आठवांचे साठव.....
- वसंत आपटे
जन्मशताब्दीच्या निमित्ताने
या अंकानं ३३ वर्षे पूर्ण केली. या काळात काय साधलं याचं हिशेबवह्यांत मिळणारं उत्तर उत्साहवर्धक नाही, पण स्मरणीय संपर्काचे जे अनमोल संचित तयार झाले त्याचा मात्र स्वत:लाही हेवा वाटावा. अशा भेटीगाठींत कै.यशवंतरावांकडे जाण्याचा योग साधला तो १९७९ च्या १२ जानेवारीचा प्रसंग -
`उद्या-परवा दिल्लीला जातोय' असे म्हटल्यावर रामानंदनगर कॉलेजचे प्राचार्य विलासराव घाटे यांनी विद्यापीठ अनुदान मंडळातील त्यांच्या कॉलेजचे एक छोटे काम माझ्याकडे दिले. दिल्लीत त्या कार्यालयात जाऊन मी त्यांच्याकडून `हां हो जायेगा, भेज देंगे' एवढं आश्वासन घेऊन बाहेर पडलो, तरी वेगळी एक कल्पना डोक्यात चमकून गेली.
कॉलेजच्या मातृस्थानी असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.यशवंतराव चव्हाण होते. म्हणून त्यांच्या कानावर हे प्रकरण घालावे असे वाटले. त्यावेळी चव्हाणसाहेब भारताच्या आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष. दिल्लीतील एक महानुभाव. मी हे काम घेऊन त्यांच्याकडे जाणे म्हणजे काहीच्या बाही कल्पना! पण मला त्या कामापेक्षा साहेबांच्या घरात शिरण्याचा `चानस' अनुभवायचा होता. घरी फोन लावला. वेणुताई होत्या. `सांगलीहून आलोय' म्हटल्यावर पटकन् वेळच मिळाली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत साहेब मुंबईहून परत येतील, त्यानंतर घरीच येण्याची सूचना मिळाली. हाताशी वेळ होता म्हटल्यावर दिल्लीच्या राजस मार्गावर चक्क पायपिटी सुरू केली.
रस्त्यावर तुरळक रहदारी होती. रेसकोर्स रोडच्या कोपऱ्यावरचा बंगला सापडला. गेटातून आत शिरलो. पाठोपाठच काळीशार गाडी मला ओलांडून पुढे गेली. साहेबच आले असावेत. मी बंगल्याशी ऑफिसात डोकावलो. तिथे सामसूम. दरवाजात चाहूल दिल्यावर एक नोकर (असावा) आला. मी तपशील दिल्यावर त्याने आत नेऊन बसविले.
पाच-सात मिनिटांनी समोर एक व्यक्ती `नमस्कार आपटे. कधी आलात दिल्लीत?' असे म्हणत आली आणि माझ्या शेजारच्या एका ऐसपैस कोचावर बसली. हेच ते भारताचे थोर नेते, महाराष्ट्नचे शिल्पकार... वगैरे असलेले यशवंतराव...!
माझा विश्वास बसेना. तलावात पडलेल्या कुऱ्हाडीसाठी व्याकूळ झालेल्या लाकूडतोड्याच्या समोर एकदम परमेश्वर उभा राहून `काय हवंय तुला?' असे म्हटल्यावर त्याचे जे झाले असणार त्याचा अनुभव मला आला. गुढघ्याच्या वरती आखडलेले पंचासारखे वस्त्र आणि एक पैरणीसारखी बंडी अंगात अशा माजघरी वेषात माझ्यासमोर साक्षात यशवंतराव चव्हाण बसले होते.
या पुढचा पाऊस तास मी त्यांच्या सोबत होतो. त्यांचे ग्रंथालय पाहिले. `कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मवृत्ताची कच्ची मुद्रणप्रत पाहिली. सांगलीकडची हालहवाल झाली. माझे चुलते दत्त आपटे यांच्यासमवेतच्या गप्पांचा त्यांनी आठव दिला. `आपले जग'ची विचारपूस केली. जे कारण काढून घुसलो होतो त्या कॉलेजच्या कामाचं बोललो. पुढं एक-दीड महिन्यावर रत्नाप्पा कुंभार यांचा वाढदिवस होता. `त्यांच्याबद्दल काही सांगा' म्हटल्यावर साहेब खूप आतून हळवं बोलले. पण पुढे म्हणाले, ``आमच्या राजकाणातील वाटा आज वेगळया झाल्यात. त्यामुळं यातलं काही लिहू नका. उगीच कोण काय अर्थ काढेल सांगवत नाही, अशी विचित्र स्थिती आलीय.''
चहा आला. साहेब दिवसभराच्या कामातून किती शिणले होते माहीत नाही. पण प्राप्त राजकीय स्थितीनं बरेच दुखावले असावेत. माझा तो विषय नव्हे. त्या विमनस्कतेमुळेही असेल कदाचित, पण माझ्यासारखा एक `गावाकल्डा' सामान्य माणूस भेटल्यामुळे त्यांनाही उपजत हलकेपणा वाटला असावा. मला त्यांच्या त्या स्थितीने सुवर्णयोग साधून दिला.
Comments
Post a Comment