गोळीबार की भुसनळे?
महाराष्ट्नतील मंत्र्यांवर एकाचढ एक आरोप करत पाचपंचवीस वर्षांपूर्वी श्री. आण्णा हजारे मोठे झाले, पण त्या आरोपांतून निष्पन्न काही झाले नाही. त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जन आंदोलन या नावाच्या रामभरोसे वादग्रस्त कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन केल्या, त्यांची कुवत जगजाहीर असल्यामुळे स्थापनेपासूनच त्या ठरल्या आणि त्यांना कुणीही विरोध न करताच त्या विरून गेल्या. उगीचच हवेत झाडलेल्या फैरींनी गोंधळ वा पळापळ माजते पण शिकार साधत नाही.
श्री. आण्णा हजारे यांचेच चेले श्री. अरविंद केजरीवाल हे भारतीय प्रशासन सेवेची (आयएएस) पदवी घेतलेले उच्चस्तरीय अधिकारी आहेत. ते ज्या प्रकारे प्रसार माध्यमांतून सर्वपक्षीय नेत्यांवर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले आहेत, ती कोणत्या प्रशासनाची रीत म्हणावी ते कळनासे झाले आहे. त्यांनी एकेका नेत्यावर जी संशयास्पद व्यवहारंाची चिखलफेक केली आहे, ते तर कुणीही करू शकतो. एकाही पक्षाचा नेता किंवा शिपाई स्तराचा प्रशासकीय नोकर आज स्वच्छतेची ग्वाही देऊ शकत नाही.
स्वत: आण्णा हजारे, किरण बेदी व केजरीवाल यांच्यावरही त्याच गैर व्यवहारांचे आरोप झाले आहेत. ते जसे लोक विस्मृतीच्या आधारे दूर झाले; तसेच या नेत्यांवरच्या आरोपांचे होणार हे उघड आहे. गृहनिर्माण, सार्वजनिक कामे, पोलिस,महसूल, वन वगैरे सगळे विभाग जनतेला जो अनुभव देतात, त्यावरून सार्वजनिक जीवनात काय चालले आहे ते लोकांना स्पष्ट समजते. त्याबद्दल आक्र स्ताळे आरोप करून केजरीवाल काय साधतात? ते जरी प्रशासनाचे जाणकार असले तरी याच देशाच्या न्यापालिकेचा पर्याय तर यांना ठाऊक असेल.
भ्रष्टाचाराचे हे आरोप खोटे असतील असे आज शंेंबडे पोरही मानत नाही. पण म्हणून त्याविरुध्द प्रसारमाध्यमांनी शंख मारण्याची पध्दत केजरीवाल यांनी तरी अवलंबू नये. आपल्या परीने हे भ्रष्ट वातावरण स्वच्छ करण्याला फक्त दोनच मार्ग लोकशाही व्यवस्थेत आहेत. एक म्हणजे न्यायालयात दाद मागण्याचा आणि दुसरा विधायक जनशक्ती -संघटनेचा. हे दोन्ही खूप कष्टप्रद, दीर्घकालीन आणि नैतिक निष्ठेची परीक्षा पाहणारे आहेत. गांधी टिळकांनी ते मार्ग चालून दाखविले. केजरीवाल कंपूने आपल्या बेछूट आरोपशाहीला `स्वातंत्र्याची दुसरी लढाई' वगैरे चित्ताकर्षक नावे दिली तरी त्यांतून काही साधणार नाही. साधू शकेल तर दोन परिणाम संभवतात. एक म्हणजे सार्वत्रिक अविश्वासाच्या उद्रेकातून जनतेची उदासीनता वाढेल किंवा दुसरे म्हणजे, ही बुजुर्ग माणसेही अशी वागतात मग आपण तरी का मागे राहायचे, म्हणून या भ्रष्ट वाहत्या गटारगंगेत सामान्यजन हात धुवून घेत जातील. यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाला जमेल तसे लुटावे असे मानणारी किडकी प्रजा मातेल. केजरीवालांची इच्छा न जाणो संघर्षातून सत्यार्थाकडे जाण्याची असेलही, पण या प्रकारच्या आरोपांच्या फेकींचे तोफगोळे आज जागृती करणारे वाटले तरी लक्ष्यभेद करण्यापूर्वी हवेतच विझणारी ती मनोरंजनाची आतषबाजी ठरेल.
