भरल्या पोटीची उदासीनता
देशाला परचक्रापासून जेवढा धोका असतो त्यापेक्षा अधिक धोका शहाणे म्हणविणाऱ्या उदासीन नागरिकांकडून असतो असे म्हटले जाते. भारतात महाबिकट वाटणाऱ्या ज्या समस्या सध्या ग्रासून राहिल्या आहेत, त्यातल्या अधिकांश समस्या, नागरिकांनी - त्यातही शहाण्या पांढरपेशांच्या पांढरपेशींनी निर्माण केल्या आहेत. शरीरातील पांढरपेशी कृतिशून्य झाल्या की प्रतिकारशक्ती संपते व रोगांना संधी मिळते. त्याचप्रमाणे समाजातील हे पांढरपेशी, सामाजिक दृष्ट्या कृतिशून्य उदासीनतेने समस्यांमध्ये भर घालतात किंवा त्या जंजाळातून पळ काढतात.
ही कृतिशीलता कोणा टिळक-आगरकर किंवा शाहू-आंंबेडकरांची पाहिजे अशातला भाग नाही. स्वत:च्या घरची किंवा आपल्याच गोतावळयाची साधी, सोपी ,स्वस्त कामे हा वर्ग करेनासा झाला आहे. अशा वर्गातील एकेकाळचे दारिद्र्य आता खूपच कमी झाले, सामाजिक उद्वेग देणाऱ्या घटनांचे प्रमाण घटले, शारीरिक व कौटुंबिक स्वास्थ वाढले अशी सारी अनुकूलता येऊनसुद्धा त्याचा परिणाम जर कृतिशून्यतेत होत असेल तर ती स्थिती गंभीर म्हणायला हवी. माणूस अर्धपोटी असेल तरच तो समाजासाठी काही करतो हे सत्य आपल्याकडून सिद्ध करून देण्याचा पत्कर सध्या या वर्गाने घेतला असावा.
अलीकडे पुष्कळ ज्ञातिसंघटना, व्यवसायसंघटना, कुलसंघटना असतात. कुणाच्याही अपेक्षेप्रमाणे हे संघटन होऊ शकलेले नाही. आजवर प्रकाशित झालेल्या कुलवृत्तांतांपैकी कोणत्याही घराण्याचा ग्रंथ काढून पहावा, त्याच्या प्रारंभकथनाचा सूर साधारणत: एकच असतो. `आपल्या' कुटुंबांनी माहिती पाठवली नाही, वारंवार फोन, पत्रे, निवेदने दिली पण प्रतिसाद मिळत नाही, हाच आशय त्यात नमूद असतो. `आपल्या घरच्या' कामाला एवढी तत्परता आणि स्फूर्ती असेल तर इतर समाज आणि समुदाय याबद्दल काय बोलावे! परंतु हाच ग्रंथ किंवा दुसरी काही योजना हाती पडूदे, - की त्यातल्या चुका, त्रुटी फडाफड अंगावर येतात. त्या शोधायला, त्या कळवायला आपल्याला शक्य होते.
आजच्या सगळया व्यवस्थांबद्दल संताप करण्याचा एकही प्रसंग आपण सोडून देत नाही. त्या व्यवस्था तर समस्यांनी बजबजल्या आहेत यात वाद नाही. परंतु आपण त्या कमी करण्यासाठी केसभरही प्रयत्न करीत नाही हे वास्तव आहे. मतदान हे तर त्याचे ढळढळीत सार्वत्रिक उदाहरण आहेच. पण त्यापेक्षाही साधी उदाहरणे कितीतरी देता येतील, त्यांचा संबंध सामुदायिक कृतिशीलतेशी आहे. आपल्यास कित्येक कार्यक्रमांची, जेवणांचीसुद्धा निमंत्रणे येतात. अगदी `अक्षत देऊन' सांगितले तरी आपण जाऊ शकतो असे नाही. प्रश्न असा की, `येऊ शकत नाही' एवढे यजमानास कळविले जाते का? कोणत्याही शासकीय ऑफीसातून आमच्या अर्ज-विनंती-सूचना पत्रास कधी उत्तर दिले जात नाही, साधी पोचही दिली जात नाही. याबद्दल वैताग व्यक्त करणारे आपण `आपल्यातल्या' कितीजणांना उत्तरे पाठवतो? जेवायलासुद्धा येण्यासाठी यजमानाने आर्जवे करावी लागतात.
अत्यंत सन्मान्य असे काही दक्ष किंवा कर्तव्यकठोर अपवाद आहेत, आणि त्यावरच काहीतरी बरे घडते आहे. ती दक्षता व कर्तव्यपरायणता इतरांच्या उदासीनतेने झाकोळून जात असते. त्यामुळे त्या बऱ्याचा प्रभाव अपेक्षेइतका दिसत नाही. परंतु त्यावरसुद्धा या शुंभ मंडळीचे प्रतिपादन असे की, `एवढेजण जे कृतिशील म्हणून आहेत त्याचा तरी कुठे काय उपयोग होतोय? - मग आम्ही स्वस्थच राहणे अधिक बरे ना!'
यावरती वाद होऊ शकत नाही पण परमेश्वराने अशांना सुखी ठेवावे आणि ज्यांच्याकडे कर्तव्यबुद्धी व कृतिशीलता असेल त्यांना अशा `निष्काम' वृत्तीची बाधा होऊ नये अशी प्रार्थना करावी. समुदाय म्हणून समुदायातील प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. समुदाय ही वेगळी काही वस्तू नाही. `आपण लोकच हे असे पांडू!' हे म्हटले जाते. त्या `लोकां'पैकी आपण तरी बदलू एवढे ठरविले तर समुदाय बदलण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. आज `मी' ला स्थान आहे परंतु `आपण' ला अस्तित्वच नाही. अशी लोकशाही लोकांना धार्जिणी नसते. अशा उदासिनतेने आपले संपूर्ण सामाजिक जीवन व्यापून राहिले आहे, त्या समस्येला उत्तर कुठे शोधणार आहोत?
Comments
Post a Comment