तणावाच्या आधारे पुढे जाऊ पाहता पाहता पुन्हा एक नवीन वर्ष सुरू झाले, आणि त्यातलाही आठवडा संपला. पोराटोरांनी गरगटलेले रस्ते किंवा रतीब टाकावेत तसे कुणीतरी पाठविलेले `एसेमेस' वगळता वर्षस्वागताच्या उत्साहाची कारंजी यंदा जरा मंदच उडाली. िख्रास्मसपासूनच त्याची उभारी फसफसत यायची, तशी यावेळी जाणवली नाही. कोण्या दामिनीच्या मूक बळीसाठी तरुणाईने हाती घेतलेल्या मेणबत्त्या विझल्या, तरी त्या विषयी मनांतली खदखद शमलेली नाही असे दिसते. या तरुण संवेदनशीलतेचेही प्राप्त परिस्थितीत समाधान वाटू शकेल. पण याच उदासमनस्कांचे `मार्केट' मिळविण्यासाठी `त्या'च प्रकारच्या अत्याचारी बातम्यांचा ओघ वाढल्याचेही दिसते. त्या माध्यमांनी उसन्या उत्साहाने `चला मजेत जगूया', `तणावमुक्ती', `संकल्प-सिद्धी' असे विषय नव्या वर्षाचे म्हणून समोर फेकायला सुरुवात केली तरी त्यामुळे स्फुरण चढल्याचे कुठे जाणवत नाही. अशा मानसिकतेचे कारण म्हणून एका संशोधक-विचारवंताचे नवे प्रतिपादन काही वृत्तपत्रांनी चांगल्या रितीने प्रगट केले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. हा विचार तसा आपल्याला नवा नाही, तो श्रीकृष्णांनी कधीच प्रग