सायकल पर्वाच्या उंबरठ्यावर सायकल वापरणे हे आपल्या सोयी- गैरसोयीपेक्षा किंवा इतर फायद्यांपेक्षा अप्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. गावातल्या गावात पाच किलोमीटरपर्यंतचे अंतर कुणालाही सहज सायकलने जाता-येता कापता येते. तेवढ्याने साधारण धडधाकट स्त्री-पुरुषांना काहीही त्रास होत नाही, दमायला होत नाही. वेळही वेगळा जास्त लागत नाही खर्च तर नाहीच नाही. पण सायकलवरून जाण्यात कमीपणा मानला जातो हे खरे. `सायकलींचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात हल्ली सायकल दिसेनाशी झाली आहे. भाडोत्री सायकलींची दुकानेही संपली. रिक्षा किंवा स्कूटरसाठी पन्नास रुपये सहज फेकण्यामुळे सगळयांपुढे अनेक समस्या वाढतात. इतर देश त्या `मागासलेल्या सोयीकडे' पुन्हा वळले आहेत. आपण त्यांच्या तुलनेत जरा जास्तच शहाणे व `पुढारलेले' असल्यामुळे सायकलीच्या खटाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. आज प्रचंड वेगाने आपली शहरे धावत आहेत. गती म्हणजेच सर्वकाही अशी मानसिकता असताना सायकल हाणत कामाच्या ठिकाणी येणे-जाणे, हे पचनी पडायला अंमळ जडच जाते. वेग पकडण्याशिवाय आपल्या कोणाला गत्यंतर नाही, असेही समजण्याचे कारण नाही. जगातील काही देशांनी