घाईघाईत जाशी कुठं
ज्यांच्यामागे वाघ लागलेला असतो, ती माणसं कुत्र्यासारखी धावत असतात म्हणे. ही स्थिती केवळ शहरी जीवनातच असते असा समज आहे. मुंबईची धावती राहणी हा सगळयांच्या आवडीचा विषय असतो. लोकल रेल्वेगाडीतून निवांत तब्येतीत उतरून स्वस्थ चालीत घराकडं परतणारा मुंबईकर, ही कल्पना कोणी करू शकत नाही. पुष्कळ मुंबईवाले तर अंथरुणावरही हलक्या अंगानं लवंडत नाहीत. भदाक्कन उताणं पडायचं, आणि हातानं खेचलेलं पांघरूणसुद्धा तंगड्या झिंजाडत अंगावरती पसरायचं ही त्यांची घाईपद्धत. तितकाही वेळ त्यांना नाही म्हणून पांघरूण घ्यावे न लागणारी उकाडी हवा तिथं देवानं दिलेली असते.
अशा घाईबद्दल आजच्या आयुष्याला किंवा शहरी लोकांना उगीच नावं ठेवण्याची एक पद्धत पडली आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक काळात अधिक वेगानं `लौक्कर' आटपण्यासाठी मनानं, कृतीनं धावतो आहे हे स्पष्ट दिसतं. लहान पोरांटोरांपासून सगळयांमागे `आटपा भरभर..'चा धोशा लागलेला असतो. पूर्वीच्या घरची म्हातारी माणसं, `आंघोळपाणी सक्काळी भराभर एकदाची आवरली की झालं'' या काळजीनं रात्रभर झोपायची नाहीत. पूजा, संध्या, बाराखडी.... या सगळयांच्या मागे `आवरा' हे ठरलेलं! तरीही म्हणायची एक रीत, पूर्वीच्या आयुष्याला निवांतपणा, संथपणा होता.
आपल्या गावातून मोठ्या शहराला जाण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी बैलगाडी किंवा छकडा असेल. अधिक लवकर पोचण्यासाठी घोड्यावरून जात असतील. नंतर मोटार जाऊ लागली. कोकणातून `हुंबय'ला जायला शिडाच्या होड्यांऐवजी लाँच सुरू झाल्या. सर्विस मोटारी अधिक वेगात, मग यस्टी. त्यावेळची ती आधुनिक सोय लवकरच खटारा किंवा लाल डब्बा म्हणवला जाण्याइतका पुढच्या मोटारपिढीला जोर आला. आता पाच तासांनी पोचणाऱ्या `जनता गाडी'ऐवजी साडेतीन तासात जाणारी टू बाय टू सस्पेंन्शन बस आपण वापरू लागलो इतके परिवर्तन `साध्या दरात' झाले. वास्तविक जर आपण स्वत:, उगीच धावत्या आयुष्याचा इतका तिटकारा करत असू तर पाच तासांच्या स्वस्त गाडीतून आपण का जात नाही? ज्यांना काही फारसं कामधाम उरलेलं नाही, केवळ लेका-भावाला भेटण्यासाठी दहा वीस मैल जायचं आहे त्यांनी धावपळ किंवा आनुषंगिक त्रास टाळून निवा%%न्त चालत जायला काय हरकत आहे? पण तशी कल्पनाच कालबाह्य वाटते.
एखादी गाडी आपल्या ठिकाणावर थोडी उशीरा पोचणार, असं दिसू लागलं तर त्या गाडीतले आपणासह प्रत्येकजण शिव्याशाप मोजू लागलो आहोत. उलट ती गाडी दहापंधरा मिनिटं आधीच पोचली तर खुशीच्या शाबासक्या, टाळया. दहा मिनिटं आधी गाडी फलाटाला लागली तर त्या `लौकर'च्या आनंदात कित्येकजण कोकरूउड्या मारत झपाटून बाहेर धावतात. म्हणजे लौकरातही आणखी घाई. कोणतंही काम लौक्कर संपवायचं, रांगेत आपला नंबर लौक्कर लागावा, लग्नाच्या पंगतीत आपल्या पानात आधी पडावं, सर्वांच्या आधी हात धुवावेत; बाजारात भाजी घेऊन झटक्यात घरी पोचावं, आपली कामाची सुटी आधी व्हावी, आपल्या नळाला आधी पाणी यावं.... किंवा तोटीतून पस्स्स आवाज करत पाणी येत असल्याचं आपल्याला लवकर कळावं....! केवळ माणसाला जन्मजात घाई झालेली असते. ही लगबग अनादिअनंत आहे.
सग्गळं लवकर आटोपून टाकणारा माणूस आपलं हे घाईचं आयुष्य मात्र लांबवायला पाहात असतो. गंमत आहे; सगळं लौकर उरकावं आणि आयुष्य मात्र लांबत जावं! - मग उरणाऱ्या काळात करायचं काय? फुकाची घाईच ना?
Comments
Post a Comment