आपली उपनिषदं
संदर्भ : `उपनिषदांचा अभ्यास',
लेखक - के.वि.बेलसरे, त्रिदल प्रकाशन, गिरगाव, मुंबई
आपणा बहुतेकांना पुराणे ठाऊक असतात. पिचत वाचलेली पण असतात. पण उपनिषदे केवळ नाव ऐकून माहीत असतात.
ऋग्वेदानंतर आणि बुद्धपूर्वकाली प्रधान उपनिषदे निर्माण झाली. उपनिषदांना वेदान्त असेही म्हणतात. कारण ती वेदांच्यानंतर निर्माण झाली. वेदवाङ्मयाचे चार भाग आहेत - १)संहिता २) ब्राह्मण ३) आरण्यके व ४) उपनिषदे. ऋषींना स्फुरलेल्या आणि त्यांनी गायिलेल्या छंदोबद्ध मंत्रांचा नीट रचलेला समूह म्हणजे संहिता. या संहितांतील मंत्रांचा अर्थ, स्पष्टीकरण, विधि व विनियोग ज्यांत सांगितलेला आहे ते ब्राह्मण ग्रंथ. हे गद्य ग्रंथ आहेत. ज्ञानपिपासू तपस्वी अरण्यातील आश्रमांत राहून मनन, निदिध्यास व तत्वचिंतन करीत. ते वाङ्मय आरण्यकांत आहे. त्या त्या तत्त्वचिंतनाचा विकास व अर्थविस्तार उपनिषदांमध्ये दृष्टीस पडतो. म्हणून उपनिषदांस `आम्नायमस्तक' म्हणजे वेदांचे उत्तमांग म्हटले आहे.
पुढील दशोपनिषदे महत्त्वाची आहेत -
१) ईशावास्योपनिषद २) केनोपनिषद
३) कंठोपनिषद ४) प्रश्नोपनिषद ५) मुंडकोपनिषद ६) मांडुक्योपनिषद ७) तैत्तिरीयउपनिषद
८) ऐतरेयोपनिषद ९) बृहद्आरण्यकोपनिषद
१०) छांदोग्योपनिषद
ही दशोपनिषदे अधिक `श्वेताश्वतर' मिळून अकरा उपनिषदे प्राचीन व महत्त्वाची समजावीत. त्यापैकी `छांदोग्य' आणि `बृहद्आरण्यक' ही दोन मोठी आहेत. इतरही बरीच दुय्यम उपनिषदे आहेत.
ब्रह्मजिज्ञासेपोटी ऋषीमुनींनी जे तत्त्वचिंतन केले त्याचा रसरसलेला आत्मानुभव यात साठविलेला आहे. वैदिक संस्कृत ही उपनिषदांची भाषा आहे. काही गद्यात तर काही पद्यात आहेत.
उपनिषद म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याने भक्तीयुक्त अंत:करणाने व नम्रभावाने गुरुच्या जवळ बसणे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता म्हणजे बहुजन समाजासाठी तयार केलेली उपनिषदांची छोटी आवृत्तीच होय. उपनिषदांमध्ये जीवाला भोक्ता व कर्ता मानलेला आहे. प्रत्येक जीवाला प्राण व मनस या दोन उपाधि असतात. हेतूरहित हालचाली प्राण घडवून आणतो तर सहेतुक हालचाली मनस घडवून आणते. स्थूल शरीर, प्राण, मनस व आत्मा मिळून जीव बनतो. देहाच्या दहा इंद्रियांच्या साहाय्याने मनस काम करते. जीवाची रचना गुंतागुंतीची असते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे जीवाचे पाच कोश असतात. मानवी ही जीवाची श्रेष्ठ पातळी आहे. म्हणूनच त्याला `विश्वस्थ सुकृति' म्हटलेले आहे.
उपनिषदांमध्ये `परा' व `अपरा' अशा दोन विद्या सांगितलेल्या आहेत. त्या अनुभूतीतूनच निर्माण होतात. अनुभूतीचे तीन प्रकार आहेत. प्रत्यक्ष, परोक्ष व अपरोक्ष. खोल आत्मचिंतन करताना देहभान हरपले असता ऋषींच्या तोंडून जे ज्ञान, आत्मस्वरूपाचे ज्ञान शब्दरूपाने बाहेर पडले व ते त्यांनी ऐकले व इतरांनीही ऐकले त्या वाङ्मयास `श्रुति' असे म्हणतात. मीपणाच्या पलीकडून म्हणजेच अतींद्रिय आत्म्याकडून `ते' शब्द येतात म्हणूनच त्यास अपौरुषेय वाणी म्हणतात.
असे बरेच ज्ञान व वरील उपनिषदांची, त्यांच्या कर्त्यांची, त्यांच्या विषयांची समग्र माहिती या ५५५ पृष्ठांत सामावलेली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ आलोडावा.
- चंद्रकांत वेलणकर, मालाड, मुंबई
मोबा. नं. ९८७००३२९९१
Pustak kuthe milel Punyat? Bahuda Out of print zalay.
ReplyDelete