Skip to main content

Sampadkiya in 10 Dec.2012


हाताची घडी, तोंडावर बोट

माणसाला एकमेकांशी बोलण्याची ऊर्मी जन्मजात असते. काही माणसे स्वत:शीच बोलतात ते बाजूला ठेवले तरी फुलां-फुलपाखरांशी, प्राण्यांशी किंवा निर्जीवांशीही माणसे बोलतात. दगडी देवाशी बोलतातच, पण फळीवरून पडलेल्या पातेल्याला, `हं, पडा पडा. तुम्हीसुद्धा सरळ वागू नका...!' असा राग काढणारी `मंडळी' घरोघरी असतात. रामप्रहरात भेटेल त्या माणसाकडे `अहाहाहा, काय थंडी पडलीय-' असे म्हणणाऱ्या माणसाला, `हो ना, यंदा थंडी जरा जास्तच आहे.' असे उत्तर ऐकल्याशिवाय राहावतच नाही. माणूसच काय, पण मुंग्यासुद्धा समोरून येणारीला `काय म्हणतेस?' असे विचारण्यासाठी थांबतात म्हणे!

माणूस संवादप्रिय प्राणी असल्यामुळे प्रत्येक घटना-प्रसंगावर, विचार-आचारावर, चराचर व्यक्तिमत्त्वावर परस्पर भाष्य करणे उपजत, स्वभावगत आहेच परंतु मानवी समाजबंधनासाठी ते आवश्यकही आहे. संवाद हा लोकशाहीचा प्राण आहे. `संवाद' म्हणजे केवळ एकांगी, एकमार्गी, स्तुतीपर वटवट नाही. उलट प्रत्येक बाबतीत अनुकूल-प्रतिकूल मतप्रदर्शन होणे हाच तर अभिजात जिवंतपणाचा साक्षात्कारी अनुभव असतो. परमत-खंडन करण्यातही सुसंस्कृतपणा असेल तर स्वमत-प्रतिपादनाची महत्ता वाढते. परमत-सहिष्णुता ही सामाजिक एकत्त्वाची नितांत गरज आहे. ती नाहीशी झाली तर, किंवा परमत प्रकटच होऊ न देता ते बाळगणाऱ्यांनाच नाहीसे करू पाहिले तर लोकशाही कसली, ते तर राक्षसी राज्यच झाले.

कधीकाळच्या व्यंगचित्रावरून संसदेत घडलेले वर्तन त्या प्रकारचे होते. त्याच प्रकारचा अनुभव आणीबाणीने दिला होता. अलीकडे ममताबाइंर्चे व्यंगचित्र काढणाऱ्यास अटक झाली, त्रिवेदीस तुरुंगात टाकले... अशी अनेक प्रकरणे ! माहिती कायद्याचा वापर करण्यातून काही बिंग फुटणार म्हणून त्या कार्यकर्त्यांची हत्त्या करण्याइतकी निर्ढावलेली माणसे संवादाची व्याख्या कशी काय समजणार, त्यांना कशी समजावणार?

माणसे समोरासमोर भेटली तर असा संवाद होत आला आहेच, पण जशा दळणवळणाच्या सोयी वाढत गेल्या तसा दूरसंपर्कातून संवाद फुलत गेला. पत्रलेखनातून त्या त्या  स्थितीवर भाष्य होत राहिले. आज पत्राचा पुरातन कागद किंवा ताम्रपट सापडला तर तो इतिहास निर्माण करतो. कालपरवा वापरात आलेला फोन केवळ पाककृती सांगण्यापुरता उपयोगी नाही तर व्यक्ती आणि विचार यासंबंधी त्यावर चर्चा होणारच होणार. वृत्तपत्रे तर स्वत:चे मत प्रसारित करण्यासाठीच निघत. अर्थात इंग्रजाच्या विरोधातील लिखाणाला राजद्रोह ठरवून काळेपाणी देणाऱ्यास कुणी लोकशाही म्हटले नाही, तर पारतंत्री गुलामी अत्याचारच म्हटले. त्या काळी `वंदे मातरम्' किंवा `जयहिंद' म्हणणे हासुद्धा राजद्रोह होता. पण आजच्या स्वातंत्र्यातही मुस्कटदाबीच करायला हवी काय? आजकाल वाढलेल्या इलेक्ट्नॅनिक संवादजालामुळे माणसे अधिक संवाद अनेकांशी करू शकतात हा त्या रासवट राजवटीला दुरुपयोग वाटणार. त्याच एकांगी प्रवृत्तीचे दर्शन पालघर फेसबुक प्रकरणात घडत आहे. तरीसुद्धा एकमेकांशी बोलताना इतर कोणाचा विषय निघतो तेव्हा त्यास `जाहीर मता'चे स्वरूप येऊ नये हेही तारतम्य बाळगायला हवे. वृत्तपत्र किंवा आजचे वेगवान माध्यम हाताशी आहे म्हणून वाटेल त्यावर जाहीर मत मांडत सुटणे जसे गैर, त्याचप्रमाणे तसे ते मांडल्यामुळे सुलतानी अत्याचार वाटणारी मुस्कटदाबीही निषेधार्ह वाटते.

`कोणीही आपापसात बोलायचे नाही, थट्टा करायची नाही' असा कितीही जरबेचा फतवा काढला तरी त्याचीच जास्त थट्टा होते हा पोरपणापासून सर्वांचा अनुभव असेल. रशियाच्या `तसल्या' राजवटीवर भाष्य करणारा एक विनोद प्रचलित होता की, असल्या अतार्किक बंधनांस वैतागून एक नागरिक मुठी उभारून ओरडू लागला, `ख्रुश्चेव्ह मूर्ख, बालिश आहे...' त्याबद्दल त्या माणसाला अटक करून दोन गुन्हे दाखल झाले म्हणे. एक सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याबद्दल, आणि दुसरा गुन्हा सरकारी गुपित फोडल्याबद्दल. पालघर फेसबुक प्रकरणाशी या विनोदाचे साधर्म्य शोधता येईल.

माणसाला परस्परांशी संवाद साधण्यासाठी निर्माण होत चाललेली मायाजाले रोखून काही साधणार नाही. विदेशांतून अतिरेक्यांशी संवाद होत राहतात, त्यांच्या योजनांचे तपशील ठरतात परंतु त्यांना रोखता न येणारे पोलिस आणि सैनिक कुणा पोरीटोरींना अटकाव करण्याचा पराक्रम करते, याला शुद्ध मराठीत चपखल म्हण आहे - गावचा फाटू आणि बायकोपुढं बजरबट्टू!

Comments

  1. छान वाटले आपले विचार पटले पण लक्षात कोण घेतो? हे असेच चालायचे आपण फक्त पहात रहायचे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन