६५ वर्षांचे बाल्य
व्यक्तीच्या आणि देशाच्या संदर्भात कालमापनाची रीत वेगळी असायला हवी. व्यक्तीच्या जीवनातील बदल आणि वळणे ज्या गतीने धावू शकतात त्या गतीने राष्ट्न्जीवन धावू शकत नाही हा भारतीय प्रवृत्तीचा विचार आहे. याचे कारण इथल्या लोकशाहीला स्वातंत्र्याच्या अपक्व फळापेक्षा सर्वसमावेशकता प्राधान्याची आहे. सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तीसुद्धा स्वत:पुरते निर्णय घेऊन अथवा ते बदलून आपल्याच मनाप्रमाणे अंमलात आणू शकते, पण एकाहून अधिक व्यक्ती कुटुंब म्हणून एकविचाराने निर्णय घेऊन ते एकत्रितपणे अंमलात आणू शकत नाहीत. अशा अनेकानेक कुटुंबांचा बनलेला समाज `राष्ट्न्' म्हणून वाटचाल करीत असताना त्याची गती तितक्या प्रमाणात कमी होणार हेच ठरलेले आहे. ती गती वाढवायची असेल तर जगाच्या पाठीवर काही पर्याय दिसतील.
त्यापैकी एक पर्याय म्हणजे स्वातंत्र्य - समता - बंधुता वगैरे मानवी व्यवहारमूल्ये गुंडाळून ठेवावीत आणि इंग्लंडने भारतासह सर्व जगावर जो वसाहतवाद लादला तसा लादावा. पारतंत्र्य काळात भारताला एकराष्ट्नीय स्वरूप आले असा एक सिद्धान्त आपल्यातील पुष्कळजण मनाशी बाळगून असतात आणि त्याच काळात रेल्वे-टपालासह अनेक सुधारणा अल्प वेळेत झाल्याचे सांगतात. इंग्रजाने आखलेल्या रेलमार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी त्यांना कोणत्याही आंदोलनांस किंवा कोर्टबाजीस तोंड द्यावे लागत नव्हते. आपल्याकडे आता रस्त्यातला दगड हलविणेही सोपे जात नाही. या तऱ्हेच्या सर्वसमावेशी कार्यपद्धतीमुळे राष्ट्न्व्यवहारांची गती ठप्प वाटते.
दुसरा पर्याय हडेलहप्पी व अमानुष राष्ट्न्वादाचा असू शकेल. हिटलरकाळात, जर्मनीने जी वेगवान गती घेतली होती तिचेही आकर्षण पुष्कळांना वाटत असेल. तर त्यांनी त्याच्या एकाच अजब चालीचा विचार करावा की, केवळ सशक्त-सक्षम लोकांचे अस्तित्त्व असावे आणि दुर्बळ-पंगू-वृद्ध अशांकडे ते संपून जाईपर्यंत दुर्लक्षच करावे! आपला देश या प्रकारे गतिमान होण्याचे कुणी मनातही आणणार नाही.
अमेरिकेसारख्या आर्थिक संपन्नतेचा आणखी एक पर्याय आहे. आर्थिक संपन्नतेमुळे भौतिक समस्या संपून सामुदायिक व्यवस्था सुधारतात हे तर वास्तव आहे. एकाच खोलीत राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाचे जीवनमान आणि प्रशस्त घरात राहणाऱ्या छोट्या कुटुंबाचे जीवनमान हा फरक भारत-अमेरिकेत आहे. परंतु मोठे घर बांधावे इतका पैसा निर्माण करणे सोपे नाही. शिवाय त्यासाठी निसर्गापासून सगळे ओरबाडून काढणेही पटेल असे नाही. प्रत्येक बाबतीतून निव्वळ पैसा आणि पैसाच काढण्याची पक्की अमेरिकन वृत्ती आणि संस्कृती भारतीय स्वभावात रुजलेली नाही, ती अलीकडे डोकावू मात्र लागली आहे. तरीही त्याकरिता त्यांच्यासारखे वेळेचे भान व असोशी नाही. म्हणजे तोही पर्याय इथे कठीणच.
