एकत्रीकरणात जिवंतपणा यावा
`व्हायला हवे' असं तर अनेकांना अनेक प्रकारे वाटत असे. परंतु `ते करणार कोण?' या प्रश्नावर सगळेच निरुत्तर होतात. एखादा प्रयत्न, मूलभूत समस्येवर पर्यायी उत्तर, एखादी संस्था-संघटना, असे काही सामुदायिक कार्य करण्यासाठी कोणी घराचा उंबरठा ओलांडला की प्रथमत: त्याचे स्वागत शाबासकीने होते हे खरे, पण त्या प्रोत्साहनाच्या आधारे कार्य विस्तारण्याची दिशा मिळू लागली की त्यास फाटे फुटू लागतात.
प्रारंभापासूनच अनंत सूचनांस तोंड दिलेले असते; परंतु त्यातून इष्ट ते स्वीकारत मर्यादित संख्येचा गट किंवा एखादीच व्यक्ती सामाजिक स्वरूपाचे काम करत असते. त्या कार्याची गरज त्या कार्य`कर्त्या'ला पटलेलीच असते. त्याच्या त्या प्रयत्नांकडे बघणाऱ्यांच्या तऱ्हा मात्र वेगवेगळया असतात. काहीजण त्या कामाला भरभरून प्रतिसाद देतात, यथाशक्ती पैसे देतात, हे कार्य व्हायला हवे... ते तुम्ही करत आहात... असे प्रोत्साहन देतात. दुसरा गट सावध लोकांचा असतो, ते लोक प्रारंभापासून संशयाने पाहातात, काम चांगले रूप घेऊ लागले तर त्यात सहभागी होऊन नियम-शिस्त यांविषयी कांगावा करतात, हेतू प्रत्यक्षदर्शी शुद्ध असला तरी त्यांची पद्धती अशी की त्यातून कार्यहानी होऊ शकेल. तिसऱ्या प्रकारात सर्वस्वी विरोधकच असतात. `या कार्याचा काही (स्वरात `का%%%ही') उपयोग नाही, कुणी सांगितलंय ते, आपापलं काम करा म्हणावं' इत्यादी शेरेसूचनांचा भडिमार असतो, काम करणाऱ्यांना तुच्छ लेखण्याचा ते आनंद घेतात. याखेरीज इतरेजन या सर्व विश्वातील व्यवहाराशी काडीमात्र संबंध ठेवत नाहीत, त्या निरिच्छ उदासीन पदार्थांना कशाची खंत ना खेद, सुख ना आनंद!
या सर्व तऱ्हांचा मिळून समाज बनलेला असतो, त्यामुळे ज्या कुणाला सामुदायिक-सामाजिक स्वरूपाचे काम करावेसे वाटते त्याने ते या सर्वांसाठीच करणे अपेक्षित असते. जसे निवडणुकीत कोणी एक उमेदवार जिंकला, तरी तो पूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून वागला पाहिजे. समुदाय किंवा समाज म्हणून ज्यांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न कार्य समजून करायचा त्या उद्दिष्टावरून एकत्रीकरणाचे स्वरूप ठरते. व्यवसाय, राजकीय विचार, धर्मश्रद्धा, अन्याय-समस्या, ज्ञाती, प्रदेश, भाषा, कुल-घराणे अशा समानत्त्वावर समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न सर्वत्र होत असतो. सध्याच्या काळात सार्वत्रिक विस्कळीतपणा मातलेला आहे, त्यामुळेच अशा संघटन प्रयत्नांचीही गर्दी सभोवती दिसते. अशा सर्व प्रयत्नांमध्ये समाजघटकांच्या `त्या' तऱ्हाही तितक्याच प्रकर्षाने प्रभावी झाल्याचे दिसते.
