ग्रंथाचा प्रसार आवश्यक,
ग्रंथपालाचा नको
आपल्या ४ जूनमधील अंकात ग्रंथालय पडताळणी याविषयी मजकूर आहे. ग्रंथालय ही गरज आहे याचा विसर पडला आहे. शाळा कितीतरी वाढल्या पण त्यांनाही ग्रंथालय हा विषय गौण वाटतो. ज्या गावात हायस्कूल आहे तेथे वास्तविक वेगळया ग्रंथालयाची गरज नाही. शाळांसाठी ग्रंथालय अनुदान काल-परवापर्यंत दिले जाई. वेगळे ग्रंथालय, त्याची व्यवस्था, कर्मचारी यासाठी पुन्हा पैसे वाटण्यापेक्षा माध्यमिक शाळांना त्या सुविधा द्याव्यात आणि नागरिकांसाठी तेथील पुस्तके ठराविक वेळेत उपलब्ध करून द्यावीत. एखाद्या छोट्या खेड्यात वेगळे वाचनालय असायला हरकत नाही, पण त्यासाठी सरकारने इतके पैसे खर्चू नयेत. किमान ज्या गावात हायस्कूल आहे, त्याच गावात सरकारी मदतीचे वाचनालय-ग्रंथालय आवश्यक आहे. आणि ती गरज शाळेमार्फत भागू शकते.
जिथे एकापेक्षा जास्त माध्यमिक शाळा असतील अशा गावांत मोठमोठे ग्रंथ, कोश, सीडी असे मूल्यवान साहित्य विभागून खरेदी करून उपलब्ध ठेवावे. अमूक ग्रंथ गावातील कोणत्या शाळेच्या ग्रंथालयात आहे ते सांगणारी सूची करता येईल. प्रत्येक शाळेत हल्ली संगणक आहेत. त्याचा वापर त्यासाठी व्हावा.
`करणाऱ्यांना' करता येण्याजोगे खूप आहे. `अनुदान अडवा, अनुदान जिरवा' या उद्देशाने `ग्रंथालय चळवळ' वाढल्यासारखी वाटेल पण ती फक्त फसवणूक होईल. ग्रंथपालास व कर्मचाऱ्यांस पगाराचे जे आकडे त्या लेखात दिले आहेत ते कमीच आहेत परंतु त्यांनी ग्रंथ-व्यवहार कोणते व कसे चालविले आहेत याची पडताळणी करायला हवी. जे लोक तळमळीने काम करतात त्यांनाच चांगला मोबदला दिला पाहिजे. वाचनसंस्कृती रुजविणे म्हणजे पैसे वाटणे नव्हे. शाळा वाढल्या, शिक्षकांचे पगार वाढले म्हणून `शिक्षण' वाढत नाही. ग्रंथालय व वाचनालय हे `वाचकांची समृद्धी' वाढविणारे हवे.
- एस. वाय. क्षीरसागर
सावेडी, अहमदनगर
संस्कार-शिबीरांची गरज
आपल्याकडे सामुदायिक जीवन पूर्णत: नाहीसे झाले आहे. पूर्वी हा विषयच शाळेत असायचा. त्याचे वार्षिक शिबीर व्हायचे. सहावी-सातवीची आम्ही मुले-मुली त्या शिबीरातील सर्व कामे करायचो. मुली स्वैपाक करायच्या. मुले श्रमदान, शाळा-सफाई करायची, पाणी भरायची. मुक्काम शाळेत असे. एकत्र राहण्याची, `मिळून राहण्याची' शिकवण असे. शिवाय दररोज दैनंदिनी (डायरी) लिहिणे सक्तीचे होते. ते शिक्षकांनी पाहायचे.
याच प्रकारे भारत सेवक समाज, एन.सी.सी., रा.स्व.संघ, राष्ट्न् सेवादल वगैरे ठिकाणी मुलांच्या वयात एकत्र राहण्याचा सराव-संस्कार दिला जात असे. तेथील राहणीमान, वर्तणूक व शिकवण सामान्य परिस्थितीची असे. त्यांमधून तयार झालेली मैत्री आजही टिकून आहे असा अनुभव पुष्कळांचा असेल. हल्ली `व्यक्तिमत्त्व विकास' किंवा `सुटीतील प्रशिक्षण' या प्रकारात भरपूर पैसा भरून अलिप्त अहंगंड वाढविणारे प्रयोग चालतात. अपवाद दोन्ही बाजूंस असतील, पण एकंदर चित्र बरे नाही.
`स्वत:बरोबरच इतर' अशी शिकवण देणारी शिबीरे बालपणी फार आवश्यक वाटतात.
- हरि श्रीधर कुलकर्णी,
`तृप्ती', गंगावेश, कोल्हापूर
Comments
Post a Comment