Skip to main content

Aathavanche sathav


आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे
माझी सर्वात मोठी बहीण अनुसया, तिला आमच्या घरी सया म्हणत. माझा जन्म होण्याआधीच ती लग्न होऊन सासरी गेली होती. तिचे सासर बेळगावला लेले घरात. १९५० च्या सुमारास बेळगाव पूर्णत: मराठी होते. हे लेले घराणे अनेक वर्षे बेळगावात राहिले तरी त्यांना कानडीचा गंधही नव्हता. परंतु कर्नाटकच्या साहचर्यामुळे बायकांचा पेहेराव, नाकातली चमकी, पुरुषांचे गंध, आणि मराठी भाषेला कानडी हेल हे सगळे जाणवायचे. पुढच्या चार-सहा वर्षात भाषिक वातावरण तापत गेले. हे लेले कुटुंब मारुती गल्लीतून खडेबाजारातील विठ्ठल मंदिरासमोर राहायला आले, आता तो `संयुक्त महाराष्ट्न् चौक' म्हणविला जातो. माझ्या या बहिणीकडे आम्हा कुटुंबाचे जाणे होई. थोरला भाऊ तिथे लिंगराज कॉलेजात राहिला.
तर या बेळगावच्या वळणामुळे अक्कामार्फत आमच्या घरी इडली अवतरली. आमच्याकडे रोजच्या जेवणात ज्वारीची आणि पौषात बाजरीची भाकरी असायची. पण भाताचे प्रस्थही मोठे होते. रोजच्या भाताला एकच एक रूप नसायचे. कधी मऊ भात, कधी गुरगुट्या, कधी तांदूळ भाजून सोजी, सणासुदीला काळा भात असे प्रकार होत. तूप-मेतकूट हे अनिवार्यच. याशिवाय तांदुळाचे अनेक पदार्थ होत. खांतोळी, उकड, खीर, तंबीट या अनंत प्रकारांत इडली मात्र दुर्मीळच. जवळपासचा सारा मुलूख रानगट्ट्या मऱ्हाटी असल्यामुळे इडली हे प्रकरण कुठे दृष्टीला पडण्याची शक्यता नाही, मग जिभेवरती पडण्याचा प्रश्नच नाही.
ही आमची आक्का माहेरी इथे किर्लोस्करवाडीजवळ मळयात आली की तिच्याकडे आम्हा सर्वांचा लकडा लागायचा. माझ्या वडिलांना इडली आवडत असे. आणि त्यांची फिरती दक्षिणेत पुष्कळ झाल्यामुळे त्यांना इडलीचा आस्वाद बऱ्याचदा मिळायचा. आम्ही भावंडे मात्र इडलीची भुकेली, वडिलांना तर हवीच असायची. आक्का मग जरा `बघूया, करूया' म्हणत तयारी करू लागे.
तांदूळ, उडीद भिजवायचे. ते साध्या मराठी पाटा-वरवंट्याने वाटायचे. पीठ रुब्बायचा उखळासारखा दगड कुठला? आमच्या घरचा पाटा छोटासा होता. जवळपास वसती नसलेले आमचे रानमळयातले घर, त्याला शेजारच नव्हता त्यामुळे तात्पुरता पाटा मागून मिळण्याचे कारण नव्हते. घरच्या पाट्यावर आम्ही मुलेही तांदूळ-उडीद वाटायचो. ते नीट जमले नाही मग आक्काने त्यावर एक हात फिरवायचा.
एक मैलभर लांब रेल्वे स्टेशन होते. तिथे कलघटगी नावाचे कानडप्या मास्तर रेल्वे-क्वार्टरात राहात. त्यांची मुलगी माझ्या एका बहिणीच्या वर्गात होती. तेवढ्या वशिल्यावर तिच्या घरी लागेबांधे जोडून इडलीपात्र मिळवून आणले की बराच प्रश्न सुटायचा. पिंप किंवा उंच डब्यासारखे ते पितळी इडलीपात्र साध्या कुकरसारखेच. हल्लीसारखा त्यात जाळीदार स्टॅन्ड वगैरे नव्हता. एकामेकावर ठेवण्याजोगी पसरट भांडी त्यात होती. हे साधन त्या कलघटगींकडून आणायला, किंवा काम झाल्यावर पुन्हा पोचवायला तसे वजनदार होते. त्याकरिता आम्ही दोन भावंडे आक्कासोबत जायचो आणि इडलीच्या उत्साहात ती पालखी वाहून आणायचो. मग दुसऱ्या दिवशी चुलीवरच्या आधणात इडली उकडून पुढ्यात आली की तिचे अप्रूप. माझे वडील आक्काला लाडाने, `बब्बड, इडली फक्कड हं' म्हणायचे; आणि इडलीच्या आकाराच्या नसलेल्या त्या इडल्या आम्ही चापायचो.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...