महिला व बाल कल्याणाचा पाया घालणारे
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान
गरजू महिलांना बहिणीचा आधार देणारी ही संस्था ४३ वर्षांची झाली. १ एप्रिल हा संस्थेचा स्थापनादिन. त्यानिमित्ताने.....
- विनिता तेलंग (फोन : ९८९०९२८४११)
स्वामी विवेकानंदांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मार्गारेट नोबल ही आयरिश तरुणी भारतात आली. तिने स्त्री शिक्षणासाठी पायाभूत काम केले. भगिनी निवेदितांच्या समर्पित आयुष्याने भारून एका ध्येयवेड्या तरुणीने एकटीच्या बळावर महिलांच्या उत्थानासाठी काम करण्याचे स्वप्न पाहिले.
स्वत:चे वैद्यकीय शिक्षण संपवल्यानंतर, खाजगी प्रॅक्टीस करून पैसा गाठीशी बांधण्यात स्वारस्य नसलेली एक डॉक्टर तरुणी काही वेगळेच स्वप्न पाहात होती. डॉ.कुसुम घाणेकर, नागपूर ही ती युवती! स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी सर्वव्यापी कामाची गरज आहे हे ओळखून, त्यांनी एक युवतींचा गट बांधला व ६८-६९ सालापासून त्याला संघटनेचे रूप द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कार्यक्षेत्र निवडले सांगली.१९६७ साल भगिनी निवेदितांची जन्मशताब्दी. १९७० साली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या नावाने काम करण्याचे ठरले. सुरुवात झाली ती `माहेर' या योजनेतून. डॉ.कुसुमताइंर्ना सहकार्य करायला पुढे आलेल्या अनेक स्त्रिया अशा होत्या की काही कारणाने कुटुंबाचा आधार नाही व आश्रयासाठी सुरक्षित स्थान नाही. त्यांच्या हक्काचा आधार म्हणून हे `माहेर' उभे राहिले.
कुसुमताई व त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत समर्पणाने साथ देणाऱ्या सहकारी कमलताई जोग यांना हळूहळू अनेक कामे दिसू लागली. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालेले नव्हते, त्यांच्या सबलीकरणाचे भान कुठून असणार? त्यावेळी ग्रामपंचायत पातळीवर तुरळक स्त्रिया निवडून येत. (आज हे प्रमाण मोठे आहे व त्यांच्यासाठी खूप प्रशिक्षणे असतात.) त्याकाळी अशा सेविकांना प्रशिक्षण देणे हे कुसुमताइंर्च्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. आजच्या अनेक सरकारी योजनांच्या मागे कुसुमताइंर्ची कल्पकता, प्रयोगशीलता व ते प्रयोग यशस्वी करून दाखवण्याची धडाडी आहे. कामावर जाणाऱ्या सर्व स्तरातील महिलांच्या बालकांसाठी पाळणाघरे असावीत ही कल्पनाही तेव्हा नवीन होती. सुदैवाने त्यावेळचे सहकारी व सरकारी अधिकारी खूप चांगले, त्यामुळे पाळणाघरांची योजना सरकारच्या साहाय्याने व `निवेदिता'च्या योजनाबद्ध यंत्रणेतून पुष्कळ फोफावली. नंतर आलेल्या अंगणवाड्या, शिक्षिकांचे प्रशिक्षण ही कामेही सरकारने मोठ्या विश्वासाने निवेदितावर सोपवली.
कुसुमताइंर्ना राष्ट्न्सेविका समितीच्या कार्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे त्यांचा दृष्टीकोन, कामाची योजना खूप विशाल होती. महाराष्ट्नसोबतच कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांतही निवेदिताची पाळणाघरे सुरू झाली. त्यांची संख्या तीनशेवर गेली. त्यांनी त्या त्या विभागातली कामे स्थानिक समित्या नेमून, त्यांना अधिकार देऊन त्यांच्यावर सोपवली व ती कामे मार्गी लावून त्या दुसऱ्या योजनेचा वेध घ्यायला लागल्या.
