श्रद्धा आणि कर्तव्य
शिवसेनेचे संस्थापक आणि प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेस जमलेला अलोट गर्दीचा सागर अलीकडच्या काळातील एक अप्रूप म्हणावे लागेल. त्या आधाराने शिवसेनेची लोकप्रियता अजमावता येईल का हा चर्चाविषय आहे. परंतु त्याच्या पश्चात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचे उत्तरदायित्त्व सर्व संबंधितांना घ्यावेच लागेल. शिवसेनाप्रमुखांना शासकीय इतमामात निरोप द्यावा हा महाराष्ट्न् सरकारचा निर्णय त्यांच्याविषयीच्या सद्भावनांपोटी घेतला गेला असेलही, पण त्याविषयी काही स्पष्ट नियम कायद्याच्या राज्यात असणार; असलेच पाहिजेत. ते काय आहेत, याबद्दलची विचारणा उत्तर प्रदेशातून माहितीच्या अधिकाराखाली केली गेली आहे. कुणाच्या तरी मर्जीखातर किंवा लोकानुनय सांभाळण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. ते नियमबाह्य असूनही `खास बाब' म्हणून सन्मानाने जरी घडले असेल तरी यापुढील काळात `खास बाब' हाच नियम होण्याचा धोका असतो.
पद्मपुरस्कार किंवा भारतरत्न हा सन्मान कुणाकुणाला द्यावा यासाठी अशा प्रकारच्या मागण्या होत असतात. स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानपेन्शन देण्याच्या घटना स्वातंत्र्यप्राप्तीपर्वात जन्मलेल्या व्यक्तींना देण्याची `खास बाब' घडू शकते. पण `शासकीय इतमाम' कुणाला द्यावा हा प्रश्न विचारला गेला आहे हे खरे.
कै.ठाकरे यांच्या स्मारकाचे स्थान हा एक नवीन मुद्दा येऊ पाहात आहे. तिथेही कै.ठाकरे यांची कर्मभूमी... वगैरे भावनिक मते निर्णायक होऊ शकणार नाहीत. तशी ती एकदा झाली तर पुन्हा तशी `खास बाब' कितीजणांसाठी लागू करायची असा प्रश्न उभा राहू शकतो. प्रत्येक संघटनेला आपापला नेता परमोच्च स्थानी असतो. तेवढ्यापुरते ते वास्तव कोणीही मान्य केले तरी प्रश्न उभारणार नाहीत, पण दुसऱ्या संघटनेचा नेता खाली ढकलण्याची अहमहमिका सुरू होते. आणि प्रश्न जटिल बनतात.
त्यातही पुन्हा नेत्यांच्या मोठेपणापेक्षा व नेतृत्त्वगुणांपेक्षा त्या संघटनेशी असणारा विरोध ऐरणीवर येतो. एकमेकांच्या सत्तास्पर्धेतून लोकभावना कोण सांभाळतो किंवा भडकावतो यावरती तो परस्परविरोध शमतो किंवा वाढतो. एकूणातच तात्विक वा नैतिक इष्ट-अनिष्टतेपेक्षा निव्वळ राजकारणावर अवलंबून होणारे निर्णय वादग्रस्तच ठरतात; ठरणारच. कदाचित तसे वाद तेवत ठेवणे हाच कित्येकांचा हेतू असू शकतो.
संसदेचे कामकाज बंद पाडण्याला तर हल्ली कोणतेही कारण चालते, किंबहुना कारणही लागत नाही. कुणाला श्रद्धांजली वाहायची याविषयी हट्ट कसा काय होऊ शकतो? कोणा ज्येष्ठाला वंदन करावे हा संस्कारांचा भाग असतो. त्यात ज्येष्ठांचे ज्येष्ठत्त्व आणि कनिष्ठांचे नम्रत्व हा महत्त्वाचा भाग आहे. तो `आतून' असेल-नसेल त्याप्रमाणे आपापली वर्तणूक-कृती ठरवावी. आवश्यक वाटले तर दांभिक नाटकही करावे लागत असेल. पण जुलमाचा रामराम करण्याचा आग्रह विरोधी पक्षनेत्याची कोणती शान वाढवू शकेल? त्यांची निष्ठा दिवंगतापेक्षा संसदीय कामकाजावर असायला हवी. ते रोखून धरण्यासाठी गोंधळ घालण्याने दिवंगतांना शांती मिळते असा तर समज नसेल ना?
या सर्व बाबतीत सभ्यता, सद्भावना आणि समन्वय यांना गाडून टाकल्याचे दिसून येते. शेतकरी आंदोलनांनी चौकात टायर पेटवून सारे व्यवहार रोखले. त्यात शेतकरी किंवा कारखानदार नसलेल्यांचे किती नुकसान झाले त्यावर कुणी बोलत नाही. उलट हे आंदोलन खऱ्या शेतकऱ्यांचेच असेल तर त्यांना विरोध करण्याचे पाप आपल्या माथी नको असाच विचार करून सर्व पक्षोपक्षांनी ऊसदरवाढीच्या मागणीत आपापली मोळी टाकली. उसाला दर जास्त मिळाला तर इतर समाजाला वाईट वाटण्याचे कारणच नाही. परंतु त्यासाठी एसटी मंडळाचे व उद्योगविश्वाचे, सामान्य नागरिकांच्या दिवाळीचे नुकसान कोणती संघटना भरून देणार?
वत:च्या हितसंबंधांसाठी इतर साऱ्या यंत्रणांस अहिताकडे नेणाऱ्या निष्ठा व कृती वारंवार तपासून पाहायला हव्यात. अन्यथा त्यानिमित्तचे वाद वाढवत नेऊन भांडत राहणारे अनुयायी त्याच त्या वर्तुळात फिरत राहतील. बाकीच्या जगास त्यांच्याभोवती टाळया पिटण्याऐवजी वेगळया वाटेने पुढे निघून जाता येईल.
Comments
Post a Comment