संघटनात्मक लोकशक्ती समर्थ करण्याइतका प्रभावी उपाय लोकशाहीत दुसरा नाही. लोकशक्तीला झुंडशाहीचे विकृत रूप आले आहे. राजकीय पक्षांचे संघटन पूर्णत: सत्ताकेंद्री असते. कारण सत्ता मिळविण्यासाठीच तर पक्ष काढायचा असतो. कोण्या राजकीय पक्षाच्या स्थापना उद्दिष्टांत ज्ञानेश्वरीची पारायणे घालू, किंवा मुलांसाठी संस्कारवर्ग काढू हे तर असत नाही. `पॉवर अॅट अेनी कॉस्ट' हे ध्येय ठेवूनच राजकारण चालते ,तो साधा व्यवहार आहे.केजरीवाल त्या वाटेने तर चालले आहेत.त्यांनी भ्रष्टाचार विरोधाच्या मुद्द्यावर उद्या जर त्यांच्या गुरुवर्य आण्णा हजारेंना बारामतीत शरद पवारांविरोधात उभेे केले तर काय घडेल? ते कल्पित घडू नये म्हणून मग सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल.एखादी महाआघाडी शोधून त्यांच्याशी सोयरीक जमवून इच्छेविरुध्द नांदावे लागेल.थोडक्यात म्हणजे भ्रष्ट व्हावे लागेल.
लोकांचे-समाजाचे काम करायचे,लोकादरास पात्र ठरायचे तर त्यासाठी असला अकांडतांडवी गर्गशा करण्याची मुळीच गरज नसते.काही प्रशासकीय अधिकारी त्यांच्या त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय देऊन लोकहित साधतात. ते न जमले तर राजीनामा देऊन शिकविण्या-क्लासचा व्यवसाय करणारे काही चाणक्यही आहेत. त्याउलट खैरनार अरुण भाटीया यांसारखे तर्कटराव लोकांची उमेद अकारण कमी करतात. केजरीवाल त्या वाटेने जाऊन स्वत:चा भुसनळा करून घेतील अशी शक्यता दिसते. पळभर ठिणग्यांच्या आरोप-वर्षावाने बघ्यांचे चीत्कार उठतील पण ते भुईवर विरताच त्या भुसनळयाचे नळकुंडे कुणीही कडेला लाथाडेल.ही भीती केजरीवालांच्या अपयशाची नव्हे तर सामाजिक खचलेपणाची आहे.
आज नरेंद्र मोदी व नितीश कुमारांनी त्यांच्या राज्यातील लोकांना विधायकतेची दिशा दिली आहे. काही काळापूर्वी टी.एन.शेषन यांनी प्रशासनाची जरब ही काय चीज असते हे दाखवून दिले. बाबा आमटे यांनी जगाला ग्रासणाऱ्या महाव्याधीची सेवा करून दाखविली.हे तीन घटक वेगळया क्षेत्रातील आहेत. मुख्यमंत्री असो,प्रशासक किंवा समाजसेवक असो, ज्यांना काही करायचेच असेल त्यांनी स्वीकारलेली आपल्या पक्षाची भूमिका नेटसपणे वटविली तर परिवर्तन घडेल.उगीच हे भ्रष्ट, ते पापी, तिथे दुराचार इथे अनाचार अशा आरोळी आरोपांतून त्यांनाही उभारण्यास स्वच्छ जागाच शिल्लक राहायची नाही. पूर्वी काही स्त्रिया सोवळे पाळत. त्यांच्या स्वच्छता-श्रध्दा -शुचिता यांपेक्षा सार्वत्रिक प्रदर्शनी कलकलाटाला उठाव यायचा.उगीच लुगडे पोटरीवर उचलून `शिवशिल, शिवशिल,म्हणत खरकट्यातून उड्या मारत जाण्यामुळे त्यांच्या सोवळेपणापेक्षा थिल्लरपणा लक्षात येत असे. आजचे हे भ्रष्टता निवारक संघर्षयात्री पाहता त्याची आठवण होते.
***
Comments
Post a Comment