फराळाचा शिल्लक चुरा
दसरा किंवा पाडव्याला श्रीखंड करायची रीत होती, तशी पंचमी-होळीला पुरणपोळी असायची. आताही ती असते परंतु दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करावी लागत नाही. दूध साठवून ते तीनतीनदा तापवायचं, विरजून दही लावायचं, पातळ फडक्यात ते ओतून त्याचं चुमडं बांधून खुंटीला चार-सहा तास टांगायचं, पाणी पूर्ण निथळलं की तो मऊशार चक्का फेसून घेत साखर मुरवायची.... इतकं काही आता करावं लागत नाही. परवा आमचा एक मित्र जेवायला आला. पंगत सुरू झाल्यावर श्रीखंड चाखत म्हणाला, ``वा! श्रीखंड मस्तच झालंय...!! कसं किलो मिळालं?'' कुठलाही पदार्थ कुणाही घरी आयता तयार विकत आणलेला असणार हे आता लपविण्याइतकं नवीन राहिलं नाही. पुरणपोळी, कुरड्या-पापड, लोणची-मसाले, पिठं-भाजण्या-पिठी-रवा-मेतकूट.... वाट्टेल ते. घरी कुठं करता!
आता तर हे जिन्नस विकत आणून घरी पाहुणचार करणं हेसुद्धा जिकीरीचं आहे. कुणी घरी यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी आवरासावर करावी लागते. फुलदाणीतले गेंद प्लॅस्टिकचेच असले तरी ते स्वच्छ करावे लागतात. पलंगपोस बदलावे लागतात, बेसीन धुवावे लागते. शिवाय नंतर खरकट्या भांड्यांचा ढीग पडतो, अन्न उरून बसतं! - अनेक व्याप. त्यापेक्षा परस्पर कुठंतरी जेवणाची सोय करता येते, चार पैसे देऊन मोकळं! आपण आपल्या घरी परत, अन् पाहुणे त्यांच्या घरी. बाकी गप्पागोष्टी अघळपघळ करता येतात. कपड्याची इस्त्री किंवा डोक्याचा कलप विसकटत नाही.
किराणावाल्यांची दुकानं हल्ली पार बदलली. पूर्वीची उघडी धान्य पोती व गोड्या तेलाचे ओघळ कधीच पुसले. पुढच्या पिढीनं दुकानात स्वयंसेवा आणली. कॉम्प्यूटर व क्रॅमेरे बसवले. त्याचा एक मालक सांगत होता, `पूर्वी दसरा उलटला की दिवाळीचा बाजार सुरू व्हायचा. धान्य, शेंगा, मिरच्या, तेलाचे घाणे यांची धूम उठायची. नंतर काही काळानं तयार तिखट, शेंगदाणे, जिरं-मिऱ्याचं चूर्ण, दळलेले मीठ असा जमाना आला. मधल्या काळात तयार भाजणी, तयार पिठं, तयार सारण अशा वस्तू आल्या. अलिकडं चकली-चिवडा-लाडू सगळं तयारच मिळतं. प्लॅस्टिक पिशवीचं तोंड फोडलं की तोंडात. आजच्या दिवाळीत चार दिवस आधी घरोघरीची ऑर्डर येते; त्याप्रमाणं खोकं भरून त्याला चिठ्ठ्या चिकटतात. ऐनवेळी यायचं, कूपन दाखवायचं अन् आपला खोका उचलायचा.'
फराळाचं तरी नाविन्य ते काय? वर्षभर हे जिन्नस एसटी स्टँडवरसुद्धा मिळतात. दिवाळीत काही वेगळं खावं असं अप्रूप कुणाला उरलं नसावं. आमच्या घरचा नमुना, तुमच्याकडून आलेला चिवडा-लाडू असं देण्याचं-घेण्याचं वास्तविक कारण नाही. कारण ते तर कुणाच्याच `हातचं' नसतं. पण या मिसळपिशव्या देण्या-घेण्याची प्रथा मात्र टिकून आहे. कदाचित आमच्याकडील `दांडेकर', तुमच्याकडचा `चितळे', त्यांच्याकडे आलेला `जोशी' यांचे नमुने नमुन्याला देत असतील. ते येणारे जिन्नस प्रत्येक घरी चवीनं खाल्ले जातात असं तरी कुठाय? आलेल्याच `गाठोड्या'तून दोन लाडू इकडं अन् चार करंज्या तिकडं!! पहिल्या दोन दिवसात आलेल्या लाडूवर एखादा बेदाणा-काजू दिसतो; पण दिवाळी उलटून गेल्यावर परस्परांत ते पुडके फिरतात, त्यात अनेक चिवड्यांची भेळ, चकल्यांचे अनेकरंगी तुकडे, करंजीचा चुरा असा चिल्लरखुर्दा झालेला असतो.
माणसांचं तसंच झालंय. एकमेकाची घसट वाढलेली नाही, पण उगीच दळणवळण वाढलंय. फोन, मोबाईल, ईमेल एसेमेस या सगळयांतून `हॅप्पी दिवाळी'चा मारा होतो. पण त्यातून शिल्लकीतल्या सद्भावना पाहू गेल्यास तळाच्या तिखटमिठाचा कुट्टा राहिलेला असतो. सद्भावना-सदीच्छासुद्धा श्रीखंडासारख्या तयार व्हायला हव्यात. त्यातलं पाणी निथळून काढल्यावर मागे उरणारी मलई आपल्या अंगी साखर मुरवून घेते तो अनुभव मोलाचा होता. त्यात भावनांचा स्पर्श होता. माणसं विखुरली, ती वेगळया स्थळी गेली, मनानं आपापल्या जगात रमली. खायचं ते खातात, त्याची चव जिभेसारखी मिळते, पण त्यातली चव मनाला भिडावी. दिवाळीचा फराळ काय अन् होळीची पोळी काय; पैशाला पासरी मिळतेच! माणसाची मनं आस्वादता आली तर त्या सणांचा आनंद. तो पुरणात वा चक्क्यात नसतो, परस्परांच्या मनांत उरला तर तृप्ती, नाहीतर निव्वळ एक उपचार.
Comments
Post a Comment