Skip to main content

Lekh on Narayan Kelkar


...... समर्थ पायाचा नारायण ......
जे व्हायला हवे होते, ते सांगलीच्या विसावा चौकातील कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन केले. शिवोत्सवाचे निमित्त साधून त्यांनी श्री.नारायण गणेश केळकर या असामान्य माणसाचा हृद्य सत्कार केला. बऱ्याच वेळा, बऱ्याचजणांनी, बऱ्याच जणांकडे यापूर्वी तसे बोलून दाखविले असेल पण सबब कोणतीही असो नारबा केळकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सामुदायिक किंवा जाहीर योग जमून आला नव्हता, ती कर्तृत्त्व नोंद आता झाली याचे मोठेच समाधान आहे.
गावभाग सांगलीतील साऱ्या जुन्या नागरिकांना नारायण गणेश केळकर ही व्यक्ती ठाऊक आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९५३ चा म्हणजे आज त्यांना ६० वे वर्ष चालू आहे. १९६०-७०च्या दशकात हा आठ-दहा वर्षांचा मुलगा त्याच्या वयाला न शोभणारी कुबडी आपटत एका पायावर पळापळी करत असताना दिसायचा. बालपणी समई अंगावर पडून पाठीवर भाजल्याचा मोठा प्रशस्त व्रण, आणि कधीतरी उंबऱ्यात अडखळून पाय मोडल्याचे दुखणे पोळत हे पोरगं जवळपासच्या सगळया घरांतून वावरायचं. आई धुणी-भांडी करून पोट चालवायची. दारिद्र्याचा कधी उच्चारही न करता साऱ्या सभोवतालचा हा `नाऱ्या' हे चटके कसे सोसत होता, याचे भान आज पुष्कळांना आले असेल. एकेकदा दुपारी न जेवताही कुणा शेजारघरी जेवणाच्या वेळेवरच गेला तर हा नारबा बाहेरच्या खोलीत खेळत बसायचा. तो जेवलेला नाही हे त्या घरच्या माऊलीला कळलं तर ताटली वाढून मिळे, तीही प्रत्येक घरी मिळेलच असे नाही. पण या नारायणाच्या मुखावर कधी आशाळभूतपणा दिसायचा नाही.
अशा स्थितीतून नारायण मोठा झाला. आज `सर्वे%पि सुखीन: सन्तु' अशा संपन्न विचारांनी नारायण केळकर राहतात, हा केवढा थोरपणा!!
मधल्या काळात शाळेच्या शिक्षणानंतर नारायण कामचलाऊ भिक्षुकी शिकला. खाडिलकर गल्लीतील शंकराच्या देवळात आणि इतर काही पूजा असतात. प्राप्ती होते. जुन्या वाड्याचे `अपार्टमेंट' झाले, त्यात दोन खोल्या मिळाल्या. लग्नही झाले. हे झाले प्रापंचिक. त्यांच्या मोठेपणाचा अजब किस्सा केवळ एक उदाहरण म्हणून सांगण्याजोगा आहे. सकाळी लवकर देवळात पूजेला जाताना त्यास रस्त्याकडेला एक नोट सापडली. थोड्या थोड्या अंतरावर आणखी चार-सहा नोटा मिळत चांगले हजारभर रुपये सापडले. यानी परत येताना रस्त्याच्या काही घरांतून कल्पना दिली. कुणी शोधाशोध करत आला तर कळवायला सांगितले. देवळाबाहेर फलक लिहून ठेवला. आठ-पंधरा दिवस गेले. कुणी आले नाही. नारायणांनी स्वत:कडचे शे-पाचशे रुपये घालून ती रक्कम मिरजेच्या अपंग संस्थेला देऊन टाकली.
यापूर्वी त्यांनी लाकडी पाय (जयपूर फुट) बसवून घेतला, त्यांना शब्दश: पाय फुटले! त्यांनी प्रवास-फिरणे मनसोक्त सुरू केले. देवगिरीचा किल्ला, वणीची सप्तशृंगी ते चढून गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारीचा - म्हणजे नेताजी सुभाषचंद्रांचा जन्मदिन. आपल्या वाढदिवसाऐवजी सुभाषबाबूंचे स्मरण म्हणून ते रक्तदान करतात; याशिवाय बाबू गेनूच्या पुण्यतिथीला आणि १५ ऑगस्ट तर आहेच. म्हणजे गेल्या ४० वर्षांत त्यांनी सुमारे १२० वेळा रक्तदान केले आहे. बाबू गेनू रक्तदाता न्यासाला त्यांनी ४ हजाराची देणगी दिली. या दांपत्त्याने नेत्रदान, देहदान यांचे संमती फॉर्म्स तर कधीच भरून दिलेत.
आपल्या कमाईतून सामाजिक कामाला देण्यासाठी त्यांचा हात इतका सढळ असतो की, घेणाऱ्यानेच अचंबा व्यक्त करावा. नारायण बालपणी जिथे पोराटोरांच्यात लंगड्या पायानं आणि बिनअंगरख्याच्या पाठीनं हुंदडायचा त्या बलभीम व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्यासाठी कार्यकर्ते पैसे जमवीत होते. नारायणाने ५ हजार रुपये स्वयंस्फूर्त पाठविले. ते तसेच घेऊन संस्थेचे सचिव नारायणाकडे गेले. ``नारबा, काही चूकभूूल-घोटाळा तर नाही ना?'' नारायणानी `ते कर्तव्य आहे' असे कृतज्ञतेने सांगून त्यात चूक नसल्याचे म्हटले. हे सर्व आश्चर्यकारक!
नारायण केळकर आता साठीचे झाले. पायाला पुटकुळी आली तर वर्षभर वेदना सांगणारे हे जग. दोन रुपये देवापुढे टाकले तर फलकावर नाव कोरू इच्छिणारे हे जग. ते चालले आहे अशा नारायणाच्या एका पायावर! म्हणून ते दु:खावर समाधानाने मात करू शकते. `जमेल तेवढे करू' असे म्हटले तर खूप काही जमू शकते हे नारबांनी सिद्ध केले आहे. चेहऱ्यावरच्या गाठी आणि सामान्य रूपात एका पायावर दुडकत जाणारी ही व्यक्ती असामान्य आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन