डॉ.बी.डी.टिळक : स्थितीशी संघर्ष
कहाणी सुमारे १५० वर्षांपूर्वीची. एकत्र कुटुंबपद्धत होती. एकमेकांच्या मदतीला धावून जात. एका माऊलीचे यजमान चार लहान मुले पदरात असताना निवर्तले. माऊलीला भावाने आश्रय दिला. भावाला दोन लहान मुले होती. त्याच्या तिसऱ्या मुलाचा जन्म झाला पण दहा दिवसाचे आतच बाळंतीण भावजयीचे निधन झाले. माऊलीने आपल्या व भावाच्या परिवाराचा भार उचलला. माऊलीचे शेंडेफळ अंगावर पीत होते. माऊलीने नवजात अर्भकालाही स्वदूध देण्यास सुरुवात केली. दु:खी वातावरण असल्याने नवजाताचे बारसे झाले नाही. त्याला सर्वजण `बाळ'या नावाने संबोधू लागले. `बाळ'ने स्वत:चे नाव बाळकृष्ण सांगण्यास सुरुवात केली. ही माऊली म्हणजे माझ्या आईची आई - माझी आजी.
बाळ अतिशय हुशार. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात उत्कृष्ट गुणांसह पदवी मिळविली आणि टाटांची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला प्रयाण केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळविली. त्यांचे सहाध्यायी डॉ.वुडवर्ड हे नोबेल प्राईझचे मानकरी होते. हे आमचे बाळमामा - डॉ.बी.डी.टिळक. भारताचे ललामभूत शास्त्रज्ञ. महान देशभक्त. परदेशात चांगल्या संधी असूनही आपल्या देशबांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून भारतात परतले. मुंबई विद्यापीठात असि.प्रोफेसर म्हणून रुजू झाले तेव्हा ते सायकलवरून जात असत. स्वकर्तृत्त्वावर पुण्याच्या राष्ट्नीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे डायरेक्टर झाले. ते कार्यरत असताना एन.सी.एल.ने रजतजयंती साजरी केली, त्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आल्या होत्या. डॉ.टिळक यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण झाले ते ऐकण्याचे मला भाग्य लाभले होते.
त्यांच्या मृत्यूप्रसंगीचे शल्य मला आजही टोचते. त्याचे असे झाले - त्यांची दुसरी हृदय शल्यक्रिया मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये झाली. तिथेच त्यांचे निधन झाले, त्याची वार्ता त्यांच्या पत्नी व मुलाला दुपारी तीन वाजता सांगण्यात आली. केसपेपरवर १२.३० ला निधन झाल्याची नोंद होती. सर्व सोपस्कार करून पार्थिव पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आले. डॉ.टिळकांच्या निवासस्थानी विद्यापीठातील व एन.सी.एल.मधील शास्त्रज्ञ वगैरे मोठमोठी मंडळी जमली होती. पार्थिवासह दुपारी १ च्या सुमारास `वैकंठ'ला पोचलो. दाहिनीचा वीजपुरवठा बंद होता. चौकशी करता सांगण्यात आले,`अर्ध्या तासाने वीजपुरवठा चालू होईल.' दोन-अडीच तास झाले तरी अर्ध्या तासाचे पालुपद सुरू होते.
मी वीजमंडळातून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त होतो, पण आता मला कोण ओळखणार? ऑपरेटर म्हणाला,``अजून परमिट आले नाही त्याशिवाय वीज चालू करता येणार नाही.'' ऑपरेटरने जोशीसाहेबांना फोन जोडून दिला. मी विचारले,``आपण सिस्टीम इंप्रुव्हमेंट सर्कलला होता काय? मी केळकर बोलतो आहे.'' मी परिस्थिती सांगितली. गेलेली व्यक्ती व जमलेल्या व्यक्तींचे थोरपण सांगून गांभीर्य कळविले. `ऑपरेटरला फोन द्या.'' जोशी म्हणाले. जोशीसाहेबांनी त्त्वरित सूत्रे हलविली. वीजपुरवठा सुरू झाला. सर्व मंडळी पार्थिव घेऊन दाहिनीजवळ थांबली होती. मी शेवटचे अभिवादन केले.
- दि. वि. केळकर
३२,श्रीलेखा सोसा.,कोथरुड, पुणे - ३८
फोन (०२०)२५४४६५५२, ९४०३७६९१६४
Comments
Post a Comment