अद्वैत श्रद्धेने चिरंजीव कार्य
श्री परशुराम आणि श्री शंकराचार्य या भारतवर्षातील दोन विभूतींचे पुण्यस्मरण-दिवस साधारण एकाच सुमारास आहेत. त्या निमित्ताने पुष्कळ ठिकाणी कार्यक्रम होत असतात. भारतभूमीत इतक्या संख्येने नररत्ने होऊन गेली की, त्या सर्वांचे केवळ स्मरणच करायचे म्हटले तरी आज आपल्यासाठी काही कृती करण्यास दिवसच काय, पण क्षणभरही मोकळा मिळायचा नाही.! पाच-दहा हजार वर्षांच्या प्रदीर्घ ऐतिहासिक भूमीच्या नित्यनूतन, सनातन, परिवर्तनशील संस्कृतीमध्ये विविध पैलूंचे मोठेपण लाभलेली अनेक माणसे झालेली असणारच. त्यांना कुणी अवतार म्हणोत कुणी विभूती म्हणोत, देवत्त्व देवोत किंवा दैवी मानोत.
अशा थोर स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वांचे क्षणकाल पूजन करीत असताना त्यांच्या गुणगौरवाला महत्त्व असते. त्यायोगे त्यांच्यातील मनुष्यत्त्वाच्या मर्यादा पुसून जातात, सामान्य व्यवहारांना अतर्क्य चमत्कारी रूप येते अथवा असामान्य कर्तबगारीवर अतिशयोक्त अमानुषी तेजाचे अनुलेपन चढते. अशा लोकोत्तर व्यक्तींच्या जीवनकार्याचे आकलन होण्यासाठीही वेगळी शक्ती अंगी असावी लागते; ती नसेल तर मग शिवछत्रपतींना अवतार म्हणावे, गांधीजींना गांधीबाबा म्हणावे, टिळकांना महाराज करावे. कोणत्याही पुण्यश्लोक व्यक्तीचे स्मरण करण्याचा कार्यक्रम कुणाकडून कसा साजरा होतो याला त्यामुळेच अर्थ प्राप्त होतो. आजच्या काळात बुद्धिमत्तां वरिष्ठम् महाबली हनुमानाचा उत्सव रेकॉर्ड डान्स-स्पर्धा आणि खिरीच्या महाप्रसादाने होतो. श्री परशुराम वा श्री शंकराचार्यांचे स्मरण समाजाला करून देण्याने क्षात्र आणि ब्राह्मतेजाचा आविष्कार एकाच वेळी व्हावा अशी कामना तरी केली पाहिजे आणि त्यांची शिवस्वरूपी संकल्पना जीवस्वरूपी ऐहिक वास्तवाशी अद्वैत सांगणारीच असली पाहिजे. त्यामुळे हा मानवसमाज शंकराचार्यांप्रमाणे कठोर तत्त्ववादी आणि परशुरामाप्रमाणे चिरंजीव-शाश्वत होऊ शकेल.
आपली पुराणे, तत्त्वग्रंथ, ज्ञानसंपदा व काव्ये यांना भाकड समजण्याचे पुरोगामित्त्व हल्ली पुष्कळच बहकले आहे. रूपक, अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा असे भाषालंकार त्यांना कळत नाहीत. `मातेच्या अमृतपाना'साठी पुरोगामी वास्तव कथन करण्याचे शब्दसामर्थ्य प्राचीन ग्रंथकारांना नव्हते असेही कुणी म्हणावे. अशांनी आपल्या धर्म-तत्त्वांवर अवास्तव टीका करण्याने अल्पमती जनांची शेषमतीही कलुषित होते हे सर्वत्र दिसून येते. परमतखंडन आणि स्वमतप्रतिपादन यांसाठी शंकराचार्यांनी जो वैधानिक विवाद मंडनमिश्राशी केला त्यास विदूषी महिला निर्णयाध्यक्ष होती हे ऐतिहासिक सत्य आजच्या काळातही आवर्जून सांगितले गेले तर उगीच धर्मरूढींच्या भ्रमाला धोपटणाऱ्या अर्वाचीन वावदूकांचा प्रभाव कमी होईल. धर्माला ग्लानी येते त्यावेळी शंकर-परशुरामांसारख्यांना दंड-परशूंसह उत्थापनेचे प्रयत्न करावे लागतात. पूजनसमयी त्या प्रयत्नांचे भान ठेवावेच लागेल.
आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक पुण्यकीर्त महामानव आहेत. त्यांची तेजस्विता अल्पांशाने प्रकट व्हायची असेल तर त्यांच्या पार्थिव मूर्तस्वरूपावर जमलेली भ्रांतीची पुटे खरवडून काढावी लागतील. भक्तिभावाच्या अतिरेकाने व्यवहार - वास्तवाचा अभाव दर्शविणारी गंधपुटे त्यांच्या प्रतिमांवर चढली आहेत. ती खरडून-धुवून काढली तर आतील रेखीव जीवनचरित्राचा साक्षात्कार सर्वांना होईल. ते सत्यान्वेषणाचे कार्यही त्या पुण्यशील विभूतींचे भक्त, अनुयायी वा पूजक यांनाच करावे लागेल. पुण्यस्मरणाचे कार्यक्रम हे त्या अनुषंगाने व्हायला हवेत.
आजच्या काळात लोकशाही व समाजवाद यावरती भर असतो. आपल्याला या संकल्पना नव्या नाहीत. काळाच्या ओघातील समाजमनांच्या दृष्टीने दैवतांचेही दैव बदलत असते. त्यालाच बहुधा धर्मग्लानी म्हटले असेल. म्हणूनच आजच्या भारताच्या संविधानाचे साक्षेपी चिंतन करून ते आधुनिक काळानुरूप अंगिकारले तरी मूळ तत्त्वात फरक पडण्याचे कारण नाही. त्यालाच धर्माभिमानी निरपेक्षता व सर्वस्पर्शी विकास म्हणायचे. प्राचीनत्वाला प्रौढत्त्व असावे, हेकटपणा नसावा. आणि आधुनिकतेला उत्फुल्ल नाविन्य असावे, उथळपणा नसावा. या सुसंस्कृत सनातनतेच्या चिरंतन चिरनूतत्वासाठी परशुराम आणि शंकराचार्य यांच्या स्मरणाइतके शुभप्रद पुण्य अन्य कोणते?
Comments
Post a Comment