श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, मिरज
- श्रीकांत येडूरकर
मिरजेचे ग्रामदैवत असलेली अंबाबाई. या मंदिराचा इतिहास सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा आहे. मिरजेतील चंदूरकर-देशपांडे घराण्यातील पूर्वजांना तुळजापूरची भवानी दर्शन देण्यासाठी मिरजेत आली अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती तुळजापूरच्या भवानीमातेची प्रतिकृती आहे.
चैत्र प्रतिपदा ते शुद्ध नवमी या काळात देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. नित्य पूजेसाठी गुरवाची नियुक्ती आहे. ती मंडळी अत्यंत भक्तीभावाने देवीची सेवा करतात. आश्विन शुद्ध १ ते १० नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. नऊ दिवस महापूजा, अभिषेक असतो. शिवाय दरमहा दुर्गाष्टमीस स्थानिक कलाकार देवीची संगीतसेवा करतात. प्राचीन काळात नायकिणी व कलावंतिणी गान/नृत्यातून मिरजेतील अंबाबाईची सेवा करीत असत. यातून नवरात्रात संगीत सेवेची कल्पना पुढे आली असावी.
मिरज नगरीच्या उत्तर दिशेस जुन्या मालगाव वेशीत अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम इ.स.१६०० मध्ये केले. जीर्णोद्धार १९८२ मध्ये झाला. सन २००८ मध्ये शिखर बांधकाम झाले. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मिरजेत पूर्वी सरस्वतीबाई सानी (कागवाडकर), आवडाबाई, बयाबाई, यलूबाई, चंद्राबाई, आकुबाई या ख्यातनाम दरबारी गायिका होत्या. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर मिरज संस्थानचे राजगवई! त्यांच्या शिष्यांतले कै.विष्णू दिगंबर यांच्या शिष्यांपैकी पं.विनायकबुवा पटवर्धन यांनी गुरुवर्यांचे मिरजेत कै.विष्णू दिगंबर पलूस्कर स्मृती मंदिर बांधले. प्रा.बी.आर.देवधर यांनी संगीताची परंपरा पुढे चालू ठेवली. या दोघांनी रशिया व अमेरिका देशात भारतीय संगीताचा प्रचार केला. पं.मल्लिकार्जुन मन्सुर यांनी ग्वाल्हेर गायकीचा अभ्यास मिरजेत केला. पै.अब्दुल करीम खाँ यांची पै.ख्वॉजा मीरासाहेब यांचेवर पूर्ण भक्ती. ते दर्ग्यात मीरासाहेबाचे उरुसात प्रतिवर्षी येऊ लागले. अब्दुल करीम खाँ साहेब यांचे गानहिरा हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं.संगमेश्वरबुवा, भारतरत्न भीमसेन जोशी, पं.कागलकरबुवा हे शिष्यगण होत. म.फरीद सतारमेकर यांसारख्या वाद्यनिर्मिती कारागिराच्या कारकीर्दीस मिरजेत प्रारंभ झाला. म.उमरसाहेब मिरजकर, म.आबासाहेब सतारमेकर, म.सिराजसाहेब सतारमेकर हे कलाकार नुसती वाद्यनिर्मिती करीत नव्हते तर ते संगीताचे अभ्यासक होते. पं.गणपतराव डवरी, पं.भानुदासबुवा गुरव संस्थानकाळातील उत्तम पखवाज वादक होते. संगीतकार कै.वसंत पवार व कै.राम कदम मिरजेचे होते.
नवरात्र संगीत महोत्सव :
१९५४ चे दरम्यान काही संगीत रसिकांनी नवरात्र संगीत महोत्सवास आरंभ केला. लोकवर्गणीतून कलाकार शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गायन, वादन करू लागले. तेव्हापासून ३०-४० वर्षे प्रामुख्याने स्थानिक कलाकार देवीची सेवा करीत होते. पं.काणेबुवा, पं.सुधाकरबुवा, उस्ताद रसूल खाँ, पं.हिराबाई बडोदेकर, पं.सरस्वतीबाई राणे, पं.भीमसेन जोशी, पं.इंदिराबाई खाडीलकर, राम कदम, पं.पलूस्कर, पं.भानुदासबुवा गुरव, पं.गणपतराव कवठेकर इ. कलाकारांनी नवरात्रात हजेरी लावली. यंदाचा ५७ वा संगीत महोत्सव नुकताच झाला. उद्घाटन जिल्हाधिकारी व समारोप जिल्हा पोलिस प्रमुख यांचे उपस्थितीत झाले. यंदाच्या संगीत महोत्सवात पं.उपेंद्र भट, उस्ताद फैय्याज खान, सोनीया परचुरे, पं.विजय कोपरकर, डॉ.गौरी भटनायक, डॉ.भारती वैशंपायन इ. ख्यातनाम कलाकारांनी देवीची सेवा केली. यंदा राम कदम पुरस्कार सौ.सुवर्णा माटेगावकर यांना देण्यात आला.
पं.उपेंद्र भट यांनी संतवाणीतून पं.भीमसेन जोशींचे स्मरण करून दिले. कु.रत्नश्री व उस्ताद फैयाजखान यांची जुगलबंदी, सोनिया परचुरे यांचे कथ्थक, कु.सुरश्री जोशी, हृषिकेश बोडस यांच्या शास्त्रीय गायनांनी मैफल रंगली. दैवी चमत्कार असलेल्या कु.सोहम गोराणे (आळंदी) या तीन वर्षाच्या बाल कलाकाराने तबल्यावर त्याच्या आईला दिलेली साथ व वडिलांसोबत अनेक वाद्यांवर केलेली जुगलबंदी रसिकांना चकित करून गेली.
Comments
Post a Comment