पायरेटेड हक्क आपल्यास जे समजले असे वाटते ते दुसऱ्यांना सांगून सकळजनास शहाणे करावे हे समर्थांनी कर्तव्य म्हणून सांगितले. भाषा,त्या आधारे होणारी संवादचर्चा, विचारविमर्श आणि निर्णयमीमांसा या प्रक्रियांतून माणसाची प्रगल्भता वाढते, सुसंस्कृती विकसते. त्या कारणे ग्रंथ-पुस्तके यांचे महत्त्व निर्विवाद मानले जाते. ग्रंथलेखन, ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथवाचन यांच्यातून संपन्न होणारी बौद्धिक संपदा श्रेेष्ठ मानली तरी आपल्याकडे तिचा वापर सर्व जीवमात्रासाठी व्हावा असेही समजण्यात येते. केवळ स्वत:साठी, पैसा कमावण्यासाठी आणि त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करून अन्य कुणी वापर केल्यास त्याची रॉयल्टी मिळण्यासाठी बुद्धी, ज्ञान, माहिती या गोष्टींचे पेटंट घेण्याची रीत ही आजच्या धंदेवाईकतेची देणगी आहे. त्यामुळे पुस्तके लिहिण्यातून, ती प्रकाशित करण्यातून व विकण्यातून पैसाच पैसा मिळावा; संस्थांची संस्थाने व्हावीत आणि आपल्या ताब्यात जे ज्ञान-साहित्य येईल ते दुसऱ्यास लाभू देऊ नये हा अतिरेकी विकृत व्यवहार सुरू झाला आहे. विद्या दिल्याने वाढते, परंतु त्यायोगे पैसा, हक्क, मिरास हेसुद्धा वाढते हा आजच्या व्यवसायी ज्