Skip to main content

Aathvanche Sathav


आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे

सभोवतीचा राखोडा
१९५७ साली घराला आग लागली होती तो प्रसंग गेल्या महिन्याच्या एका अंकात नमूद केला. त्याच अनुषंगाने काही गंमती मनात घर करून आहेत.
त्यावेळी वीज वगैरे प्रश्नच नव्हता. परगावी गेलेले वडील तीन्हीसांज झाल्यावर रेल्वेगाडीने परत आले. स्नेहीमित्रांचा घोळका त्यांच्या वाटेवरच सांत्त्वनासाठी, त्यांच्या भेटीसाठी रेंगाळत होता, तो सगळा त्यांच्यासोबत आला. पुन्हा दुपारच्या घटनेची उजळणी झाली. `काही लागलं सवरलं तर सांगा. चिंता करू नका...' असं म्हणत सगळेजण हळूहळू पांगले. आई, वडील आणि आम्ही तीन भावंडे घरी होतो. काही अंतरावर रामायणे म्हणून एक बिऱ्हाडकरू होते, त्यांच्या घरी आम्ही मुले भात-पिठलं खाऊन आलो. आम्ही कुणीच रडत-भेकत नव्हतो; उलट मर्यादित चहाटळपणा करून खिदळतही होतो.
रात्र पडली. सभोवार काळोख. हाय लागलेलं लिंबाचं मोठं झाड, त्याला बांधलेल्या झोपाळयाचा दोर जळाला होता. श्रावण पंचमीला बांधलेला हा झोपाळा चैत्रापर्यंत झाडाला होता. (गेल्या श्रावणात बांधलेल्या आजच्या चिंचवृक्षाचा झोपाळा आज ज्येष्ठातही झुलतो आहे - ) तिथं काका (आमचे वडील) बसलेले, आम्ही सगळे सभोवती. काकांची दिलखुलास गाणी, गप्पा, टवाळया, नकला यांनी वातावरण पार बदलून गेलं. आयुष्य कोळपून टाकणारा अग्नी आमच्या हास्यकारंजांनी पार भिजून-थिजून गेला. कोण कधी झोपलं कुणास ठाऊक! आज वाटतं, काकांनी असल्या जातीचा धीर कुठून मिळवला होता?
दुसऱ्या दिवशी काही धडुतकापडं आणावीत म्हणून नव्या वसाहतीतील एका दुकानात गेलो. ते दुकान त्या काळाच्या आणि या वसतीच्या मानानं तसं मोठंच होतं. शेडजी आम्हा सगळया घराशी संबंधित, वडिलांचे स्नेही, नेहमीची ऊठबस. पण गंमत वेगळीच घडली. एकदोन पलंगपोस, चादरी, टॉवेल असे पाहून बाजूला ठेवत असता होणाऱ्या किंमतीचा अंदाज शेडजींनी घ्यायला सुरुवात केली. वडिलांनी `त'वरून ताकभात ओळखला व म्हटले, `कालची घटना तुम्हाला ठाऊकच आहे. आज निकड असल्यानं काही माल नेतोय. पैसे जरा सवडीनं देतो, काळजी नको.' दुकानदारानं आढेवेढे घेतले, सामान निम्मं-अर्धं कमी करायला लावलं. `पैसे फार लांबवू नका' म्हणून बजावलं. आणि ते सर्व ऐकून घेत आम्ही पिशव्या उचलल्या. पुढेही कधी वडिलांनी त्या दुकानदाराशी किंचिन्मात्र दुरावा केला नाही. `त्या स्थितीत त्याचं वागणं गैर म्हणता येत नाही...' हे त्या अजाणत्या वयात आम्ही ऐकलं - आज ते कळतं!
शेजारच्या एका मळयातल्या तीन-चार बायका आईची सांत्त्वन-भेट घ्यायला आल्या. कोणताही प्रसंग धीरानं, विवेकानं घेण्याची शिकवण त्या बायांना नसते. आकांडतांडव करण्याची रीत त्यांच्यात असते. त्यामुळे आमच्या अंगणात येताना ऊर बडवत `असं कसं ग%% झालं..? काय भोग तरी%%%!' असं ओरडत त्या बाया आईच्या अंगचटी आल्या. आईच त्यांना `अगं चालायचंच. वेळ सांगून येती का?' असं समजावत होती. परत जाताना या बायांनी झाडाला लगडलेले आंबे पटापट् आपल्या ओट्यात टाकले. `अे अे, आंबे काय तोडताय' असं म्हणत आम्ही त्यांच्यावर धावलो, कुत्रा धावला. आणि आमच्या सांत्त्वनाला आलेल्या त्या बायांची पिडा आम्ही दूर पिटाळून लावली. एवढ्या प्रसंगातही त्या कैऱ्यांमध्ये त्यांचा आणि आमचाही जीव गुंतलेला होता!
दुसऱ्या सकाळी चूल स्वच्छ करून आईनं पोेतेरं फिरवलं. रांगोळी शोधून रेघ ओढली. त्यावर भात लावला. वाडीतल्या दवाखान्यात आमची मोठी बहीण पाचसात दिवसांची बाळंतीण होती. तिला मेतकूटभात द्यायला वेळेत जायचं होतं. हाताला झालेलं ओझं पाठीवर टाकून पुढं चालत राहायचं; ओझं खाली टेकवलं तरी ते हलकं होत नाही....
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन