Skip to main content

14 April 2014

कोषातील संघटनकार्य
आपल्याकडे सामाजिक संघटना उदंड आहेत. त्यापैकी बऱ्याचशा निष्क्रीय आहेत, हे टोकाचे विधान बाजूला ठेवायला हवे, कारण सक्रीय असणाऱ्या संस्था-संघटनांची संख्याही कमी नाही. समाजातील प्रश्न लक्षात घेतले तर, ते सोडवू पाहणाऱ्या संस्था संघटनांची संख्या प्रश्नांच्या तुलनेत पुरेशी आहे असे निश्चितपणाने म्हणता येते. समस्या ज्या आणि जेवढ्या आहेत, त्यापेक्षा त्या जास्त भासविल्या जातात हे एक, आणि ज्या समस्यांवर उत्तर शोेधण्याचे उद्दिष्ट असतेे, ते बाजूलाच राहून दिशा भरकटते हे दुसरे निरीक्षण पटण्यासारखे आहे.

समस्या नाहीत असे नव्हे. पण त्यांचे नेमके आकलन करण्याची कुवत संघटकांत नसते. पर्यावरण ऱ्हास ही समस्या आहेच, पण हा ऱ्हास कशामुळे होतो हा वादविषय ठरतोे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी काय करायचे? - तर ज्येष्ठ नागरिक संघापासून अंगणवाडीतल्या पोरांपर्यंत सर्वांनी हातात फलक घेऊन `पर्यावरणाचे रक्षण । जाळू नका जळण ।' असले येडचाप उखाणे गात फेरी काढायची! याला जर जनजागृतीचे समाजकार्य म्हणायचे असेल तर कसले प्रश्न सुटणार! मुळात ज्या उद्देशाने संघटन करायचे ते उद्देश स्पष्ट हवेत, जे होतील ते प्रयत्न त्या उद्देशासाठीच व्हावेत, आणि त्यांची दिशा नेमकी असावी. इतके झाले तरी जी काय चार पावले पडायची, ती परिणामकारक होतील. बालकांना फुलपाखरांमागे धावायला, फुलांचा हार करायला आणि कैऱ्या काढायला शिकवावे यांमुळे पर्यावरण समजेल. ज्येष्ठ नागरिकांची संघटना करताना, उर्वरित निवृत्त आयुष्यात आनंद निर्माण व्हावा हे उद्दिष्ट असते. त्यात अनुभवांचे प्रसारण, चांगल्यासाठी प्रबोधन, पुढच्या पिढ्यांचे संस्करण ही कर्तव्ये आहेत. सांघिक रित्या ती करता यावीत. कोणा ज्येष्ठ संघाने नातवंडांसाठी गणित-विज्ञानाची तोंडओळख, स्तोत्रे, सोपे देशी खेळ यांसाठी सातत्याने प्रयत्न चालविल्याचे ऐकिवात नाही; परंतु स्वत:ची आरोग्यतपासणी, पेन्शनवाढ, हास्यक्लब किंवा सेकंड हनीमून हे चालू आहे.

संस्था-संघटनांचे उद्दिष्ट सतत डोळयापुढे नाचते ठेवले, आणि प्रत्येक कृतिकार्यक्रम त्याच्याशी ताडून पाहता आला तर, इतक्या संघटना असून समाजातील समस्या कमी का होत नाहीत याचे उत्तर सापडेल.

अलीकडे प्रत्येक ज्ञातिसंघटनासुद्धा सामाजिक कार्य करण्याचा आवेश आणते; पण ज्ञातिबांधवांचे सहभोजन किंवा वधुवर सूचक मंडळ यापुढे गाडी जात नाही. ज्ञातींची वा कुळांची संमेलने प्रारंभी २-३-४ ठीक होतात. त्यावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे, पुन्हा दरवर्षी जमू, निधी जमवू वगैरे संकल्प होतात. वास्तविक जिथे हजार दोन हजाराची किमान उपस्थिती असायला हवी, त्या कुलसंमेलनात शेपाऊणशेची संख्याही `प्रचंड प्रतिसादा'ची मानावी लागते. त्यातही परस्पर दृढ परिचयास प्राधान्य देण्याऐवजी सुश्राव्य कवितागायनास स्थान असते. सहभोजनावेळी शेजारी कोण बसले याची चौकशी न करता, दुपारचे सत्र संयोजकांवर सोपवून बाहेर पडले की आपण `संघटनेच्या माध्यमातून सामाजिक एकत्त्व साधले' असे वाटून घेत घर गाठावे!! संघटन प्रभावी  कसे होणार; आणि प्रश्न कसे सुटणार?

आणखी एक नवी टूम म्हणजे, आहेत त्या संघटनांत दुफळी करून संघटनांची संख्या वाढविणे. निव्वळ अतिरेकी म्हणून काम करणाऱ्या संघटनासुद्धा कित्येक आहेत. मुजाहिद्दिन म्हणे, कायदा, तोयबा काय नि काय!! तशा दुफाळलेल्या  संघटना कोब्रा कट्ट्यांपासून ब्रिगेडपर्यंत आहेत. फार कशाला! आजकालच्या विद्यापीठांमध्ये आपल्या हुशारीला न्याय मिळत नाही म्हणून स्वतंत्र विद्यापीठे काढू पाहणारे संघटन, उद्दिष्टांशी प्रामाणिक कसे म्हणावे हा पेच आहे.

याच अर्थ जे काही घडते आहे, जितके साध्य झाले आहे ते सर्व चूक, फुकट... असे मुळीच नव्हे. पण मूळ प्रश्न जर महाबिकट आहे असे वाटत असेल तर तो सोडविण्यासाठी केलेले हे संघटन इष्ट ते साध्य करू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याकरिता संघटन कोणतेही वा केवढेही असो त्याचे उद्दिष्टांच्या आधारे मूल्यमापन वेळोवेळी करायला हवे. कित्येक संस्था, कित्येक न्यास, कित्येक संघटना आज निष्क्रिय, निद्रिस्त, मृतप्राय आहेत. मोजायलाच गेलो तर त्यांची संख्या इतकी की, तीच एक समस्या ठरेल. एकाच गावात, एकाच गल्लीत तीन तीन गणपती बसतात तसाच तो प्रकार. त्यांतून साधते काय? - तर तिप्पट वर्गण्या, तिप्पट गोंगाट, तिप्पट खर्च आणि सांस्कृतिक एकतेची तिप्पट भांडणे!!

कुटुंबाचे, कुळाचे, ज्ञातीचे, शैक्षणिक संस्थेचे, विशिष्ट समाजगटाचे एकत्र येणे सामाजिक दृष्टीने निर्विवाद महत्त्वाचे आहे. पण त्यांविषयीच्या ओढाताणीतून उगीच मोठेपण कुरवाळत राहणे पुरेसे नाही. त्या त्या वयाला, पेशाला, विचाराला... एकूण भूमिकेला शोभेल अशा प्रत्येक कृतिकार्यक्रमांतून संघटनेच्या मूळ उद्दिष्टाकडे पाऊलभर पुढे जाणे घडायला हवे. तसे घडत राहिले तर समस्या कमी होतीलच पण सध्या अस्तित्त्वात आहेत तितक्या संस्था संघटनाही गरजेच्या राहणार नाहीत. उगीच `कृण्वतो विश्वमार्यम्' हे उद्दिष्ट उच्चारत सामुदायिक भोंडला आयोजित करावा, यात आनंद घेणाऱ्यांना विश्वाचा आवाका आणि आर्यत्त्वाचे सामर्थ्य माहीत नसावे इतके उघड होते.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन