प्रकाशदिशा
अनेक व्यक्ती व संस्था आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या आधारावरच समाज उभा असतो भावी काळासाठी काही मूल्येही जोपासली जात असतात. अशी कोणी व्यक्ती, संस्था, प्रसंग यावरती भाष्य करण्यासाठी आजवर या स्थलाचा वापर फार पिचत् केला गेला असेल, त्याउलट एखाद्या विचाराचा किंवा कृतीचा अथवा प्रसंगाचा मागोवा घेऊन त्यामागील तत्त्वविचारांचा परामर्श घेण्याची प्रथा सांभाळली गेली होती. प्रस्तुत अंकात तसा अपवाद करावा असे वाटले याचे कारण एक व्यक्ती किंवा तिने उभा केलेला पैसा अर्पण करण्याचा सोहळा एवढेच निमित्त नाही तर त्यामागील अंत:करणाची बैठक आणि सर्व समाजापुढे नव्या बीजाची पेरणी करण्याची असोशी ही त्यामध्ये महत्त्वाची वाटते
आजच्या काळात सामाजिक कामे होत नाहीत असे कोणी म्हणणार नाही. गांधीजींनी ज्या काळी महाराष्ट्नला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले त्या काळात सामाजिक कार्याला किंवा ते करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप चांगले दिवस होते अशातला भाग नाही. देशासाठी, धर्मासाठी अथवा समाजरूपी देवासाठी प्रपंचावर निखारे ठेवून आयुष्य झोकून देणारे अनेकजण असतात. अशा संस्थांचा प्रतिपाळ करणे हेही समाजाचेच कर्तव्य असते. सरकार तो करू शकत नाही. समाजाचा योगक्षेम समाजानेच चालविला पाहिजे. असा प्रतिपाळ करणे शक्य होतेच असे नाही, परंतु अशा किमान व्यक्ती व संस्थांना उमेद यावी, जोम यावा यासाठी आपल्या पैशाचा विनियोग करण्याची `सेवा २०११' या प्रकल्पाची आत्यंतिक मनीषा ही आवर्जून दखल घेण्यासारखी आहे.
या निमित्ताने होणाऱ्या उपक्रमांचा बडीवार कोणाला दिसू शकेल. तो निर्माण करणे, सांभाळणे आणि त्याकडे आकर्षित होणाऱ्यांना पुन्हा प्रेरणा मिळावी यासाठी तो प्रचलित करणे यालाही खूपसे कौशल्य लागते.मूळ संकल्पना, त्यासाठी संघटन, नियोजन व कार्यसिद्धी या सर्व टप्प्यांवर व्यवस्थापनाचेही परिणाम लक्षात घेण्यासारखे आहेत. भव्य मांडव सजवणे आणि जेवणावळी घालणे हे तर घरच्या कार्यातही सहज शक्य असते परंतु झगमगाटापेक्षा उपयुक्ततेला महत्त्व देऊन एक वेगळा संस्कार सर्व संबंधितांवर करण्याचा आग्रह हा या प्रकल्पात अनोखा भासतो. सामाजिक काम म्हटले की त्यात भोंगळपणा आला हा पूर्वग्रह पूर्णत: नाहीसा करण्याइतका काटेकोरपणा या सर्व उपक्रमांमध्ये राबविला जात आहे. नीटसपणा, शिस्त, उपयुक्तता, साध्य, संपर्क, प्रचार आणि या सर्वांमध्ये एक सहजता, मोकळेपणा आणि खेळकरपणा हेही टिकवून ठेवण्याचा सर्व संबंधितांचा प्रयत्न उघड दिसून येतो.
हा सर्व माहोल इतरांसाठी आदर्शवत् आहे असे म्हणणे अस्थानी किंवा अतिरंजित वाटेल. परंतु अशा प्रकारे सामाजिक कार्यातून एक नवा उन्मेष प्रगट झाला तर आजच्या काळात अत्यावश्यक असलेली ती एक महत्त्वाची बाजू उपेक्षित राहणार नाही आणि सध्याच्या जीवनातील विषण्ण उसासे बाहेर पडत असतात, त्यांनाही आळा बसेल. त्यातून नवे वारे वाहात राहिल्यास जो बदल व्हावा असे वाटते, तो घडण्याची आशा नक्कीच उंचावेल.
Comments
Post a Comment