विठूचा शासकीय दर
हल्ली भक्ताच्या हाती गडगंज पैसा खेळू लागल्यामुळे तो देव-देवस्थानांच्या चरणी ओतू लागला आहे. त्या बाबतीत उत्तर-दक्षिणेत भेद नाही. पद्मनाभ, साई, तिरुपती, सिद्धीविनायक, स्वामीनारायण अशी अतिश्रीमंत देवस्थाने संपत्तीत डुंबत आहेत. गावागावातल्या सगळयाच देवदैवतांना सोन्याचे दिवस आले आहेत.
परंतु पंढरीचा विठुराया मात्र या सुवर्णलाटेतून वेगळा होता. `भक्तांचिया काजासाठी, साधूंचिया प्रेमासाठी, सोडिली मी लाज रे ।' असे म्हणणारा विठ्ठल हा सामान्य वारकऱ्यांचा देव होता. त्याला कोंबडं-बकरं तर सोडाच, पण क्षुल्लक नवसाचा वायदासुद्धा कुणी करत नसत. त्याला विनवणी गावी, आळवणी करावी, करुणा भाकावी इत्यादी एकतर्फी भावाचा तो भुकेला होता. वारीच्या वक्ताला तिथं गर्दी वाढत राहिली पण पुरेशी शौचालये आणि गटारेही करता येत नव्हती. परंतु एखाद्या ऑफीसात सगळी माणसे चकाचक होऊन अपटुडॅट्ट वागू लागली की जुन्या धोतरचपलातील धोंडोपंतासही बदलावेच लागते तशी विठूची वेळ आली.
हा विठोबा नवसाला पावला म्हणून एका कंत्राटदारानं त्याच्यासाठी दीड हजार कोटि रुपयांची देणगी जाहीर केल्याचे वृत्त आहे. विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान न्यासाचे अध्यक्ष श्री.आण्णासाहेब डांगे यांनी एका मेळाव्यात ही माहिती दिली. बंगलोरच्या एका कंत्राटदाराचे केंद्रशासनाकडे ९ हजार कोटिचे बिल अडकले होते, त्याने पंढरपूरला साकडे घातले आणि दहा दिवसात बिलाचे पैसे त्याला मिळाले. त्याने विठोबाला दिलेला शब्द पाळला. श्री.डांगे यांनी पुस्ती जोडली की, ``पांडुरंगाच्या मनात काय आहे कळत नाही. पण आम्ही पंढरपूर क्षेत्राचा विकास करायचा बेत ठरवताच पैशाचा पाऊस पडू लागला असा अनुभव येत आहे. दिल्लीतूनही पाचशे कोटिंच्या मदतीसाठी निमंत्रण आले आहे.''
त्या कंत्राटदाराने सरकारी बिले लवकर मिळण्यासाठी १५% रक्कम विठोबाला दिली. हा दर अंमळ जास्तच वाटतो. पण शासकीय कंत्राटांबद्दल आपण पामर काय बोलणार? सावळा विठू आजवर आमचं (फुकट) ऐकून तरी घेत होता. आता त्याच्यापर्यंत पोचता येईल का, ही शंकाच!!
कुख्यात मार्ग
पूर्वी काही तळमळीचे लोक शाळा काढायचे, आणि प्रारंभी `न्यू इंग्लिश स्कूल' छापाचं सोप्पं नाव द्यायचे. काही काळातच कुणी मोठी देणगी दिली की त्याच्या म्हणण्याप्रमाणं नाव बदलून घेता येत असे. गेल्या शेदोनशे वर्षांत रस्त्यांना नाव देण्याची प्रथा आली. ब्रिटिश काळात मुंबई केंद्र मोठे झाले, त्यात मिंट रोड, क्वीन्स रोड, ग्रँट रोड आले. स्वातंत्र्यानंतर तिथे देशी नावे येऊ लागली. आता गावोगावी गांधी-नेहरू-आंबेडकर मार्ग झाले. गावे वाढली तसतशी स्थानिकांना स्थान मिळू लागले. तरीही त्यासाठी गावात काही कर्तृत्त्व गाजविणाऱ्या प्रतिष्ठिताचे नाव त्या भागाशी - रस्त्याशी संबद्ध असावे इतकी काळजी आवश्यक मानली पाहिजे.
आपापल्या गल्लीत `उगवती नेतृत्त्वं' पुंडगिरी करतात, त्यांच्या वाढदिवसाचे फलक त्यांचे कडे-चेन-मोबाईलसह झळकतात. आता तेवढ्यावर भागत नाही तर त्यांचे नाव तेथील रस्त्याला झळकू लागते. अचानक एके दिवशी एका नक्षीदार खांबावर आकर्षक फलक `गंपू झपके मार्ग' मिरवू लागतो. रस्त्यांची जुनी नावे लोकांच्या मुखी असतात, परंतु स्थानिक रहिवाशांची मागणी, नगरपालिकेचा ठराव, त्याची रीतसर नोंद अशी काही पद्धत आहे. ती धाब्यावर बसवून कोणीतरी आपल्या मर्जीचे नाव ठोकून देतो. त्यातही ती व्यक्ती पोलिसी खात्यास `मोस्ट वॉन्टेड' असेल तर?
- तर काय? या मार्गावर चालणाऱ्या प्रजेचे मोल आपोआपच समजून येईल. उद्याच्या काळात `वीरप्पन मार्ग, अजमल कसाब पथ, बेआन्तसिंग चौक' यांचीही प्रतीक्षा आहे. `त्या' मार्गांची वाटचाल आपल्यास नेणार कुठे?
Comments
Post a Comment