (आताचे शाहू स्टेडिअम) येथे हे  पासिंग होई तेव्हा टांग्यांची छोटी शर्यतही होई. ती पाहायला आम्हा पोरासोरांपासून मोठेही प्रचंड गर्दी करीत. पासिंगनंतर पहिला नंबर मिळालेला टांगा व टांगेवाला गुलालाने माखून घरी जाई. त्या आनंदात गर्दीही सहभागी होई.
रिक्षा आल्या आणि एकेक करीत टांगे आणि टांगेवाले अस्तंगत झाले. आता उरल्या आहेत त्यांच्या आठवणी!
ं- अरुण गोडबोले, `आनंदी निवास' ६९, शनिवार पेठ, सातारा
फोन:(०२१६२)२३०११४, ९८२२०१६२९९

नरेंद्र मोदी : एक झंझावात
पृष्ठे - १६०, मूल्य रु.१५०/-
लेखक - दा.वि.नेने (दादूमिया)

दादूमियांनी `मोदी मॅनेजमेंट'वर विस्तृत लिहिले आहे. संघाच्या शाखेवर राजकीय किंवा औद्योगिक मॅनेजमेंट कधीच शिकवत नाहीत. मग हा मॅनेजमेंटचा वारसा त्यांच्याकडे कसा व कोठून आला? नेहमी मोदी सर्वोत्कृष्ट पसंत करतात, मग ते शिंपी असो वा असिस्टंट असो. तरच चांगले परिणाम मिळतात व पैसा, वेळ व शक्ती यांची बचत होते. म्हणून मोदींनी पर्यटनासाठी अमिताभ बच्चनला पसंत केले व तो मोदींसाठी एक पैसा न घेता येण्यास तयार झाला! युपीमध्ये जास्त जागा आल्या पाहिजेत म्हणून अमित शहांची तेथे नेमणूक केली. या `ऑलवेज द बेस्ट'च्या हट्टापायी कधी कधी जुन्या जमान्याच्या लोकांना त्यांना दुखवावे लागते. पण बदलत्या तरुणांच्या जमान्यात डॅश, डायनामिजम् व डेअरिंग हे गुण तरुणातच असणार. वृद्ध बदल घडवून आणण्यास सहसा तयार नसतो. तरुणांचे मानसशास्त्र नीट ओळखल्यामुळे मोदी नव्या उत्साहाने, ताज्या दमाने व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही लढाई खेळत आहेत. दादूमियांचे वैशिष्ट्य म्हणजे आतील गोटातील माहिती, परखडपणा व कालपटावर भर. गुजरातच्या सर्व मोठ्या पुढाऱ्यांना ते जवळून ओळखतात. त्यामुळे पुस्तकाला वेगळाच रंग येतो. आतंकवाद, जातीय दंगे, मोदींनी सत्ता क्रमाक्रमाने कशी हस्तगत केली, बक्षिसे व अॅवॉर्डस्, गुजरातची हिंदुत्वाची लॅबॉरेटरी, तीस्ताचा उदय व अस्त वगैरे राजकीय डोकेदुखींचा कालपट हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
दादूमिया लिहितात, `राज्यसभेचा खासदार महमंद अदीब ६५ खासदारांच्या सह्या मिळवून प्रेसिडेंट ओबामास पत्र लिहितो. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या एकाही भारतीयास ही गोष्ट कळून त्याने मोदींना कळविण्याची तसदी घेऊ नये ही लांछनास्पद गोष्ट आहे.
 `मोदींना यशस्वी पुढारी व्हावयाचे असेल तर त्यांना समाजसुधारकांची फौज उभी करावी लागेल. त्यांच्या साहाय्याने पुढील चार चांगल्या गोष्टी लोकांना समजावून सांगाव्या लागतील-
१) यापुढे आळस व वस्तूंची नासाडी सहन केली जाणार नाही.
२) प्रत्येक गोष्टीस कालमर्यादा असेल.
३) सचोटीने काम करणे हे आपले राष्ट्नीय कर्तव्य आहे. भ्रष्टाचार देशाचा शत्रू आहे व तो खपविला जाणार नाही.
४) स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म हेच आमचे मंत्र राहतील.  त्यांचे उल्लंघन केल्यास कठोर सजा होईल.'
ही समाज सुधारणा घडली तर देश फार मोठी उंची गाठेल. ती घडली नाही तर गेल्या ६५ वर्षात जे घडत राहिले तेच  पुढे चालू राहील.
- डॉ.डी.व्ही.नेने (दादूमिया)
`पितृछाया' खारीवाव, रावपुरा, वडोदरा
मोबा.०९८९८५७१९५६


जग जिंकण्यासाठी संवाद हेही एक सहज माध्यम आहे. कोणत्याही संवादात महत्त्वाची वाक्ये -
५  शब्दांचे वाक्य :   मला माझी चूक मान्य आहे.
४  शब्दांचे वाक्य :   हे आपण मिळून केलं
३  शब्दांचे वाक्य :   तुमचं काय मत?
२  शब्दांचे वाक्य :  आभारी आहे
१  शब्दाचे वाक्य :  आपण!
पूर्ण टाळण्याचा शब्द :   मी

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन