भक्ताचा देव, सोन्याची चोरी
कोकणातल्या श्रीवर्धनजवळ दिवेआगर हे पोफळीबागांनी मढलेले हिरवेकंच गाव आहे. तिथे एका शेतात सापडलेला चोख सोन्याचा महाकाय गणपती अलीकडच्या दशकभरात भरात आला होता. हल्ली कुठल्याही जुन्या-नव्या देवस्थानी तथाकथित भगतगणांची चिरंतन रीघ असते, तशी ती याही ठिकाणी लागून राहिली होती. कुठून कुठून माणसे यायची. त्यामुळे सोन्याचा गणपती आणखी श्रीमंत होऊ लागला, हळूहळू श्रद्धाळू डोळयांवर तुस्तीची झापड येऊ लागते. दृष्टी मंद होत जाते. चाचपडणे सुरू होते आणि मग अंध कर्कश श्रद्धाळू कार्यकर्त्यांना सामाजिक पोलिसगिरी करण्याचा निर्मूलन-उद्योगही मिळतो. त्या सुवर्णार्णव वक्रतुंडाने सगळयांना याप्रकारे समृद्धीची पायवाट दाखविली खरी; पण तो मात्र स्वत: कुणा दरोडेखोरांच्या टोळीतून पसार झाला. दिवेआगरचा सुवर्णगणपती चोरीला गेला.
अनंतकोटि ब्रह्माण्डानी व्यापलेले हे विश्वरूप माणसाच्या पंचेन्द्रियांना पेलण्याजोगे नाही, आणि तशी त्यांस प्रतिभाही नाही. म्हणून मग त्या कल्पनातीत अमूर्ताचे चिंतन करणेही अशक्य दिसल्यावर या डोकेबाज माणसानेच त्याला आपापल्या जाणिवेप्रमाणे मूर्तीरूपाने साकार मूर्त बनविले. परन्तु तेवढ्याने पार्थिव मूर्तीला देवत्त्व कसे येणार?
एखादे देवघर वा देऊळ तयार झाले की त्यात ठेवण्यासाठी देवाची मूर्ती आणावी लागते. बाजारातल्या दुकानात जाऊन किंमत विचारावी लागते. दुकानदार त्याच्या मनातला श्रद्धाभाव दूर ठेवून, समोरचे गिऱ्हाईक पाहून भाव लावतो. पितळ अडीचशे, तांबे दोन हजार रुपये किलो असा मूर्तीचा भाव सांगतो. गिऱ्हाईक घासाघीस करून किंमत ठरविते आणि मूर्तीची खरेदी-विक्री होते. त्यातही पावती हवी असेल तर कर लागतो, म्हणून मग काटकसरीच्या नावाखाली तीही चोरी चालत राहते. दुकानदाराच्या दृष्टीने पितळ (किंवा तांबे किंवा सोने), आणि ग्राहकाच्या दृष्टीने मूर्ती असा रुक्ष विनिमय व्यवहार चोख पैशांनी घडतो.
देवळात वा देवघरात ती मूर्ती नुसती `ठेवत' नाहीत; तिची प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणजे त्या मूर्तीला आपला प्राणस्वरूप भाव अर्पून त्यास प्रतिष्ठा दिली की मग त्यावेळपासून तो आपला `देव' होतो. दुकानातल्या फडताळातील पितळ तांब्याचे पार्थिव, धूळ झटकून वजनकाट्यावर येऊन त्याची किंमत ठरली . तेच मूर्तरूप आता देवत्त्व धारण करून माणसाच्या अगोचर भावनांशी खेळत राहते. कुणाला ते पावते, कुणाची परीक्षा घेते, कुणावर अन्यायही करते, कुणाला कौल देते. ज्यांच्या त्या तशा सद्भावना देवापायी गुंतलेल्या नाहीत, किंवा ज्यांच्या लेखी त्यात `प्राण'च नाही त्यांना ते पार्थीव-पितळ, तांबे, सोने-असेच राहते. यवनांनी देव फोडले त्यावेळी त्या `देवां'ची त्यांना भीतीच नव्हती. आणि त्यात त्यांनी `प्राण' फुंकण्याचाही प्रश्न नव्हता. त्या पार्थिवात ज्यांच्या भावनांचा परम विश्वास गुंतलेला असतो, त्या दुर्दम्य, अगम्य विश्वासाच्या ठिकऱ्या करण्याचा त्यात हेतू असतो. तो विश्वास दुभंगू नये यासाठी पुजाऱ्याने देव लपवून सुरक्षित जागी न्यावे लागतात. पुजाऱ्याने त्याच्या उपरण्यात लपवून दूर नेऊन वाचविलेला देव आपले रक्षण समर्थपणे करणारच, ही श्रद्धा जागृत ठेवावी लागते. कारण माणसाचे माणूसपण टिकणे त्या सद्श्रद्धेवरच अवलंबून असते. त्या श्रद्धेतून जागृत स्थानीचे देवसुद्धा दुपारच्या वेळी दारांवर पडदे ओढून झोपतात हे मान्य करावे लागते. एखाद्या रुग्णालयात तेथील परिचारिका रुग्णाला औषध देण्याच्या वेळा काटेकोर सांभाळते, आणि त्यापायी रुग्ण गाढ झोपलेला असला तरी त्याला ढोसलून-जागे करून झोपेची गोळी देते! सर्वांची श्रद्धा असते की, या औषधाने रुग्णाला आराम पडेल. तसा आराम निसर्गत: पडण्याचे त्यावेळी महत्त्व वाटत नाही.
हे उपजत भावनांचे मनुष्यपण त्याच्या समाजशक्तीमध्ये रूपान्तरित होते, म्हणूनच देवाची चोरी झाली की माणसे कळवळतात. वास्तविक चोरांनी ही चोरी सोन्याची केली आहे देवाची नव्हे. देवत्त्वाची चोरी तर होऊच शकत नाही. कोण्या काळी काठीला सोने बांधून बिनधास्त फिरता येत असे म्हणतात. ती सुव्यवस्था आज नाही हे सांगायला पोलीस किंवा गृहमंत्री तरी कशाला हवा? त्यांना त्यांच्या अंगरख्याचे ओझे वाटेल एवढी दुर्बलता सध्या आहे. त्या स्थितीत रक्षणकर्त्या देवाच्या मूल्यवान सुवर्णाची भिस्त देवस्थानच्या कोणा थकलेल्या गावकऱ्यावर सोडणे योग्य नव्हते. सरकारी गृहखात्याला हा देवरक्षणाचा उद्योग कसा पेलला? प्रशिक्षित कमांडोज्च्या अभेद्य कड्यातून मंत्र्यावर पायताण, किंवा प्रधानमंत्र्यावर गोळी येते, त्या हिशेबाने असुरक्षित उघड्यावर असणारे सोने उचलण्यास चोरांना कसले भय?
इथे प्रश्न येतो श्रद्धा व भावनांचा - ज्यावर माणूस जगतो! सोने चोरीला गेले, ते कदाचित् वितळवले जाईल. त्याचे पैसे वाटून खाल्ले जातील. माणसांची श्रद्धा त्या सोन्यावर होती? की ब्रह्माण्डनायक गणपती नावाच्या अलौकिक `देवत्त्वा'वर होती? ज्याचे त्याने एवढे स्वत:शी तपासून पाहिले तर पुढचा काळ असा येऊ शकेल की, प्राणप्रतिष्ठित गणपतीच काय; पण सोन्याची पार्थिव वीटसुद्धा उघड्यावरची हलणार नाही. देव खरोखरीच असेल तर त्याने तर्कशुद्ध सद्भावना चिरंतन जागवावी अशी प्रार्थना आहे. तो चोरीला जाऊ शकत नाही ही खात्री माणसाने बाळगायला हवी.
***
Comments
Post a Comment