त्यापैकी प्रारंभी सावधपणी मागे राहून नंतर आक्रमकतेने पुढे येणारा गट प्रत्येक सार्वजनिक कार्यात अडथळे निर्माण करतो. कोणत्याही कार्यातील अशा धूर्त गटांना सार्वत्रिक महत्त्व प्राप्त होत असल्याने कोणताही राजकीय पक्ष सध्या उद्दिष्टे वा कामगिरीपासून दूर पडला आहे. तसेच चित्र इतर क्षेत्रांत दिसते. कामगार चळवळ नेतेगिरीमुळे क्षीण झाली. नाटक-साहित्य संस्थांच्या प्रारंभकाळी जी आस-उमेद होती त्यातून कलाविष्कार संपला आणि नियम-कायद्यांच्या जाळयात कार्य लुप्त झाले. शेतकरी आंदोलनात `सेकंड रँक' पुढे आल्यावर मूळ हेतूंच्या कण्यापासून सुटलेले आंदोलनांचे झिजके टायर रस्त्यात पेटू लागले. सीमाप्रश्नावर आयुष्ये झोकणाऱ्या संयुक्त महाराष्ट्न् समितीने केंद्रशासनाला एके काळी घाबरे केले होते; तो प्रश्न न सुटता अनेकविध नेत्यांनी आपली दुकाने चालवत, कोणत्या नियम-तत्त्वांनी हा प्रश्न सुटणार आहे याविषयी भ्रम निर्माण करून कार्यहानी केली आहे.
प्रारंभकार्यांनी मनावर घेतलेले एकत्त्वसाधनेचे उद्दिष्ट असे रखडते. ही तर प्रत्यक्ष दृश्य हानी होतेच; पण त्यापेक्षा संपूर्ण उद्दिष्टगटावर-समुदायावर अदृश्य परिणाम होतो हे अधिक वाईट असते. कारण ही विघ्नकारी तथाकथित तत्वनिष्ठा, स्वयंकेंद्री प्रतिष्ठेला जास्त महत्त्व देऊ लागते. पद-पैसा-मोठेपणा-प्रसिद्धी यांचे वलय निर्माण करत स्वयंकेंद्री प्रतिष्ठा वाढू लागते. त्या `तऱ्हेच्या' थरातील सर्वजण त्याच त्या प्रयत्नात असल्यामुळे `तात्विक मतभेद' नावाची भांडणे सुरू होतात. निवडणूक, कोर्टबाजी, ऑडीट यांस महत्त्व येते. स्वाभाविकच प्रारंभकर्त्यांना उबग येऊन त्यांना समाजचिंतनावर समाधान मानावे लागते; तर `असल्या उचापतीं'ना प्रारंभापासून विरोध करणाऱ्यांना जोर चढून त्यांची बत्तीशी खरी ठरल्याचे त्यांना समाधान मिळते.
या सगळया आजकालच्या सामुदायिक पद्धतींतून सुटका करून मार्ग प्रशस्त करणे फार आवश्यक आहे. एखाद्या कारखान्यात कामगारांच्या हितासाठीच व्यवस्थापनाशी भांडणाऱ्या दोन युनियन्सचा वाद असतो; त्याच चालीवर समर्थविचारांचा प्रसार करू म्हणणाऱ्या दोन पादुकायात्रा आपसात समन्वय करण्यात असमर्थ ठरतात; योगेश्वराचा जयकार करणाऱ्या परिवाराची ताई स्वाध्यायाच्या किल्ल्या आपल्याच कनवटीला लावत असल्याबद्दल नाराजी पसरते. त्याचप्रमाणे ज्ञाती किंवा कुलसंघटनेलासुद्धा धोका असतो. प्रारंभकार्य एका तळमळीतून, विश्वासार्हतेने, अल्प साधनांवर चालत येते. त्याचा विस्तार होण्यासाठी विधिनियम-कार्यपद्धती यांची गरज असतेच, परंतु हा सांगाडा सांभाळण्याच्या नादात घराचे `घरपण' नाहीसे होऊ नये हे पाहायला हवे. ते नाहीसे झाले तर घर सोडून दूर जाणाऱ्यांना रोखता येत नाही.
आजकाल मनुष्यसमाज विस्कळीत होत चालला असताना हे `सामाजिक घरपण' जपण्याचे आव्हान आहे. आपापल्या घर-घराण्यांपासून वैश्विक पातळीवरच्या कोणत्याही `एकत्त्वा'साठी ते भान असले पाहिजे. ते भान येण्यासाठीही पुन्हा एकत्त्वातूनच दिशा मिळत असते. म्हणून एकत्त्वाचे प्रयत्नच थांबविणे हा उपाय कदापि नाही; तर उद्दिष्टाप्रत जाण्याची ती दिशा देणारे भान देत राहिले पाहिजे. एक समाज म्हणून आपले सामाजिक कर्तव्य तेच राहील. कुटुंबाची बांधणी सामाजिक पातळीवर आणि समाजाची बांधणी कौटुंबिक पातळीवर झाली तरच एकत्रीकरणात समरसता येईल. अन्यथा अनेक नियमांवर चालणारे विस्कळीत कुटुंब तयार होईल.
Comments
Post a Comment