रजिस्टर्ड पत्रांचा पत्ता शोधण्याची जबाबदारी पोस्टाची
चेक न वटता बँकेतून परत आल्यास संबंधितांना नोटिस पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे. नोटिशीच्या पाकीटावर संपूर्ण व व्यवस्थित पत्ता लिहिल्यावर ही नोटीस पाठविण्याची कायदेशीर जबाबदारी संपुष्टात येते. अशी नोटीस रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवावी. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात `रजिस्टर्ड पत्र पोहोचविण्याबाबत सर्व प्रकारचे प्रयत्न संबंधित पोस्टमनने केलेच पाहिजेत' असे नमूद केले आहे. नुसते `पत्ता अपुरा, पत्ता सापडत नाही', `संबंधिताने पत्र स्वीकारण्यास नकार दिला', `घर सोडून गेले' अशा शेऱ्यांसह पोस्टमनला पत्र परत करता येणार नाही. त्याने शेजाऱ्यांकडे संबंधित व्यक्तीच्या नवीन पत्त्यासंबंधात चौकशी करून त्याचा नवीन पत्ता शोधून हे रजिस्टर पत्र त्याच्या नवीन पत्त्यावर दिले पाहिजे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही संबंधिताचा नवीन पत्ता न सापडल्यास त्या पोस्टमनने कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले याचा लेखी तपशील पोस्टमास्तरांना देणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे. असे प्रयत्न न केल्यास संबंधित पोस्टमनला जबाबदार धरून त्याच्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोस्टमास्तरांना दिले आहेत. संबंधित व्यक्ती फरार असेल तर नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांचा कालावधी संपताच निगोशिएबल इन्स्टुमेंट अॅक्टच्या कलम १३८ नुसार कारवाई करून त्या व्यक्तीस फरारी म्हणून घोषित करून कोर्ट त्या व्यक्तीची मालमत्ता जप्तीचे आदेश देते. पोस्टमनच्या कर्तव्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या निकालावरून कोर्ट सरकारी सेवेला किती महत्त्व देते ते दिसून येते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ही नोटीस फॅक्सनेही पाठवता येते. त्या नियमात बँकेने चेक परत गेल्याचे कळविल्यापासून ३० दिवसांच्या आत नोटीस पाठविण्याचे बंधन असून पत्ता सापडेपर्यंतचा कार्यकाल मोजण्याचा प्रश्नच येत नाही.
***
Comments
Post a Comment