पायरेटेड हक्क
आपल्यास जे समजले असे वाटते ते दुसऱ्यांना सांगून सकळजनास शहाणे करावे हे समर्थांनी कर्तव्य म्हणून सांगितले. भाषा,त्या आधारे होणारी संवादचर्चा, विचारविमर्श आणि निर्णयमीमांसा या प्रक्रियांतून माणसाची प्रगल्भता वाढते, सुसंस्कृती विकसते. त्या कारणे ग्रंथ-पुस्तके यांचे महत्त्व निर्विवाद मानले जाते. ग्रंथलेखन, ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथवाचन यांच्यातून संपन्न होणारी बौद्धिक संपदा श्रेेष्ठ मानली तरी आपल्याकडे तिचा वापर सर्व जीवमात्रासाठी व्हावा असेही समजण्यात येते. केवळ स्वत:साठी, पैसा कमावण्यासाठी आणि त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करून अन्य कुणी वापर केल्यास त्याची रॉयल्टी मिळण्यासाठी बुद्धी, ज्ञान, माहिती या गोष्टींचे पेटंट घेण्याची रीत ही आजच्या धंदेवाईकतेची देणगी आहे.
त्यामुळे पुस्तके लिहिण्यातून, ती प्रकाशित करण्यातून व विकण्यातून पैसाच पैसा मिळावा; संस्थांची संस्थाने व्हावीत आणि आपल्या ताब्यात जे ज्ञान-साहित्य येईल ते दुसऱ्यास लाभू देऊ नये हा अतिरेकी विकृत व्यवहार सुरू झाला आहे. विद्या दिल्याने वाढते, परंतु त्यायोगे पैसा, हक्क, मिरास हेसुद्धा वाढते हा आजच्या व्यवसायी ज्ञानमार्गींनी जपलेला मंत्र आहे. त्यामुळे पुस्तकांच्या किंमती, त्यांचे स्वरूप, त्यामधून होणारी प्राप्ती आणि त्यांचा वापर या सर्वच बाबतीत सामान्य स्थितीच्या वाचकाला पार मागे फेकले जाते.
वृत्तपत्रे, संगणक, सेलफोन इ. क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत वेगवान स्वस्ताई होत गेली. कागद, छपाई, संबंधित यंत्रणा या सर्वांचे खर्च वाढत जात असताना परस्परांशी स्पर्धा करण्यातून प्रारंभी कोणी एका वृत्तपत्राने आपली किंमत तीन-चार रुपयांवरून एक रुपयावर खाली आणली. बाजाराच्या दृष्टीने त्यावर गहजब झाला, आणि आपल्यावर खपाचा परिणाम होत जाईल त्यानुसार सगळयाच वृत्तपत्रांनी किंमती मुकाट्याने खाली आणल्या. उत्त्पन्नाचे इतर `बरेच' मार्ग त्यांना सापडले, ही उपलब्धी बाजूला ठेवली तरी वृत्तपत्रांचा खप वाढण्याला त्यांच्या कमी झालेल्या किंमती हे कारणही निर्विवाद आहे. सेलफोनचा वापरही तशा स्वस्ताईतून वाढत गेला आहे. आज दहा पैशात एक निरोप क्षणात देणे शक्य होते म्हणून तो वापरणारेही वाढले. त्याच प्रकारे आज पुस्तकांच्या बाजारात त्यांच्या उतरत्या किंमतींवरून गहजब चालू आहे. केवळ स्वामीत्वाचे आणि पुनर्प्रकाशनाचे हक्क एवढ्यावर ही गोष्ट थांबलेली असती तर त्यास बौद्धिक संपदा म्हणता आले असते. परंतु अशा बौद्धिक संपदेतून तयार होणारे पुस्तक सामान्य वाचकापर्यंत भरमसाठ किंमतीला जात असेल तर हा ज्ञानप्रसाराच्या वाटेने अंतरी को%पि हेतू असल्याचे दिसते.
एके काळी ध्वनीमुद्रिका आणि त्यानंतरच्या काळात ध्वनीफिती यांच्या बाजारात नकलीपणास पंख फुटले. आजकाल कोणत्याही खेडोपाडी पूर्वकाळी लता-आशा-सुधीर यांनी गायिलेली गीते एकमेकांत मिसळून अथवा त्यांची नक्कल करून कोणीही गायक पिसाटत म्हणत असतो. त्याला कायद्याने रोख लावणे कुणालाच शक्य होत नाही आणि मुकाट्याने ही नक्कल मान्य करावी लागते. त्याचे कारण असेही असू शकते की मूळ गायकांच्या आवाजातील गाण्यांचा आस्वाद घेण्याइतका पैसा सामान्य रसिकाकडे नसतो. म्हणूनच तशा नकली बाजारात चलती असते. पूर्वापार चालत आलेली ही बाजाराची रीत आहे.
एकेकाळी मान्यता पावलेल्या उच्चभ्रू पुस्तकांच्या नकला फुटपाथवर पन्नास-शंभर रुपयांत उपलब्ध होत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी धाडी टाकाव्यात यासारखा विनोद नाही. असल्या बंदीमुळे त्या बाजारातील नक्कल थांबविता येणे कठीणच नव्हे तर अशक्यच वाटावे. एखाद्या ख्यातकीर्त लेखकाचे चांगले पुस्तक बाजारात विकत घेऊ गेल्यास साधारण दीड रुपयांस एक पृष्ठ एवढी किंमत द्यावी लागते. संगणक आणि फोटोकॉपी यांच्या नव्या तंत्राने तसे पुस्तक एकदोन प्रती बनवू गेल्यास आठ आण्यात एक पृष्ठ या दराने करता येईल. अशा वेळी चांगले पुस्तक आपल्या संग्रहात ठेवण्याची ज्यांची उमेद आहे त्यांनीसुद्धा अशा पायरेटेड पुस्तकांचा आधार घेतल्यास नेमकी चूक कोणाची याचा उलगडा होऊ शकतो. एखादी प्रत तयार करण्यामुळे जर पुस्तकाची किंमत निम्मी होत असेल तर ज्यांनी हजार प्रतींची आवृत्ती काढली आहे त्यांचा तो मालकी हक्क असला तरी त्यांनी त्या पोटी किती रक्कम खिशात टाकावी याला बंधन नसले तरी ते स्वातंत्र्य जुमानले जाणार नाही. नक्कल करण्याचे हे समर्थन कदापि नव्हे, परंतु त्याचा आधार घेऊन अस्सलांनी वाटेल तसे वागावे यालाही अर्थ नाही.
Comments
Post a Comment