कराचीतील एक अधिकारी : रावबहादुर फडके
सिंध प्रांतातील कराची, स्वातंत्र्यापूर्वी मुंबई इलाख्यात होते. तिथे मराठी वसती खूप होती. `सिंध-मराठा' नावाचे मराठी साप्ताहिक वृत्तपत्र तिथे निघत असे. त्याच्या १९३८ सालच्या अंकात आलेला हा वृत्तांत. यातील भाषा आणि तपशील त्या काळच्या विविध बाबींवर प्रकाश टाकू शकतील.
जन्म व शिक्षण
रावबहादूर फडके यांचा जन्म ता.२१ अक्टोबर १८८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दोणवली येथे गरीब व प्रामाणिक अशा आईबापाच्या पोटी झाला. इ.स.१९०० म्यॅट्नीकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते १९०१ मध्ये सरकारी कॉलेजात सरकारी शिष्यवृत्ती मिळवून दाखल झाले. १९०२ साली पदवीधर होऊन पहिला नंबर पटकाविला. इ.स.१९०४ मध्ये असिस्टंट व्हेटरिनरी ऑफिसर म्हणून नेमणूक होते न होते तोच त्यांना मुक्तेसर येथे त्याच वर्षी व्हेटरिनरी इन्स्पेक्टरच्या मोठ्या हुद्द्यावर बढती मिळाली. १९०८ मध्ये परत त्यांची मुंबईच्या कॉलेजात बदली होऊन अखेरीस १९१२ मध्ये कॉलेजचे लेक्चरर म्हणून नेमण्यात आले.
परदेश गमन
इ.स.१९१२ च्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक सरकारने त्यांची योग्यता व हुशारी ओळखून उच्च शिक्षणासाठी त्यांना विलायतेत पाठविले. रावबहादूर जेथे जेथे म्हणून गेले तेथे तेथे त्यांनी आपले कर्तबगारीवर व विलक्षण बुद्धिचातुर्यावर आपल्या वरील वरिष्ठ अधिकारी व प्रोफेसर यांची मर्जी संपादन केली व त्यांच्या प्रशंसेस पात्र झाले. त्यांचे शास्त्रीय ज्ञान, कार्यनिष्ठा व समाजात मिळून मिसळून वागण्याची प्रवृत्ती या गुणांमुळे ते क्यामडेन टाऊन येथील विश्व विद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर ते १९१४ मध्ये मुंबईत परत आले.
महायुद्धातील कामगिरी
इ.स.१९१४ मध्ये जागतिक महायुद्धाचा भयंकर वणवा पेटला. जगाच्या कानाकोपऱ्यांतून लढाईतील संकटग्रस्त लोकांच्या शुश्रुषेसाठी स्वयंसेवकांची एकसारखी मागणी करण्यात येत होती. `युध्दस्य वार्ता रम्या' या उक्तिप्रमाणे आपणास लढाईच्या गोष्टी ऐकण्यास किती मौज वाटते, पण प्रत्यक्ष तेथे जाणे म्हणजे एक सुळावरची पोळीच आहे. परंतु रावबहादूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता लढाईवर स्वयंसेवक म्हणून जाण्याचे निश्चित करून ते मोर्सेलिस बंदरी जाऊन थडकले. या त्यांच्या निर्भय वृत्तीबद्दल जिकडे तिकडे त्यांचा लौकिक झाला. इ.स.१९१६ मध्ये त्यांना मुक्तेसर येथे एक महत्त्वाची जबाबदारीची जागा पत्करावी लागली. त्यावेळी त्यांना हिंदुस्थानातील एकंदर सरकारी `दुग्धालये' तपासणीसाठी शहरोशहरी जावे लागले. त्यांची श्रम करण्याची शक्ति व कार्यनिष्ठा यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकजणाकडून स्तुति सुमनांचा वर्षाव होऊ लागला. १९१६ ते १९२० च्या दरम्यान डर्शीीा डर्ळाीश्रींर्शीर्शेीी पद्धति यशस्वी करून दाखविणारे रा.ब. हेच पहिले गृहस्थ आहेत. पहिलेच हिंदि प्रिन्सिपाल. इ.स.१९२० मध्ये त्यांची मुंबई व्हेटरिनरी कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. १९२२ ते १९२४ पर्यंत त्यांनी ईम्परियल सर्व्हिस मध्ये काम केले परंतु हिंदी सरकारने ली कमिशनच्या अटी मान्य केल्यामुळे त्यांना पुढे चालू करता येईना. १९२४ मध्ये कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपॉल व १९२६ आणि १९२८ मध्ये प्रिन्सिपाल म्हणून रावबहादूर यांनी उत्तम प्रकारे काम केले. योग्य संधि दिल्यास हिंदी मनुष्य दुसऱ्या कुठच्याही मनुष्याशी वाटेल त्या व्यवसायात बरोबरी करू शकतो याचे प्रत्यंतर रावबहादूर यांनी लोकनिदर्शनास आणून दिले. त्यांची हुशारी व पात्रता ओळखून सरकारने त्यांस जे.पी. ही बहुमानाची पदवी बहाल केली. मुंबईच्या व्हेटरिनरी कॉलेजचे रावबहादूर हे पहिलेच हिंदी प्रिन्सिपॉल झाले. त्यांच्या प्रिन्सिपॉल या नात्याने प्रशंसनीय कामगिरीबद्दल कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवाच्यावेळी इ.स.१९३१ मध्ये त्यांना मुंबईचे नामदार गव्हर्नरसाहेब यांच्या हस्ते सुवर्णपदक अर्पण करण्यात आले.
रावबहादूर हे १९३७ सालच्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत मुंबई इलाख्याचे डायरेक्टर ऑफ व्हेटरिनरी सर्व्हिस या मोठ्या हुद्द्याच्या जागेवर विराजमान झाले. सेवानिवृत्त झाल्यावर सरकारने पुन्हा त्यांची सहा महिने मुदत वाढविली असून आज ते सिंध प्रांतात याच हुद्द्यावर नेमले गेले आहेत. १९३८ साली त्यांना हिंदी सरकारने नूतन वर्षाच्या सन्मान समारंभात `रावबहादूर' ही पदवी बहाल केली. इतक्या वर्षीचा अनुभव उपजत हुशार बुद्धि व कार्यनिष्ठा यांच्या जोरावर त्यांची सिंध प्रांतातील कारकीर्द अत्यंत भरभराटीची व उत्कर्षाची होईल यात तिळमात्र शंका नाही.
***
Comments
Post a Comment