हळूहळू काळाच्या मागणीनुसार येणारी समुपदेशन केंद्रे, कुटुंब सल्ला केंद्रे, कॉम्प्यूटर ट्न्ेिंनग, पाळणाघरांसाठी खाऊ पुरवणे, कायदा सल्ला केंद्रे ही कामेही सुरू झाली. सांगलीत सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या सौ.लीना मेहेंदळे यांच्याशी एकदा देवदासींच्या प्रश्नावर चर्चा झाली. ही समस्या खूप भीषण. एक जुना वाडा जत येथे घेऊन तिथे देवदासी महिलांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यास सुरुवात झाली. परंतु या देवदासी महिलांची मुख्य समस्या होती त्यांच्या मुली! त्यांनी या व्यवसायात येऊ नये, त्या प्रथेला बळी पडू नये यासाठी गरज होती या मुलींना वेगळे ठेवून त्यांना शिक्षण देण्याची. ही योजना संस्थेला स्वत:च्या शक्तीवर रेटणे शक्य नव्हते. हा प्रश्न महाराष्ट्न्-कर्नाटक व अन्य ठिकाणी व्यापक प्रमाणावर असल्याने सरकारने त्याची दखल घेऊन योजना बनवली तर मोठ्या प्रमाणावर देवदासींना लाभ होणार होता. यासाठी कुसुमताई-कमलाताई विधिमंडळाकडे धावल्या. सरकारनेही या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्काळ ही योजना सुरू केली. जतला लीनाताइंर्च्या सहकार्याने देवदासींच्या मुलींचे वसतीगृह सुरू झाले. ७५ क्षमतेच्या या वसतीगृहात (सुदैवाने) आज इतक्या देवदासींच्या मुली नाहीत व आता असे लेबल लावून त्यांना वेगळे ठेवू नये असे सरकारचे धोरणही असल्याने हे वसतीगृह सर्वसमावेशक (सर्वच प्रकारच्या अनाथ, असहाय मुलींसाठी) होत आहे.
९० च्या दशकात देश एका नव्या समस्येत सापडला. एडस्चे थैमान सुरू झाले. भीती व गैरसमज होते. सरकारला उपाययोजनेची दिशा ठरवण्यासाठी एखादा पायलट प्रोजेक्ट करणे तातडीचे व गरजेचे होते. पुन्हा भगिनी निवेदिता हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे आली. एडस्ग्रस्त महिला व त्यांच्या मुलांसाठी प्रकल्प सुरू झाला. औषधांचा अभाव, पर्यायी उपचार अजून यायचे होते त्यामुळे मृत्यूदर खूप होता. संस्थेने या काळात खूप बदनामी सोसून हा प्रकल्प रेटून नेला. कुसुमताइंर्चे उजवे-डावे हात बनलेल्या नसीम व नीता या सहकारी त्या आठवणींनी आजही शहारतात. एडस्ने मृत्यू पावलेल्या महिलांना क्रियाकर्मासाठी कुणी हात लावत नसे. अशा वेळी खंबीरपणे या महिलांनी स्वत: अंत्यसंस्कार केले आहेत. पुढे हा प्रकार लक्षात आल्यावर कै.रामभाऊ खाडिलकरांनी ही जबाबदारी स्वीकारली व त्यांच्या अखेरपर्यंत ती निभावली. कुसुमताई स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी आयुर्वेदाच्या व आहारशास्त्राच्या मदतीने पूरक उपचार सुरू केले व हळूहळू परिस्थिती पालटली. या प्रयोगाचा शासनाला पुढील धोरणे ठरवताना खूप उपयोग झाला.
एडस्ग्रस्त स्त्रियांच्या आलेल्या पहिल्या बॅचमध्ये नऊ नेपाळी मुली होत्या. त्यांना पुन्हा संस्थेबाहेर सोडणे म्हणजे पुन्हा त्याच व्यवसायात ढकलणे होते. संस्थेने नेपाळ सरकारकडे पाठपुरावा केला व त्या मुलींना नेपाळ सरकारमार्फत त्यांच्या घरी सुरक्षित पाठविले. संस्थेच्या आश्रयाला आलेल्या स्त्रियांच्या लहान मुली त्या मातांच्या मृत्यूनंतर संस्थेनेच सांभाळल्या, वाढवल्या व योग्य वयात योग्य ठिकाणे पाहून त्यांचे विवाहही केले. अशा आठ-नऊ मुलींची लग्ने संस्थेने यथासांग करून दिली आहेत.
प्रामाणिकपणे काम करणे, व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे, कुठेही फसवाफसवी नाही यामुळे सरकारी खात्यांत निवेदिताच्या नावाला चांगली पत होती. याचा प्रत्यय लातूर भूकंपाचे वेळी आला. त्या आघातात अनेक बालके अनाथ झाली. मुख्यमंत्र्यांनी हक्काने १०० मुले सांभाळण्यासाठी निवेदिताच्या ताब्यात दिली. शासनाच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी सर्वेक्षण करण्याचे किचकट कामही संस्थेच्या महिलांनी गावोगाव फिरून चिकाटीने पूर्ण केले.
बालिकावर्षाच्या निमित्ताने किशोरी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी असो वा अनाथाश्रमातील मुलांसाठी एक महिन्याची क्रीडा वा व्यक्तिमत्व विकासाची उन्हाळी शिबिरे, या गोष्टी आता खूप फोफावल्या असल्या तरी ३५-४० वर्षांपूर्वीच्या काळात हे करणारी निवेदिता ही एकमेव संस्था होती.
अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना पोषक आहार देण्याची योजना आली तेव्हाही या योजनेच्या खाऊसाठी टेंडर न काढता महिलांच्या बचतगटांना कामे द्यावीत यासाठी कुसुमताइंर्नी आग्रह धरला होता.
आज संस्थेची सांगली व नागपूर येथे सुमारे १०० क्षमतेची `वर्किंग वुमन्स होस्टेल' आहेत. यशवंतनगर येथे अनाथ बालिकागृह व एडस्ग्रस्त मुलींचेही वसतीगृह चालवले जाते. निराधार वा पोलीस केसमध्ये गुंतलेल्या महिलांसाठीचे तात्पुरता निवारा (शॉर्ट स्टे होम) केंद्रही चालवले जाते.
एडस्ग्रस्त मुलांना स्वीकारण्याची समाजाची मानसिकता घडवणे हेही सोपे काम नव्हते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या मुलींना शाळा बसू देत नव्हत्या. आज या मुली शाळेत सर्व कार्यक्रमात अग्रभागी असतात. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेली बक्षिसे संस्थेच्या यशवंतनगर येथील कार्यालयात अभिमानपूर्वक मांडलेली दिसतात.
चार वर्षांपूर्वी संस्थेच्या संस्थापक डॉ.कुसुमताई घाणेकर यांचे निधन झाले. कुसुमताइंर्सोबत सतत २५ वर्षे काम केलेल्या कु.नसीम शेख यांच्यावर कुसुमताइंर्नी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्याही तितक्याच समर्थपणे व परिपप्तेने संस्थेची धुरा सांभाळत आहेत. त्यांना श्रीमती मथुताई करमरकर वयाच्या एेंशी वर्षांनंतरही साथ देत आहेत. कुसुमताइंर्च्या सहवासात तयार झालेल्या सौ.नीता दामले, गेल्या वीस-बावीस वर्षांपासून संस्थेत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी कु.नसीम काझी या भगिनी `निवेदिता'चे काम पेलत आहेत.
बालगृह व बालसदन या दोन्ही युनिटस्मधील सुमारे १०० मुलींसाठी काही देणगी मदतीचे स्वागत आहे!
संस्थेचा पत्ता :
राजवाडा संकुल, संग्रहालयाजवळ, सांगली
(फोन : ०२३३ - २३७६७८०)
Comments
Post a Comment