मनामनांत दीप लावू... दिवाळी म्हणजे नरकासुराचा वध, आणि नरक म्हणजे अस्वच्छता, घाण, अमंगल असा भवताल, घर आणि कलुषित मनसुद्धा! या सर्व ठिकाणची साफसफाई करून शुभ संकल्पांचा दीप लावायचा, ही मूळ कल्पना आपण लक्षात घेतली, म्हणजे मग आजच्या काळातील दिवाळी कशी साजरी करावी याची दिशा स्पष्ट कळते. कधी काळी - पन्नास-साठ वर्षांपूर्वी - साजरी केलेली दिवाळी आपल्या मनांत घर करून राहिलेली असते. त्यावेळी फटाके, फराळ, पहाटेच्या आंघोळी, सोंगट्याचा खेळ या सगळया रूढींचा आनंद घेतला. परंतु आजच्या काळात ते सगळे प्रकार तसे विसंगत आहेत. फटाक्यांच्या आवाजाचे प्रदूषण, शहरी दाट लोकवस्तीला धोका, आणि कागदकपट्याचा कचरा निर्माण करणारा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितका बरा; ही जाणीव आली तरच शुभकाल निर्माण करता येईल. याशिवाय, फटाक्यांच्या कारखान्यांत बालमजूर घातक वातावरणात काम करतात. त्यांना विम्याचे संरक्षणही नसते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्या असंख्य मुलांचा जीव धोक्यात जातो, हा विचार करायला हवा. फराळाचाही वेगळा विचार केला पाहिजे. `त्या' काळी ते जिन्नस अपूर्वाईचे होते. एकत्र कुटुंबातील पाककलेची ती बहार होती. आज