आठवांचे साठव.....
तिघांचे जाणे
मला आठवते तेव्हापासून ज्यांना पाहात आलो, अशा तीन व्यक्ती गेल्या आठदहा दिवसात काळाआड गेल्या. त्यांनी आपापल्या परीनं सुखी संसार केला, आणि त्यासाठी मन:पूर्वक प्रामाणिक खस्ता खाल्ल्या. त्यामुळं गावात ती भली माणसं म्हणून ओळखली गेली, त्यांच्या जाण्याची हळहळ ठेवून गेली. ८५-९० च्या वयातील त्यांंचं जाणं तसं धक्कादायक किंवा अकाली नव्हे, पण स्थिरचित्तानं आपली खेळी करून चांगला `स्कोअर' उभारणारा खेळाडू आऊट झाल्यावर एक रुखरुख वाटायची ती वाटतेच.
सदाशिव कृष्ण कुलकर्णी हे जवळच्या पलूस गावचे जमीनदार घरातले होते. त्या काळच्या अजस्त्र कुटुंबाची निर्वाह चिंता आणि परिस्थिती यांच्या विचारातून पांगापांग झाली. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात नोकरी पत्करून ते वाडीजवळ राहायला आले, त्यांच्या तिशीपासून ते `एस.के.तात्या' म्हणूनच ओळखले जाऊ लागले. आमच्या मळयात त्यांचे बिऱ्हाड राहिले, प्रपंच-पाणी-नोकरी एवढ्या व्यापात अडकलेले ते दिसत. नाटक हा त्यावेळी पुष्कळांचा छंद होता. तात्यांनी ऐतिहासिक नाटकात कामे केली. सरदार बाजी घोरपडे यांच्या तरवारधारी वेशातला त्यांचा फोटो आमच्या घरी होता, अजूनही कुठंतरी असेल.
गोविंद विष्णू जोशी हे वाढत्या वसाहतीत वैद्यकीचा जम बसविण्यासाठी साठ वर्षांपूर्वी आले. भाऊ परांजपे यांच्या बालमैत्रीमुळे ते इचलकरंजीहून इथे आले. सुरुवातीला काही दिवस परांजप्यांच्या घरीच राहिले, नंतर सगळे बिऱ्हाड आणले. आम्हाला तोपर्यंत शौचालयाची गरज वाटली नव्हती, कारण सभोवती सगळी शेती होती. पण त्या सुमारास आम्ही संडास बांधला, आणि डॉक्टर जोशींची आई `त्यासाठी' आमच्याकडं दररोज येऊ लागल्या. डॉक्टर मुख्यत: सर्वांच्या लक्षात राहतील ते त्यांच्या आत्यंतिक नियमित दिनचर्येसाठी! पहाटे सूर्यनमस्कार, मग विहिरीची आंघोळ, ताजा सात्विक आहार, कामावर श्रद्धा, ठराविक विश्रांती. आठवड्याची सुटी ते सांगलीत घालवायचे. काही बड्या शल्यक्रिया पाहून यायचे. त्यांच्यावरच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, पैपाव्हण्यांचा राबता यांचे भान ठेवत त्यांनी आखीव आयुष्य भोगले. डॉक्टर म्हणून लोकांचा विश्वास मिळवला, पण त्यातही कुठे अस्थानी कणव दाखविली नाही. तत्वकठोर बंधने स्वत:वर घालूनच प्रदीर्घ कारकीर्द केली. हल्ली त्यांनी स्वीकारलेली अलिप्त निवृत्ती कदाचित त्या बंधनाचाच एक भाग असेल.
गजानन नागेश खिरेे हे साठच्या दशकातच या परिसरात आले. लिप्टन या चहा कंपनीचा विक्रीप्रतिनिधी म्हणून ते खेडोपाडी फिरत. टांग्याच्या मागे सुपलीत एक भला मोठा खोका बांधून पुढे जगू टांगेवाल्याजवळ बसून ते फिरताना दिसायचे. आम्ही पोरं त्यांना `लिप्टन खिरे' म्हणून ओळखत असू. तसेच एक `ब्रुक बाँड जोशी' त्यावेळी होते. खिरे इथे आले, घर-स्थावर करून राहिले पण त्यांचा संसार सगळया महाराष्ट्नत असे. ७६-७७ च्या सुमारास मिरज येथे रा.स्व.संघाचे शिबीर होते. ते संपवून खिरेकाका परत येताना भेटले. खाकी चड्डी - काळी टोपी - हातात लाठी या वेशात पाहिल्यावर मग आम्हाला ते संघाचे असल्याचे कळले. त्यांची संपर्ककला, सहज मदत करण्याची वृत्ती आणि साधेपणा ही लक्षणे स्वयंसेवकाचीच होती, त्याचा उगम त्यावेळी समजला. जवळपासच्या कोणत्याही विधायक घडामोडीत खिरेकाकांचा सहभाग असायचा. ब्राह्मण सभा, पतसंस्था, अर्बन बँक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत, प्रवासी संघ अशा सगळया संस्थांत ते दिसत. शिवाय सांगली व महाराष्ट्न् स्तरावरच्या काही संस्थासंघटनांत ते पदाधिकारी होते. त्यांचा प्रवास रेल्वे-बस आणि हातात एक थैला असा चालायचा. भारदस्त ऐट त्यांनी कधी दाखवली नाही. त्यांच्या जाण्याआधी चारसहा दिवस ते पुष्कळांना भेटून बोलून गेले होते.
म्हटलं तर ही साधी माणसं. उत्तुंग मोठेपण मोजण्याचे कारण नाही. पण एका निश्चित प्रणालीवर श्रद्धा ठेवून दीर्घकाळ चालत राहण्यातून त्यांनी एक ज्येष्ठत्त्व मिळवलेले होते. माणसाची वसती मोठी होत जाते. या स्थानीच्या शेतारानाचे गाव झाले, त्याला वाढत्या वयात काही विधायकतेचा संस्कार लाभला असेल तर तो अशा वैशिष्ट्यपूर्ण सामान्यजनांनी न कळत केलेला असतो.
Comments
Post a Comment