क्रांती की परिवर्तन?
श्री. अण्णा हजारे राजकारणात प्रवेश करणार असे काहींना वाटतच होते आणि उरलेल्यांना त्यांनी राजकारणात यावे असे वाटत होते. राजकारण प्रवेशची अण्णा हजारेंची घोषणा एकंदरीत सर्वांच्याच अपेक्षेप्रमाणे झाली आहे. आणि त्याचे परिणामही त्या सर्वांच्या अपेक्षेनेच होण्याचा संभव वाटतो. राजकारणात जाण्यामुळे आण्णांचा मामा होणार असे दोन्ही गटांना वाटत असावे; परंतु एका बाजूला त्याची चिंता आहे आणि दुसऱ्या बाजूस त्याचा धूर्त आनंद आहे. त्या दोन्ही गटांचा अपेक्षाभंग होऊन राजकारणाला व त्यायोगे सर्वंकष राष्ट्न्कारणाला नवी दिशा त्यांनी दिली तर ती हवी आहे. तथापि ती शक्यता फारच अंधूक आहे. असे असले तरी श्री.अण्णा हजारे आणि आजूबाजूची `टीम' यांच्या तळमळीबद्दल शंका न घेता त्यांना शुभेच्छा देणे आवश्यक आहे.
जी मंडळी आज राजकारणात आहेत ती पक्की स्वार्थी राजकारणी बनलेली बनेल मंडळी आहेत. हजारे त्यांच्या विरोधात उतरणार असले तरी प्रस्थापित सर्वच विरोधकांतून अलिप्त राहणे अशक्य वाटते; आणि उजवे-डावे-पुरोगामी-प्रतिगामी वगैरे लेबलांचे जे पक्ष आज आहेत त्यांच्यातील कुणाशीही घरोबा केला तरी लोकांना ती प्रतारणा वाटणार आहे. राजकारणाच्या क्षेत्रात आज इतकी दलदल माजली आहे की त्यात उतरणाऱ्या माणसाची कृतिशीलता मंदावते आणि त्याने काही धडपड करायची तर त्याला पार बरबटून घ्यावे लागते. अशा स्थितीत `चांगल्या माणसांनी राजकारणात यावे' असा एक साळसूद विचार कुठेतरी व्यक्त होतो, त्यात प्रांजळता असेलच असे नव्हे.
घनदाट अरण्यातल्या आदिम टोळीच्या ताब्यात कुणीतरी नागर संस्कारांचा मनुष्य सापडतो. त्याला मारून टाकण्याऐवजी काही काळ `पाळतात'. एके रात्री दिवट्या-मशालींच्या उजेडात ती टोळी नाच करू लागते. या नागर सभ्यतेला तो भीषण नाच असह्य होतो. त्याची खजिलवाणी स्थिती बघून टोळीवाले त्याच्यापुढे `व्हा व्हा ह्या ह्या' करून जीभ लोंबवत नाचतात, चिडवतात. एका क्षणी तो त्यांना प्रत्युत्तर म्हणून तसेच आवाज काढत त्यांच्या अंगावर धावतो. त्यामुळे फेर धरून नाचणारी भीषणता फार आनंदित होते कारण हा भला माणूस आपल्यातला झाला असे त्यांना वाटते. याउलट अविवेकी संतापाच्या भरात त्या माणसाचे रानटी भेसूरणे सहज समजाच्या लोकांची सहानुभूती मिळवते. जेव्हा कधी असे दृष्य कोणा चित्रपटाने घेतले तेव्हा त्यांच्यासमोर अण्णा हजारेंच्या राजकारणी प्रवेशाबद्दल व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया नसाव्यात. पण सद्यस्थितीमुळे कोणत्याही नाटकसिनेमात तशा आशयाचे दृष्य पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्याची आठवण होईल.
राजकारण सुधारले पाहिजे यात शंका नाही, त्यासाठी संघर्ष अटळ आहे पण त्यासाठी हाती असणारी पाच पंचवीस लोकांची कुमक गर्दीस मेळवण्याचा प्रकार होऊ नये. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेगाने लोकशाहीत परिवर्तन होण्याची शक्यता पटत नाही. हिटलरशाहीने किंवा स्टॅलिनशाहीने देशाला खूप वेगात पळवले हे खरे असले तरी त्या वेगाने जे पायी चिरडले गेले त्याचा विचार आपल्या इथे परवडणारा नव्हे. आजच्या ऑलिंपिकमधून चीन पदकांची पोतडी भरत सुटला आहे पण त्यासाठी त्या खेळाडूंना वेठबिगारी भोगावी लागते असे वृत्तांत आहेत. तसे काही भारतात घडू शकत नाही. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचा अनुभव, कौशल्य आणि कुवत यांचे मूल्यांकन भारतीय सामाजिक भूमिकेशी ताडून पाहणे उचित होईल. त्यावरून अराजकीय सामान्यजनांच्या गटास अण्णा हजारेंच्या राजकारणप्रवेशाची चिंता का वाटते तेही स्पष्ट होईल. अण्णांच्या उपोषण-रॅलीत सामील झालेले तात्पुरते मेणबत्ती-बहाद्दर हा काही देशविकासाचा पर्याय ठरू शकणार नाही हेही समजून घेणे योग्य होईल. लोकशाहीत लोकशाही पद्धतीनेच बदल घडवावा लागतो. त्यासाठी लोकांची प्रवृत्ती (अॅटीट्यूड) बदलावी लागते, त्यास प्रदीर्घ काळातील प्रयत्नांचे सातत्य आवश्यक असते. मेणबत्ती मोर्चा किंवा अण्णा आंदोलनाचे जंतरमंतर हा केवळ एक प्रारंभ आहे. त्याची वाटचाल होण्यातच काही पावले राजकारणात फसली तरी शासकीय प्रकल्प भूमीपूजनाच्या दगडी पाटीवरच थांबतो तसे घडेल. बाकी हा नवा पक्ष, त्याची घटना, धोरणे, पैसा, कार्यपद्धत वगैरे चर्चा आजच करण्याचे कारण नाही. परिवर्तनाची आशा उद्यापरवाच फलदायी ठरेल अशी भाबडी घाई करण्यासारखेच ते होईल.
Comments
Post a Comment