Skip to main content

Sampadkiya in 31 Dec.2012


तुमचे आंदोलन होते,...
दिवाळीच्या आधीपासून पश्चिम महाराष्ट्नत सुमारे आठ-दहा दिवस ऊस आंदोलन सुरू होते. त्यानंतर ते थंडावत गेले आणि मग व्यवहार-वाहतूक सुरळीत होत गेली. त्यानंतर वृत्तपत्रांतून उलट सुलट चर्चा, आणि आपापली बाजू मांडणारे लेख-मुलाखती सुरू झाल्या. कृषिमंत्र्यांपासून ऊस तोडणी मजुरांपर्यंत सगळयांनी परस्परांवर चिखलफेक केली, आपणच कसे सामान्य शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे ओरडून सांगण्याचे प्रयत्न झाले.

त्यांच्या वादावादीशी आणि कैवाराशी ज्यांचा फारसा संबंध नाही त्या बहुसंख्य प्रजेला जो अकारण त्रास झाला, त्या कारणाने मोठे नुकसान पोचले त्याबद्दल कुणी ब्र काढला नाही. शेतकऱ्यांचा फायदा होऊ नये असे कुणीच म्हटले नाही. त्यांचे जे काही कल्याण करायचे  ते करावे; त्यासाठी परस्पर भांडावे. त्याकरिता कागदोपत्री, सभा-मेळावे, काठ्या-बंदुकी वगैरे कशाचा वापर करायचा हे कोण सांगणार? पण सामान्य जीवन विस्कळीतच नव्हे, तर कठीण करण्याचा अधिकार त्यांनी हाती कसा घेतला? कुणी अशा आंदोलनपीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करू नये?

जी काही समजली-कानी आली त्यापैकी काही उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत. एसटी बसने घरी येणाऱ्या काही स्त्रियांकडे सणानिमित्त घेतलेले ओझे व काही किंमती वस्तू होत्या.ते सांभाळत बसावे लागले. गाडी जागेला थांबलेली. देहधर्मासाठी कुठे दूर कसे जावे? एका उद्योजकाकडे यंत्रदुरुस्तीसाठी शहरातून तंत्रज्ञ आले होते. त्यांना साधा नटबोल्ट मिळवता येईना. त्यांचा मुक्काम वाढला, उद्योग बंदच राहिला. अकारण दहा हजाराला फटका बसला. या भागात एका नातलगाकडे आलेली माणसे. त्यांना पुण्याहून तातडीने एका गंभीर रुग्णासाठी येण्याबद्दल फोन आला. मधले रस्ते बंद, बस बंद, खाजगी गाडी करून या बाजूने जा - मागे फीर - त्या गावावरून जा... असं करत चार तास आणि साठ किमी अंतर वाढलं. डोक्यात काळजी, खर्चात भर!

अशी कित्येक उदाहरणे असतील, कित्येकांस ती ठाऊक असतील! कोरड्यासोबत थोडे ओले जळले असेल असे आंदोलननेते समर्थन करतील. त्यांच्यासाठी एक उदाहरण - एका फटफटीवरून पती-पत्नी थांबले. समोर टायर पेटवत ओरडणारे आंदोलन. हे जोडपे याच ग्रामीण भागातले शेतकऱ्यांपैकीच! त्यांनी जरा सांगून-विनवून पाहिलं. आंदोलन ऐकेना. तोवर तशाच आणखी दोन फटफट्या येऊन थटल्या. सगळे मिळून चार तरणेबांड गडी. त्यांनी `आंदोलनकर्त्या' पोराची कॉलर पकडून, ``तू कुठला रे? किती एकर ऊस तुझा? कुठलं बियाणं वापरतोस? खताची मात्रा सांग....'' असं म्हणत त्याला राऊंडात घेतले. तशी त त प प करीत पांगापांग झाली. आणि ``साली, शेती करत्यात-'' असा उद्धार करत त्या फटफट्या मार्गी लागल्या. यातून शेतकरी कोण, लाभार्थी कोण, भांडणारे कोण, शोषित कोण.... काय बोध घ्यायचा?

आंदोलनाचा हेतू काय, कोणता, हा मुद्दाच नाही. तो बरोबर-चूक जो असेल तो. पण त्यात भरडला जाणारा, अडवला जाणारा तो सामान्य नाही काय? आंदोलनातील मागण्या बरोबर-चूक याच्याशी, त्याची झळ बसणाऱ्या `ओल्यांनी' कसा संबंध जोडावा? ऊसदर वाढ मिळाली तर याचा आनंद त्यांनी कसा मानावा?

याचा आणखी एक पैलू म्हणजे वरीलप्रकारे जे भरडले गेले तेही कधीतरी असल्याच आंदोलनाचे कर्ते असतात. कधी पोस्टवाले, कधी बँकवाले, कधी शिक्षक, कधी पुतळावाले, रिक्षावाले, कधी कोण तर कधी कोण!!

दुसऱ्याचे हित करण्याची परोपकार बुद्धी सोडाच; पण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला भयंकर पीडा देणारी ही आंदोलने केवढ्याला पडणार? आज ज्यांनी त्रास सहन केला ते असल्या टायरपेटवीपासून स्वत:ला तरी सुधारतील का?
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...