विजयी वीर
ड्युटी संपवून चाललो होतो. गाडी वळवली आणि समोरून महापुराचा लोंढा यावा असा मोटारसायकलींचा ताफा थेट अंगावरच आला. बैलगाड्यांच्या शर्यती पूर्वी पाहिल्या होत्या. बेभान होऊन जिवाच्या आकांताने बैल धावत असत. गाडीला गाडी धडकेल - एकमेकांत गाड्या अडकतील अशा नाना तऱ्हेच्या शंकांनी मन भयकंपित होई. धुळीच्या ढगाआड धावणाऱ्या गाड्या क्षणभर दिसून येत नसत. दुचाकींच्या या जबरदस्त रॅलीमुळे त्या बैलगाडी शर्यतीची मला आठवण झाली.
शे-पन्नास मोटार सायकली टरटराट करत धावत होत्या. बहुतेक गाड्यांचे सायलेन्सर्स काढलेले, त्यामुळे कानठळया बसविणारा कर्कश आवाज. एका गाडीवर तीन तीन किंवा चारजण बसलेले - किंवा एकदोन उभे. गुलालाने चेहरे व सगळे अंग माखलेले. घसा फाटेपर्यंत `की जय - विजय असो', `आमच्याशिवाय हायच कोण?', `सगळयांना लावले पळवून' अशा आक्रस्ताळी घोषणा! चौक किंवा तिट्ठा आले की मुठी भरभरून गुलाल उधळण्याची चुरस. मोटारसायकलवर उभे राहून किंचाळणारे शर्ट काढून उघडे. कोणाचाही चेहरा ओळखता येऊ नये असा, गुलाल, धूर, घाम यांनी बरबटलेले.
ही टोळधाड जलद गतीने आली व तेवढ्याच वेगात पुढे निघून गेली. रस्त्याने जाणारे येणारे हा लोंढा पाहून भांबावून घाबरून गेले. जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभे राहिलेले. जरासा घोटाळा झाला असता तर बेभान झालेल्या मोटरसायकलींखाली चिरडून जाण्याचे भय. एकच नव्हे, एका पाठोपाठ पाच-पन्नास गाड्या अंगावरून सटासट गेल्या असत्या. आपल्या गाडीखाली कोणी आले आहे याचा त्या उन्मत्त, बेभान तरुणाईला पत्ताही लागला नसता. सायलेन्सर काढल्याने एवढा आवाज होता की कोणाच्या किंकाळया ऐकू आल्या नसत्या.
अवघ्या दोन-तीन मिनिटांत प्रचंड वेगातील ताफा रस्त्यावरून पुढे गेला. वाटेवर गुलालाचा हलकासा थर पसरलेला दिसला. पादचाऱ्यांनी डावी-उजवीकडे भयग्रस्त नजरेने पाहात रस्त्याकडेची आपली वाहने, पावले वाटेवर आणली; कपाळावरील घाम टिपला. काळजाचा चुकलेला ठोका काहीसा पुन्हा पडू लागला. घशाला पडलेली कोरड ओलावली व व्याकूळ भयकंपित नजर स्थिरावली.
मी जवळच्या एका परिचिताला दीनपणी विचारलं,``ही कसली रॅली? काय भानगड आहे?''
``मलाही माहीत नाही. पण कुणीतरी जिंकले असेल! निवडणुकीचा दंगा...!''
``मग त्यासाठी एवढा हैदोस कशासाठी?''
``विजयाचा उन्माद असतो साहेब. पैशाचा उत्साह व मस्ती उतू जाते. शुद्धीत कोण असते?''
``कसली निवडणूक? लोकसभा, विधानसभा की जिल्हा परिषद?''
``अहो कुठली लोकसभा-विधानसभा? कुठली तरी ग्रामपंचायत असेल!''
``मग ग्रामपंचायतीला निवडून आले म्हणजे एवढा विश्वविक्रम? एवढे आक्रोशी प्रदर्शन कशासाठी?''
``तुम्हाला काय सांगायचे? मी ऐकले की काल रात्री मतदानापूर्वीचा भाव डबल झाला. गंमत म्हणजे दारिद्र्यरेषेखाली किंवा झोपडपट्टीतील लोकांनी दोन्ही पार्टीकडून हात मारला. मत कोणालाच दिले नाही म्हणतात.''
``कुठून आणले एवढे पैसे? आणि कशासाठी? निवडून आल्यावर एवढी पेरलेली रक्कम उगवत असेल का?''
``नक्कीच! त्याशिवाय कोण कशाला पैसे वाटतो? एरव्ही हे चोर लोक मंदिरासमोर बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत पन्नास पैशाचे नाणेसुद्धा टाकणार नाहीत.''
``कोणा ग्रामपंचायतीची ही कथा तर मग मोठ्या निवडणुकीत काय होत असेल?''
``साहेब, तुम्ही जास्त विचार करू नका. डोके भणभणेल. आपला तो प्रांत नव्हे. भरधाव गाड्यांखाली आपण सापडलो नाही, वाचलो याचे समाधान माना आणि शांतपणे घरी जा.''
ती तसली आक्रस्ताळी मिरवणूक संपल्यावर गुलालाने माखलेल्या, परतीच्या वाटेवरच्या एका तरुणाला मी गाठले आणि विचारले, ``कसली मिरवणूक म्हणायची ही?''
``ग्रामपंचायत निवडणूक!''
``कोण जिंकले? किती मताने?''
``काय माहीत! कोणी का जिंकेना. आपल्याला त्याचे काय?''
``मग तू एवढा घसा फाटेपर्यंत घोषणा का देत होतास?''
``खरं सांगू साहेब, गाडीची टाकी पेट्नेलने फुल करून मिळते. धाब्यावर चापायला मिळते शिवाय खिशात चुरगाळलेल्या नोटा कोंबल्या जातात. कोण जिंकले, कोण हरले याचे आपल्याला देणेघेणे नाही. सगळे सारखेच. गाडी दामटायला मिळते, मजा येते. एक दिवस चैन; बस्स!''
माझे डोके खरेच भणभणू लागले. आपला हा विषय नव्हे हेच खरे!
-मोहन जी. आळतेकर
(सेल : ९४२११८४९९६)
छान लेख आहे मोह्नजी आळतेकर धन्यवाद चांगल्या विषयाला वाचा फोडली
ReplyDelete