म्हणूनच भारतातील एकंदर लोकसंख्येला दिशादर्शक होणारा, वळण देणारा, प्रेरक ठरणारा असा जो सुजाण क्षमतेचा वर्ग आहे त्याची जी काही भूमिका राष्ट्नीय जीवनात असेल त्यावरच साऱ्या समुदायाच्या वाटचालीची गती ठरते. स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांत हळूहळू तो वर्ग निव्वळ आत्मकेंद्री बनत गेल्यामुळे तेवढ्यांपुरती गती ठीक वाटते. त्या वर्गाला मिळत गेलेल्या व्यक्तिगत सुखसुविधा वाढल्या पण त्यांचा समावेश जेव्हा त्यांच्याच स्तराच्या एका समुदायात होतो तेव्हा मात्र त्यांची अधोगती जाणवल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही गृहसंकुलास पॅराडाईज वा हेवन-हाईटस् म्हटल्याने तेथील गोंगाट, नासाडी व प्लॅस्टिककचरा कमी होत नाही; ही त्यांच्यातील राष्ट्नीय प्रगती नसून रानटीपणा आहे. त्यांची स्वातंत्र्यप्रियता केवळ एकट्यापुरती, स्वत:पुरती असते. सभोवतीच्या सर्वांना स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे असेल तर व्यक्तिश: स्वत:वर पुष्कळ बंधने येतात. इंग्रजांची स्वातंत्र्यप्रियता व लोकशाही त्यांच्याव्यतिरिक्त बाकी जगाला पारतंत्र्यात जखडणारी होती. पण किमान त्यांच्या समुदायापुरती तरी नांदत होती. आपल्या देशातील स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांत तसा एखादा छोटा समुदाय किंवा कुटुंब-परिवारसुद्धा सर्वसमावेशक स्वातंत्र्य दर्शवीत नाही. त्यामुळे व्यक्ती स्वतंत्र झाल्या पण देश स्वैर झाला असे दिसते.
तथापि व्यक्तीची स्वातंत्र्यप्रियता साऱ्या देशभरात प्रतिवर्तित करणे हे आपल्या बाबतीत होण्यासाठी ६५ वर्षे पुरेशी आहेत का, असा प्रश्न आहे. स्वातंत्र्यकाळी जन्मलेल्या व्यक्ती आज वयाच्या पासष्टीत आहेत. त्यांच्या तरी अंगी खऱ्या अर्थाने ज्येष्ठत्त्व राहो व्यक्तिगत प्रौढत्त्वही आलेले दिसत नाही मग जबाबदार कर्तव्यपरायणता कुठे शोधणार? आज जे काही सर्वशिक्षण, प्रदूषण, पर्यावरण, आरोग्य, उद्योजकता, मूल्यसंवर्धन वगैरे अनेक बाबतीत अस्पष्टसे तरी ऐकू-उमटू लागले आहे ते समजून घेत उगवती पिढी मोठी होईल त्यावेळी काही सामुदायिक आचरण स्वतंत्र समुदायाचे म्हणून दिसू लागेल. तोपर्यंत वाट न पाहता कसोशीचे प्रयत्न केले तर ते स्वातंत्र्य लवकर प्रत्यक्षात दिसेल, अन्यथा वाट पाहातच राहावे लागेल. कारण जगाच्या पाठीवरच्या विकासगतीचे अन्य पर्याय आपल्या स्वातंत्र्यकल्पनेला पचणारे वाटत नाहीत. एक समाज, एक राष्ट्न् म्हणून आपले स्वातंत्र्य निष्कर्म कामयोगापर्यंत आले आहे. गतीने प्रगती साधण्यासाठी त्यास बराच काळ लागेल असे वाटते.
Comments
Post a Comment