वाद
हे कुठंतरी थांबायला हवं
कालानुरूप समाज बदलत चालला आहे, तो एकमेकाशी एकरूप व्हावा असे आपले प्रयत्न आहेत. परंतु इतर मंडळी ब्राह्मणद्वेष का चालवतात हे कळत नाही. मागे सातारला विद्रोही साहित्य संमेलन झाले. त्यामध्ये समर्थ रामदासांबद्दल अत्यंत शिवराळ चर्चा झाली. त्याविषयी कुणी समर्थभक्त, शिष्य किंवा नागरिकांनी चकार शब्द काढला नाही. कोल्हापूरला कुलगुरु श्री.धनागरे यांना त्रास दिला. (अलीकडे तिथे त्यांचा सत्कार झाल्याचे कळले.) त्यांच्या विद्वत्तेची टर उडवली. चिपळूण संमेलनात परशुरामावर आक्षेप व अवहेलना झाली. पुण्यात दादोजींचा पुतळा हलविला. हे सर्व काय? शासन तर लक्षही देत नाही. तीन टक्के म्हणून हेटाळणी होते, ही शोकांतिका नव्हे का?
- रघुवीर फडके,
कोटेश्वर कॉलनी, सातारा
संवाद
समाजातील गटागटांत दुही व द्वेष पसरवून आपली सत्ता मिळविणे किंवा अबाधित राखणे हा पूर्वापार राजकारणाचा भाग आहे. आणि विशेषत: आपल्या देशाला तशा राजकारणास बळी पडण्याचा एक शाप असावा. हे केवळ जाती-उपजातीपुरतेच नाही. उत्तरी-दक्षिणी, मराठी-कानडी, शेतकरी-कारखानदार, सेना-मनसे, नोकरदार-मजूर अशा प्रत्येक गटांच्या बाबतीत घडत असल्याचे दिसेल. मजूरांबद्दल कळवळा दाखवायचा आणि नोकरांना ७ व्या आयोगाची गलेलठ्ठ पेन्शन द्यायची हा शुद्ध राजकारणी स्वार्थ असतो. सत्तातुरांना त्याबद्दल लज्जा बाळगून चालत नाही.
एकदा लोकशाही प्रणाली मान्य केल्यावर प्रत्येक वेळी मतांचा विचार करणे भागच पडते. हा स्वार्थ आपल्या घरीही असतो. कर्त्या पोराची बायको चुकीची वागली तरी तिला लाडावून ठेवणे भाग पडते; किंवा सासऱ्याकडे संपत्ती असेल तर सासूचा अन्याय सोसावा लागतो. हीच परंपरा आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून भरघोस मते मिळतात - आणि अज्ञानामुळे पुढे ज्यांची पाच वर्षे काही कटकट राहात नाही - त्यांना सांभाळून घेण्यात सरळ साधा व्यवहार आहे. एखाद्या तथाकथित शहाण्यांच्या वसाहतीतून, राजकारण्यांना त्यांच्या बाजूचे किंवा विरोधी, - मत मिळत नाही; परंतु शेजारच्या बेकायदेशीर झोपडपट्टीतून भरघोस मतदान - बाजूचे किंवा विरुद्ध - होते. अशा स्थितीत पाणी-वीज वगैरे सोयी सवलती कुणाला मिळतील?
शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा, परंपरा वगैरे अनुकूलता ज्यांना लाभली आहे तो समाज अलिप्त राहण्यात शहाणपणा मानतो. मतदान करणे, सामुदायिक सहभाग घेण्यात त्यांना बावळटपणा वाटतो. आपापल्या गृहसंस्थेची सभा किंवा कुटुंब-संमेलन यातही ही मंडळी भाग घेत नाहीत. त्यामुळे ते अलिप्तपण एकटे पडते मग जी हेटाळणी, बेदखल किंवा `शोकांतिका' इ.वाट्यास येते त्याचा दोष कुणाला? एखाद्या समूहाची शक्ती, सन्मान व सामर्थ्य कुठे दिसूनच येत नसेल तर त्याकडे कोण कशासाठी लक्ष देईल? पूर्वी इतर समाजगटांना तीच अवहेलना व दुर्लक्ष सोसावे लागले. कधीतरी असे वाटू शकते की कुणा जातीच्या नेत्याचे जास्त लाड-किंवा अनुनय होत आहे. परंतु त्या जाती-जमातीचे लोक त्या नेत्याच्या मागे नाहीत, एवढे कळले की त्या नेत्यास दूर फेकले जाते. यात मानवी व्यवहारच आहे. त्यावर चडफडून कसे चालेल? `त्यांचे बरोबर' असे नाही पण चूक सुधारण्यासाठी आपण काय करतो ते अधिक महत्त्वाचे. सरकार ते कशासाठी करेल?
लोकशाहीत खरे सामर्थ्य असते ते जाणत्या लोकांच्या एकत्त्वाच्या कृतीला. स्वत:ला जे जाणते मानत असतील त्यांनी एकरस व्हायला हवे आणि सक्रिय व्हायला हवे. ही सक्रियता समाजाभिमुख हवी. ते होण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे.
- आपले जग
Comments
Post a Comment