Skip to main content

Lekh in 6/8/2012




चाकोरी
मुलांसाठी उपयुक्त अशा एका पुस्तकात `चाकोरी कशी पडते' यावर एक मजेदार कविता वाचली. तिचा आशय असा - महानगरातला एक रस्ता खूपच वेडावाकडा होता. त्यामुळे इच्छित अंतर जवळजवळ तिपटीने वाढत होते. एवढ्या सुनियोजित महानगरात हा रस्ता असा का? उत्सुकतेपोटी एका संशोधकाने त्या महानगराचा इतिहास तपासला. शंभर वर्षांपूर्वी हे एक लहान खेडे होते, त्यावेळी बैलगाड्या जाण्याचा हा रस्ता होता. त्याने त्याही पूर्वीचा इतिहास धुंडाळला. त्याला असा शोध लागला की, तीनशे वर्षांपूर्वी त्या जागी एक गुराख्यांची वस्ती होती. त्यांच्याकडची वासरे ते बाहेर चरायला सोडत. त्यातील एक वासरू तरतरीत होते, ते सर्वांच्या पुढे जाई. पण ते होते जरा लंगडे, त्यामुळे ते चरताना खूपच वेडेवाकडे चाले. त्याच्यानंतर जन्मलेली लहान वासरेही त्याच्या मागून जात राहिली; तिथे गुरांची वाट तयार झाली. त्याचीच पुढे गाडीवाट बनली, पुढे त्याचाच हमरस्ता झाला! कविता शेवटी म्हणते की, या प्रगत जगातले हजारो अभिजन वर्षानुवर्षे ज्या वाटेने जात राहिले आहेत, ती वाट एका लंगड्या वासराने `चुकून' पाडली होती!
संगणकामुळे झालेला ज्ञानाचा स्फोट व पालकांच्यात उदयाला आलेला `महत्त्वाकांक्षेचा विस्फोट!' या बिग बँग मध्ये जन्माला आलेले अतिप्रगत अवस्थेतील मानवी मूल अजूनही या पूर्वीच्या चाकोरीवरच चालवले जात आहे. आपण कसे, कोण आहोत, आपल्या क्षमता, आवड काय, जीवनध्येय काय, आनंद कशात याचा काहीही विचार न करता आम्ही फक्त समोरच्या चाकोरीवर पावलं टाकून चालतो आहोत. बोबडं बोलायच्या वयात `इंग्लिश मेड्यम'ला दाखल करण्यापासून ते सीईटीसाठी क्लासेसना जुंपण्यापर्यंत,थांबून विचार करायला पालकांना सवडच नाही. जणू जगरहाटीत मुलाला ढकललं की त्याच्या पुढील आयुष्याच्या सुकरतेची गॅरंटीच मिळते..! मुलाला `ब्रह्मा-विष्णू-महेश' म्हणजे `आय.टी.- मेडिकल - इंजिनियरिंग' यापैकी एका देवाच्या पायाशी नेऊन टाकेपर्यंत जिवात जीव नसतो!
मुलाला काय आवडतं, जमतं, त्याचा जीव कुठे रमतो हे त्यालाच ओळखायला शिकवणारे, तितका विचारांचा खुलेपणा असणारे व त्या आवडीचा आदर करणारे पालक किती? एका मिनिटात चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडता येणं ही पद्धत फक्त परीक्षेत! प्रत्यक्ष आयुष्यातल्या समस्यांवर असलेल्या असंख्य पर्यायांतून उत्तरे आपण `शोधावी' लागतात. हल्ली तिसरीतल्या शेंबड्या पोरालाही `खायला काय देऊ' विचारलं तर `ऑप्शन काय?' असा प्रतिप्रश्न येतो. आईला तरी मॅगी की क्रॅडबरी की केक याशिवाय ऑप्शन कुठे ठाऊक असतात? सुरुवातीपासूनच स्वतंत्र विचार, कल्पकता, सर्जकता याचं पद्धतशीर खच्चीकरण करायचं आणि मग `आपल्या देशात मुलं संशोधनाकडं वळत नाहीत' म्हणून ओरडायचं.
मे महिन्यात मुलाच्या कल-चाचणी (रिर्ळींींीवश ींशीीं) वेळचा असाच अनुभव.... टेस्टचा रिझल्ट घेऊन कौन्सिलरशी चर्चा करून पालक बाहेर पडत होते. काही मंडळी जरा लांब चेहरे करून बसलेली दिसली. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की त्यांना त्यांच्या मुलाला इंजिनियर करायचं आहे पण `कल चाचणी'त त्याचा कल, क्षमता यावरून तो कलाक्षेत्रात चांगली कामगिरी करेल असा अभिप्राय आला होता! मुलालाही ते आवडत होतं. परंतु पालक मात्र कौन्सिलरकरवी त्या मुलाला इंजिनियरिंगसाठी `तयार' करू पाहात होते! हसावं की रडावं तेच कळेना! आपलं मतच शेवटी लादायचं तर कलचाचणीचा फार्स कशासाठी? मुलाची आवड काय मोबाईलमधलं सिमकार्ड आहे काय `बदलून' घ्यायला?
मुलांना आपल्या नैसर्गिक क्षमतेने वाढण्याचा पूर्ण हक्क आहे हे आम्ही कसे विसरतो आहोत? नुसते मार्क चांगले असूनही हल्ली भागत नाही तर ते `इतरांपेक्षा खूप चांगले' असावे लागतात. शिक्षणाच्या मार्केटची ती मूलभूत गरज आहे. आपल्या आवडीच्या विषयातही खूप छान, वेगळं काही करता येतं. यशस्वीही होता येतं हे आता खूप तरुण मुलं-मुली दाखवून देत आहेत. आपलं स्वत:चं असं काही खास बलस्थान प्रत्येकाकडे असतं. ते ओळखून फुलवता येईल. त्याचा अभिमान बाळगता येईल असं स्वच्छ, मुक्त, निकोप वातावरण निर्माण करायची जबाबदारी शाळा-शिक्षक-पालक यांची आहे. कुसुमाग्रजांनी किती सुंदर शब्दांत सांगितलं -
प्रत्येक कळीला हक्क आहे फूल होऊन जगण्याचा
सुगंधाने नटण्याचा अन् दिमाखाने असण्याचा
असो गुलाब असो कमळ वा कळी असो रस्त्यावरील
तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा....
आपल्यातील नैसर्गिक रंग-रूप-गंध यांसह पूर्ण क्षमतेने उमलण्याचा आनंद - त्यांचा हक्क त्यांना मिळायला हवा! आपल्यासाठीही एक सूर्याचा किरण तिष्ठत उभा आहे, यावर विश्वास ठेवून आपल्या फुलाला उमलण्यासाठी थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे?
- विनिता तेलंग


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन