आठवांचे साठव.....
- वसंत आपटे
अग्नीपरीक्षा
परवाच्या २५ मार्चला ५५ वर्षं झाली. मला तर ती आठवण झालीच, पण माझ्या आधीच्या दोघी बहिणींनाही हटकून तो प्रसंग आठवलाच असणार!
आमच्या आपटे मळयातील एकांडं घर. घरात बेतास बात सामान, पण धान्यधुन्य भरलेलं. तावणाऱ्या उन्हाची रखरखीत दुपारची वेळ. वडील कामासाठी कऱ्हाडजवळ ओगलेवाडीस गेले होते. घरापुढल्या कडब्याच्या मांडवात माचावर आई लवंडली होती. या दोघी बहिणी काहीतरी अभ्यास-गृहपाठ करत होत्या. मी आठ-नऊ वर्षांचा होतो. दिनकर गं.केळकर (अज्ञातवासी) यांची कविता - `मोहरा इरेला पडला' ही चिमाजीआप्पाच्या आवेशात मोठमोठ्याने म्हणत होतो.
एकदम घरामागल्या बाजूनी धुराचा लोळ उठला आणि कोपऱ्याशी जाळही दिसला. `अरे अरे, काय पेटलं-' असं ओरडत आम्ही बाहेर त्या बाजूला पळालो. आईनं बाहेरच्या मोरीत भरून ठेवलेलं पाणी बादलीतून पळवत आणलं. तोवर जाळ मोठा झाला होता. तिनं ती बादली एकाच वेळी जाळावर फेकली. तसा भप्कन तो जाळ आणखीच भडकला. एव्हाना त्याची व्याप्ती वाढली. ऐन उन्हाळयाचे दिवस. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या उकीरड्याच्या सभोवती पालापाचोळा साठलेला, गवत वाळलेलं, पेंड्या विखुरलेल्या... सगळं अग्नीचं खाद्य! जाळ सरसरत घरालगत आला, गोठ्याला भिडला आणि पश्चिमेच्या खिडकीतून ज्वाळा जिभा चाटत आत घुसल्या. पाहता पाहता घर आगीनं वेढलं. आम्ही तीन भावंडं आणि आई हतबुद्ध होऊन गेलो. जनावरं बाहेरच्या दावणीला होती, त्यांना झळ लागून ती दाव्यांना हिसके देऊ लागली.
आम्ही बहीणभावंडं शब्दश: ठो ठो बोंबलत दूर कुंपणापर्यंत पळालो. जवळपास वसती नव्हती, पण चार फर्लांगावरच्या तुरळक घरांतून माणसं धावत आली. शिवा कुऱ्हाडे हा तरूण कुंपणतारांवरून उडी घेत आला. त्याच्या हाती मोठा कोयता होता. जनावरांना मोकळे करता येईना कारण हिसके मारून त्यांनी खुंट्याचे तिढे जास्तच करकचले होते. शिवाने कोयत्याने दोर कापले. जनावरं उधळत दूर पळाली, दिसेनाशी झाली.
एव्हाना सभोवतालवरून माणसं धावाधाव करत आली. काठ्या, झापा यांनी झपाटत जाळ विझवू लागली. काहीजण आत घुसले, तडाक्यातून चीजवस्तू वाचविण्यासाठी धडपडू लागले. अन्नधान्याचे डबे, फडताळं, अवजारं, बरण्या दूर टाकू लागले. साधारण मैलभर अंतरावरती स्वामी रामानंद विद्यालय आहे. तिथून आग दिसल्यावर शाळेचे तीन-चार वर्ग सोडून देऊन मुलांना इकडे पिटाळण्यात आलं. त्या काळात दहावी-अकरावीतली खेड्यातली मुलं चांगली मिसरूड फुटलेली धट्टीकट्टी असत. त्यांनी घरामागच्या विहिरीत पार तळाशी असलेलं पाणी उचलण्यासाठी कच्च्या पायऱ्यांवरून माळ लावली आणि बादल्या-कळशा-डबे-किटल्या... जे हाती मिळालं ते भरून वरती चढवत पाण्याची अखंड फेक अग्नीवर चालू ठेवली. या सगळया प्रयत्नांमुळं अर्ध्या तासात आग संपली; पुढचा आणखी थोडा काळ धुसफुसत राहिली.
आत गेलेले दोघेचौघेजण सुखरूप बाहेर आले, त्यात आनंदराव पाटील (बांबवडेकर) टेलर इतके काळे झालेले होते की ओळखू येत नव्हते. एकानं कुणीतरी एक कापडी पुरचुंडी, काहीतरी महत्त्वाचा किंमती ऐवज असावा म्हणून प्रामाणिकपणे आईच्या हाती आणून दिली. आमच्या घरी `ऐवज' तो काय असणार? सगळी पांगापांग झाल्यावर आम्ही ती पुरचुंडी उघडली... त्यात खूप ज्वालाग्राही असा एक `सोरा' नावाचा रासायनिक पदार्थ होता. बहुधा विहिरीच्या खोदकामासाठी कधीकाळी आणलेल्यापैकी तो शिल्लक राहिला की काय कुणास ठाऊक! पण एवढ्या अग्नीवेढ्यातून तोच पदार्थ कसा काय वाचला हे आश्चर्य!
हे सगळं शांत झालं त्यावेळी घराभोवती झळा लागलेली झाडं, दरवाजे-खिडक्यांचे कोळसे, कणगी-पिपातील धान्य करपलेलं असं दृश्य होतं. अंगावरच्या कपड्यांखेरीज सगळी चिरगुट-कापडं खाक झाली. बाहेर पडलेली भांडी-काही वस्तू एके जागी करतोवर दिवस संपत आला; आणि दूर पळून गेलेली जनावरं एकाच कळपानं आपसूक येऊन मूकपणी आपल्या जागी उभी राहिली.
***
Comments
Post a Comment