आठवांचे साठव.....
- वसंत आपटे
रुग्णसेवा
साधारण १९५३-५४ चा काळ असेल. त्यापूर्वीपासून खेड्यांमध्ये नारू या रोगाचे प्रमाण बरेच होते. पाणवठ्याच्या दूषित जागा आणि अस्वच्छ पाणी यांमुळे पुष्कळ खेडुतांना नारू व्हायचा. पायाच्या घोट्याजवळ फोड येऊन पाय सुजायचा. जखमेला `तोंड' पडले की त्यातून दोऱ्यासारखा लांब जंतू - किंवा अळी बाहेर यायची. तिथले नासके रक्त यायचे. त्याच्या असह्य वेदना, शिवाय ताप वगैरेंमुळे माणूस पार घाईला यायचा.
आमच्या शेतामळयातल्या वसतीवर बरीच वर्दळ असे, त्या सर्वांना शुद्ध पाणी वापरण्याच्या शिकवणुकीचे `डोस' माझ्या आई-वडिलांकडून दिले जायचे. परंतु सभोवतीच्या चार-पाच कोस अंतरात बरेच रुग्ण नारूमुळे हैराण होत. आश्रमीय राहणीच्या आमच्या घरी या रोगावरचा उपाय शिकून घेतला गेला. नारूची साथ आली की आमच्या `घरा'पुढचा मांडव म्हणजे रुग्णालयाचा नारू-वॉर्ड झाल्याचे मला आठवते.
टाकणखार नावाचा पदार्थ बाजारात मिळतो. माझी चूक होत नसेल तर पापड तयार करताना त्याचा वापर होतो. एक-दोन आण्यांचा हा टाकणखार तापल्या तव्यावर भाजून त्याची लाही करायची आणि नंतर त्यात शुद्ध जुना गूळ घालून त्याचा छोटा लाडू बनवायचा; अशी काहीतरी त्या औषधाची कृती होती. हे औषध नारूच्या आजारावर अगदी रामबाण होते, मात्र त्याचे कडक पथ्य असायचे. दिवस उगवायला मऊभात-तूप खाऊन घटकाभराने हा औषधी लाडू सेवन करायचा. मग मात्र पाण्याचा - अगदी लाळेचाही थेंब पोटात जाऊ द्यायचा नाही. त्या रात्रीपर्यंत पाय हलका होऊन दुसऱ्या सकाळी तर रुग्ण हसत हसत परत जाई.
औषध तसे सोपे असले तरी ते काळजीपूर्वक बनवायचे, पथ्य सांभाळायचे हे खेडूतांच्या व्यवहारात जिकिरीचेच होते. त्यातून पहाटपारी मऊभात-तूप त्यांना मिळणे दुरापास्त. आमचे घर आणि माझे आई-वडील यांच्या प्रपंचात असल्या कामांना स्थान होते. ते हे औषध करून देत, त्याहीपेक्षा रुग्णाचा तो एक दिवस सांभाळ करीत. बैलगाडी किंवा सायकलवर बसवून नारूचा सुजलेला पाय अंतराळी धरून कोणीही दोन-पाच मैलावरून येत असे. त्याला मुक्काम करायला लावून दुसऱ्या पहाटे अनुशापोटी ते औषध व तूपभात करून द्यायचे काम आईकडे येई. त्या रुग्णाच्या सोबतीला कुणीतरी राहायचे, त्याचे जेवणखाण त्याच्या घरून आले तरी, एखादे कोरड्यास, लोणचे-चटणी, ताक असे द्यायची पद्धत होतीच.
या औषधाचे, पथ्यपाण्याचे, रुग्णसेवेचे किती पैसे मिळायचे हा प्रश्न आजच्या काळाचा. त्यावेळी माझ्या आई-वडीलांना कुणी त्याबद्दल विचारलेही नसावे. कुणाच्या तरी पाठकुळी बसून येणारा रुग्ण स्वत:च्या पायावर चालत जाताना पाहण्याचे समाधान इतकीच त्यांची फी!
रानामळयात काम करताना विंचवाचा दंश होण्याचा प्रकार खूप असायचा. मला स्वत:ला, माझ्या आईला हा झटका बसलेला आहे. आमच्याकडे महादूनाना म्हणून एक घरगडी होता, तो खूप सहनशील असला तरी विंचू चावला की पाय झटकत फू फू फू करत यायचा. माझ्या वडिलांना विंचवाचे विष उतरवण्याची कला अवगत होती.
चुलीत पडलेली साधी गार राख मऊ असते. ती मुठीत घेऊन ते वृश्चिकदंशाच्या पायाला किंवा हाताला बोटांच्या दिशेने भरभर चोळत. त्यामुळे रक्तप्रवाह तिकडे रोधून विषप्रभाव न चढता खालीखाली उतरे. जिथे दंश असेल तिथे फुणफुण राहायची, त्यावर तुळशीतली माती, रक्तचंदन वगैरे लावायचे. हातापायालाही कधी चंदनगंध लावीत असे वाटते. एकूणात विंचू उतरे! हा उपचार वास्तविक कुणालाही सहज करता येण्याजोगा होता पण बाया-बाप्यांचा समज असा की आपटेकाका मंत्र घालतात. राखबिख वापरल्यामुळे तो समज बळकट व्हायचा. वडील त्यांना किती सांगायचे, तसले काही नाही रे बाबांनो!
एक कजाग प्रौढ बाई एकदा आयाय्ओय् करत तीन्हीसांजेला आली. तिचा तरूण मुलगा बरोबर होता, त्याला वडील म्हणाले, `मी सांगतो तसं आईचा पाय तू चोळ.' पण ती बया ऐकेना. `काका तुम्हीच मंतर घाला, पाया पडते...' असे म्हणून ढाँ ढाँ ओरडू लागली. आईला तिची दया येऊन हसत म्हणाली, `घाला हो तुमचा मंत्र...' काका मुकाट्याने तिच्या पायाशी बसले. पद्धतशीर चोळून दिले, विंचू उतरला. बाई शांत होऊन घरी गेली. वडील नंतर आमच्या आईला म्हणाले, `च्यायला, या मंतराच्या घोटाळयात त्या बयेचे पाय चुरत बसण्याची पाळी आली!' सगळे खो खो हसले.
Comments
Post a Comment