Skip to main content

Sampadkiya in 15April2013


पायरेटेड हक्क
आपल्यास जे समजले असे वाटते ते दुसऱ्यांना सांगून सकळजनास शहाणे करावे हे समर्थांनी कर्तव्य म्हणून सांगितले. भाषा,त्या आधारे होणारी संवादचर्चा, विचारविमर्श आणि निर्णयमीमांसा या प्रक्रियांतून माणसाची प्रगल्भता वाढते, सुसंस्कृती विकसते. त्या कारणे ग्रंथ-पुस्तके यांचे महत्त्व निर्विवाद मानले जाते. ग्रंथलेखन, ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथवाचन यांच्यातून संपन्न होणारी बौद्धिक संपदा श्रेेष्ठ मानली तरी आपल्याकडे तिचा वापर सर्व जीवमात्रासाठी व्हावा असेही समजण्यात येते. केवळ स्वत:साठी, पैसा कमावण्यासाठी आणि त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करून अन्य कुणी वापर केल्यास त्याची रॉयल्टी मिळण्यासाठी बुद्धी, ज्ञान, माहिती या गोष्टींचे पेटंट घेण्याची रीत ही आजच्या धंदेवाईकतेची देणगी आहे.

त्यामुळे पुस्तके लिहिण्यातून, ती प्रकाशित करण्यातून व विकण्यातून पैसाच पैसा मिळावा; संस्थांची संस्थाने व्हावीत आणि आपल्या ताब्यात जे ज्ञान-साहित्य येईल ते दुसऱ्यास लाभू देऊ नये हा अतिरेकी विकृत व्यवहार सुरू झाला आहे. विद्या दिल्याने वाढते, परंतु त्यायोगे पैसा, हक्क, मिरास हेसुद्धा वाढते हा आजच्या व्यवसायी ज्ञानमार्गींनी जपलेला मंत्र आहे. त्यामुळे पुस्तकांच्या किंमती, त्यांचे स्वरूप, त्यामधून होणारी प्राप्ती आणि त्यांचा वापर या सर्वच बाबतीत सामान्य स्थितीच्या वाचकाला पार मागे फेकले जाते.
वृत्तपत्रे, संगणक, सेलफोन इ. क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत वेगवान स्वस्ताई होत गेली. कागद, छपाई, संबंधित यंत्रणा या सर्वांचे खर्च वाढत जात असताना परस्परांशी स्पर्धा करण्यातून प्रारंभी कोणी एका वृत्तपत्राने आपली किंमत तीन-चार रुपयांवरून एक रुपयावर खाली आणली. बाजाराच्या दृष्टीने त्यावर गहजब झाला, आणि आपल्यावर खपाचा परिणाम होत जाईल त्यानुसार सगळयाच वृत्तपत्रांनी किंमती मुकाट्याने खाली आणल्या. उत्त्पन्नाचे इतर `बरेच' मार्ग त्यांना सापडले, ही उपलब्धी बाजूला ठेवली तरी वृत्तपत्रांचा खप वाढण्याला त्यांच्या कमी झालेल्या किंमती हे कारणही निर्विवाद आहे. सेलफोनचा वापरही तशा स्वस्ताईतून वाढत गेला आहे. आज दहा पैशात एक निरोप क्षणात देणे शक्य होते म्हणून तो वापरणारेही वाढले. त्याच प्रकारे आज पुस्तकांच्या बाजारात त्यांच्या उतरत्या किंमतींवरून गहजब चालू आहे. केवळ स्वामीत्वाचे आणि पुनर्प्रकाशनाचे हक्क एवढ्यावर ही गोष्ट थांबलेली असती तर त्यास बौद्धिक संपदा म्हणता आले असते. परंतु अशा बौद्धिक संपदेतून तयार होणारे पुस्तक सामान्य वाचकापर्यंत भरमसाठ किंमतीला जात असेल तर हा ज्ञानप्रसाराच्या वाटेने अंतरी को%पि हेतू असल्याचे दिसते.

 एके काळी ध्वनीमुद्रिका आणि त्यानंतरच्या काळात ध्वनीफिती यांच्या बाजारात नकलीपणास पंख फुटले. आजकाल कोणत्याही खेडोपाडी पूर्वकाळी लता-आशा-सुधीर यांनी गायिलेली गीते एकमेकांत मिसळून अथवा त्यांची नक्कल करून कोणीही गायक पिसाटत म्हणत असतो. त्याला कायद्याने रोख लावणे कुणालाच शक्य होत नाही आणि मुकाट्याने ही नक्कल मान्य करावी लागते. त्याचे कारण असेही असू शकते की मूळ गायकांच्या आवाजातील गाण्यांचा आस्वाद घेण्याइतका पैसा सामान्य रसिकाकडे नसतो. म्हणूनच तशा नकली बाजारात चलती असते. पूर्वापार चालत आलेली ही बाजाराची रीत आहे.

एकेकाळी  मान्यता पावलेल्या उच्चभ्रू पुस्तकांच्या नकला फुटपाथवर पन्नास-शंभर रुपयांत उपलब्ध होत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी धाडी टाकाव्यात यासारखा विनोद नाही. असल्या बंदीमुळे त्या बाजारातील नक्कल थांबविता येणे कठीणच नव्हे तर अशक्यच वाटावे. एखाद्या ख्यातकीर्त लेखकाचे चांगले पुस्तक बाजारात विकत घेऊ गेल्यास साधारण दीड रुपयांस एक पृष्ठ एवढी किंमत द्यावी लागते. संगणक आणि फोटोकॉपी यांच्या नव्या तंत्राने तसे पुस्तक एकदोन प्रती बनवू गेल्यास आठ आण्यात एक पृष्ठ या दराने करता येईल. अशा वेळी चांगले पुस्तक आपल्या संग्रहात ठेवण्याची ज्यांची उमेद आहे त्यांनीसुद्धा अशा पायरेटेड पुस्तकांचा आधार घेतल्यास नेमकी चूक कोणाची याचा उलगडा होऊ शकतो. एखादी प्रत तयार करण्यामुळे जर पुस्तकाची किंमत निम्मी होत असेल तर ज्यांनी हजार प्रतींची आवृत्ती काढली आहे त्यांचा तो मालकी हक्क असला तरी त्यांनी त्या पोटी किती रक्कम खिशात टाकावी याला बंधन नसले तरी ते स्वातंत्र्य जुमानले जाणार नाही. नक्कल करण्याचे हे समर्थन कदापि नव्हे, परंतु त्याचा आधार घेऊन अस्सलांनी वाटेल तसे वागावे यालाही अर्थ नाही.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...