चित्पावन कुले व कुलवृत्तांत
नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३)
विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात.
कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही.
गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन प्रवर असणारी काही कुटंुबे आहेत. चार प्रवर नसावेत व पाचापेक्षा अधिक प्रवर असू नयेत, असा निर्णय शास्त्रकारांनी करून ठेवला आहे. प्रवरातील पहिले ऋषी त्या प्रवराचे निर्माते आणि त्यापुढील ऋषी हे ती ज्ञानशाखा वा परंपरा चालविणारे होत. गोत्र प्रवर्तक ऋषींचे नाव प्रवरामध्ये असावे असा निर्बंध नाही. हल्ली जसे `मी अमूक विद्यापीठाचा डॉक्टरेट' म्हणतो, तशी ही ऋषिपरंपरा `गोत्र' म्हणून सांगितली जात असे.
चित्पावन १४ गोत्रांपैकी कपी, नित्युनंद, ब्राभ्रव्य, वत्स आणि विष्णुवृद्ध यांच्या प्रवरात गोत्रप्रवर्तक ऋषींचा नामनिर्देश नाही. गोत्र ऋषी आणि प्रवर ऋषी यांचा पौर्वापर्य संबंध निश्चित सांगता येत नाही. तथापि प्रवर ऋषी हे त्या गोत्रात होऊन गेलेले श्रेष्ठ ऋषी होत. `आम्ही वासुदेव बळवंत यांच्या कुळातील' असे सांगितले जाते, तसेच हे. गोत्र व प्रवर यासंबंधीचे विवेचन `श्रौतसूत्रे', `महाभारत', `निर्णयसिंधू', `धर्मसिंधू', `संस्कार रत्नमाला' आदी ग्रंथात आढळते.१४ मन्वंतरापैकी तामस मन्वंतरातील सप्तऋषीपैकी कपी ऋषी एक होते व दुसरे ऊरुक्षय ऋषींचे पुत्र असे उल्लेख वायुपुराणात आढळतात. अंगीरसाचे अथर्वांगिरस व भृग्वांगिरस अशा जोडनावांचे वेदात उल्लेख आढळतात. अंगीरसाने ब्रभु व सैधवायन यांना अथर्ववेद पढविला असा श्रीमत् भागवत ग्रंथात उल्लेख आढळतो.ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील ६१ व्या सूक्ताचा `अमहिमु' हा कर्ता पुरुष आहे. ऊरुक्षय आमहीयव हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील ११८ व्या सूक्ताचे द्रष्टे समजले जातात. विष्णुपुराणातील उल्लेखात विशाला नावाच्या भार्येपासून त्रैमारूण, पुष्करीत व कपी ऋषी असे तीन पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो.
विविध शिलालेख व ताम्रपट यामध्ये व्यक्ती व आडनावापेक्षा गोत्र व सूत्र यांचे उल्लेख असतात. चित्पावन विविध गोत्रातील आडनावांची परंपरा ५०० वर्षांपूर्वीची असावी इतपत संदर्भ आढळतात. स्थान, व्यवसाय, वृत्ती, अधिकार यांस अनुसरून आडनावांची निर्मिती झाली. बरीच आडनावे पुढे `कर' असे लावून गाव निर्देशित करतात. मंगलकार्य, वार्षिक नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार, धार्मिक कार्य अशा प्रसंगी गोत्र प्रवरांचा उल्लेख आवश्यक मानलेला असतो. चित्पावनांची ६० मूळनामे म्हणून समजली जातात. यापैकी ३८ आश्वलायन व २३ हिरण्यकेशी शाखेची आहेत. आश्वलायन हे ऋग्वेदी होत व हिरण्यकेशी हे यजुर्वेदी तैत्तरीय या शाखेचे अनुयायी आहेत. त्यांच्या सगोत्रात विवाह ठरवीत नाहीत. अत्री गोत्र मात्र सर्व गोत्रांशी जमते. त्यामागची तर्कसंगती अभ्यासकांनी मांडायला हरकत नाही. तथापि प्राचीन कुलपरंपरा ज्ञान, वृत्ती, मनुष्यधर्म व व्यावहारिकता यांनुसार रूढ झाल्या होत्या असे म्हणता येते. आजच्या काळात त्यातल्या कोणत्या पाळायच्या हेही काळ ठरवेल.
काही चित्पावन ब्राह्मण कुटुंबात देवदिवाळी, बलिप्रतिपदा, फाल्गुनी पौर्णिमा, श्रावणी सोमवार यांवेळी महानैवेद्याची प्रथा आहे. आश्विनातील देवीचा नवरात्रौत्सव व मंगल कार्यानंतर बोडण चंपाषष्ठीला खंडोबाची नळी भरणे, गोंधळ, तर काही घराण्यात गिरीचा व्यंकोबा दर्शन झाल्यावर पारणे घालणे, आदी कुलधर्म, कुलाचार आहेत. ओहर जाणे, झडके, वाडवळ वगैरे कुलाचार अनेक चित्पावन कुटुंबात आढळतात.
आपटे घराण्याचा कुलवृत्तांत १९१४ साली सर्वप्रथम तयार झाला त्यानंतरच्या ३२ वर्षांत (१९४६) ३८ कुलवृत्तांत झाले. कुलवृत्तांत तयार करण्याची मानसिकता चित्पावन कुटुंबियातच मोठ्या प्रमाणात आढळते. दि.१६/०७/१९३८ ला पुणे येथे विविध चित्पावन आडनावांचे कुलवृत्तांत तयार करण्यासाठी `कुलवृत्तांत संघ' स्थापन झाला. श्री.कृष्णाजी विनायक पेंडसे यांनी पेशव्यांच्या दप्तरातील विविध प्राचीन संदर्भ दर्शविणाऱ्या कागदपत्रांवरून माहिती संकलित केली होती, तिचा उपयोग कुलवृत्तांत ग्रंथांसाठी झाला. प्रत्येक कुलवृत्तांत पुनर्जीवित करणे, नवीन नोंदी करणे, आधुनिक छपाई करणे वगैरे भाग जरी खर्चाचे असले तरी गरजेचे आहेत. आज शे-सवाशे घराण्यांचे कुलवृत्तांत झाले.
Comments
Post a Comment